पुणे : व्यावसायिक तरुणाला बेदम मारहाण करून १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना वाघोली पोलिसांनी अटक केली. तरुणाला डांबून आरोपींनी त्याच्या चुलत भावाकडून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणी गौरव कांबळे (वय २९, रा. चिंचवड स्टेशनजवळ), ऋषीकेश किशोर शिंदे (वय २४, रा. निगडी), माेहम्मद इरफान खान (वय ३३, रा. नवी मुंबई), मोहम्मद सोहेल मोहम्मद अन्वर (वय २८, रा. मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले असून, त्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. याबाबत एका व्यावसायिक तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह वाघोलीतील उबाळेनगर भागात राहायला आहे. १४ जून रोजी आरोपी गौरव कांबळे आणि साथीदार त्याच्या घरी गेले. तू अक्षय आणि आर्यनला का सोडून दिले. अक्षयने घेतलेल्या २५ लाखांपैकी १५ लाख रुपये आम्हाला दे, अशी मागणी आरोपींनी तरुणाकडे केली. त्यानंतर आरोपींनी तरुणाला धमकावून मोटारीत बसविले. त्याला पिंपरी-चिंचवड शहरात नेले. तेथे एका खोलीत डांबून ठेवले. जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी १५ लाखांची खंडणी मागितली. तरुणाच्या चुलतभावाला धमकावून आरोपींनी त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला, असे तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पसार झालेल्या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.