प्रथमेश गोडबोले

पुणे : यंदा पावसाची सरासरी गाठताना दमछाक झाली आहे. पावसाच्या अवकृपेमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा वगळता अन्य चार जिल्ह्यांत तब्बल १२४ गावे अद्यापही टंचाईग्रस्त आहेत. उन्हाळ्यापासून सुरू झालेल्या पाणी टंचाईच्या झळा पाऊस संपला, तरी कायम असून पश्चिम महाराष्ट्रातील दहा तालुक्यांत पाण्याची स्थिती भीषण आहे. तब्बल दोन लाख २२ हजार ३६० नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुणे महसूल विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांपैकी कोल्हापूर जिल्हा सध्या टंचाईमुक्त आहे. या जिल्ह्यात सद्य:स्थितीला एकही टँकर सुरू नाही. साताऱ्यातील माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्यांमध्ये ७८ गावांमध्ये पाणी टंचाई कायम आहे. सांगलीतील जत आणि आटपाडी तालुक्यातील ३२ गावे, सोलापूर जिल्ह्यात माळशिरस, करमाळा आणि माढा तालुक्यांमधील चार गावे टंचाईग्रस्त आहे, तर पुणे जिल्ह्यात केवळ पुरंदर तालुक्यातील दहा गावे टंचाईग्रस्त आहेत.

आणखी वाचा-ललित पाटील प्रकरणात ‘ससून’च्या अधिष्ठात्यांच्या अडचणीत वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टंचाईग्रस्त १२४ गावांमधील दोन लाख २२ हजार ३६० नागरिकांना १३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यापैकी ११२ खासगी, तर केवळ २२ सरकारी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी १०३ विहीर आणि विंधन विहिरी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कमी झालेला पाऊस आणि अद्याप सुरू असलेला टँकरद्वारे पाणीपुरवठा पाहता डिसेंबरपासून पाणीटंचाई गंभीर रुप घेणार असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा पातळीवर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

जिल्हानिहाय टँकरची स्थिती

जिल्हा टँकर गावे
पुणे १११०
सातारा८४७८
सांगली ३५३२
सोलापूर
कोल्हापूर
एकूण १३४१२४