पुणे : आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची ८ जून रोजी निश्चिती होणार आहे, स्थळ निवड समितीच्या भेटीनंतर होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमेलन स्थळाची औपचारिक घोषणा केली जाार आहे.

यासंदर्भात माहिती देताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती ५ ते ७ जून या कालावधीत निमंत्रक संस्थांना भेट देणार आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी पुण्यात होणार आहे. त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून त्यामध्ये साहित्य संमेलनाच्या स्थळावर शिक्कामोर्तब होईल. स्थळ निवड समितीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे.’