पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. खून केल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. श्यामली कमलेश सरकार (वय ४०, रा. सूर्यउज्ज्वल हाईट्स, रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित (वय ५१, रा. निसर्ग हाईटजवळ, धायरी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी नितीन तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित ओळखीचे होते. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. तिने पंडितकडून ४० हजार ते ५० हजार रुपये उसने घेतले होते.

पंडितने तिला पैसे परत मागितल्यावर पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करत असल्याने वाद झाले. पंडित तिला बुधवारी (४ जून) दुपारी चारच्या सुमारास भेटण्यासाठी धायरीतील रायकर मळा परिसरात गेला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. पंडितने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर पंडित बुधवारी रात्री नांदेड सिटी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खून केल्याची कबुली दिली. पंडितला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे यांनी दिली.