Kundmala Bridge Collapse : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच घटनास्थळी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनासह पोलीस आणि एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. तसेच या घटनेत ३८ जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकं कशामुळे घडली? या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितली आहे. एकाचवेळी पर्यटक पुलावर एकत्र आल्यामुळे ही घटना घडल्याचं सुनील शेळके यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं आहे.

सुनील शेळके काय म्हणाले?

“मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील हा जो पूल आहे तो पुल शेतकऱ्यांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी बांधण्यात आलेला होता. आज या ठिकाणी पर्यटक आणि दुचाकी वाहनांसह गर्दी झाल्यामुळे हा पूल कोसळला. एकाचवेळी १०० ते १५० लोक एकत्र जमा झाल्यामुळे हा पुल कोसळला आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि एनडीआरएफची टीम पूर्ण सहकार्य करत आहेत. या पुलाची आम्ही वेळोवेळी दुरुस्ती करत होतो. पण या पुलावर दुचाकीस्वरांना प्रवेश नाकारत होतो. पण तरीही काही लोक दुचारीवरून या पुलावरून जात होते. खरं तर अशी दुर्घटना होणं हे दुर्देवी आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंचं ट्वीट काय?

“पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेवर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, “या ठिकाणी एनडीआरएफची टीम, पोलीस प्रशासनासह येथील स्थानिक ग्रामस्थ देखील मदत करत आहेत. आताच एका व्यक्तीला येथील वाचवण्यास यश आलं आहे. त्यामुळे आपण प्रार्थना करूयात की सर्वजण सुखरुप असावेत”, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

शरद पवार काय म्हणाले?

“मावळच्या कुंडमळानजीक इंद्रायणी नदीवरील जीर्ण पादचारी पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत काही पर्यटक वाहून गेल्याची, जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे, हे अतिशय खेदजनक आहे. उपस्थित पर्यटक, स्थानिक ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा व NDRF तर्फे बचावकार्य सुरु आहे, त्याद्वारे अनेकांना वाचविण्यात यश यावं तसंच जखमींना यथायोग्य उपचार मिळोत, अशी प्रार्थना करतो. ह्या दुर्घटनेत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटूंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो. ह्या नदीचं पात्र विस्तीर्ण आहे, तिथल्या खडकाळ भागात विवरं आहेत आणि एरव्ही असणारा वेगवान प्रवाह सद्याच्या दृश्यांमध्ये कमी पाहायला मिळतोय, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी आता शासन, प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“पावसाच्या दिवसांमध्ये रोजच्या दगदगीतून उसंत म्हणून अनेक लोकं अशा पर्जन्य पर्यटनस्थळांना किंवा कधी कधी छुप्या निसर्गरम्य ठिकाणांना (Hidden Places) भेटी देतात, तिथल्या निसर्गाचा आनंद घेतात. अशा वेळी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने, स्थानिक जिल्हा प्रशासनांनी सर्व पर्जन्य पर्यटनस्थळांबाबतीत अधिक जागृत राहणं गरजेचं आहे, पर्यटक सुरक्षितपणे पर्यटनस्थळांचा आनंद घेऊ शकतील अशा व्यवस्था करणं आवश्यक आहे, तरंच भविष्यात अशा अपघात व दुर्घटनांना टाळण्यात आपल्याला यश येईल”, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.