पुणे : मुद्रांक शुल्काच्या पुणे विभागातील प्रलंबित १ हजार ८७४ प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम मुद्रांक शुल्क विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार येत्या २७ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार असून, त्याअंतर्गत झिरो पेंडन्सी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
‘मुद्रांक विभागाच्या मुद्रांक परताव्याची मार्च अखेरपर्यंत १७ हजार १३६ इतकी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी सप्टेंबर अखेरपर्यंत ७४ टक्के म्हणजे १२ हजार ८४६ इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. आता ४ हजार २९० इतकी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे विभागातील १ हजार ८७४ प्रकरणे प्रलंबित असून, त्या पाठोपाठ मुंबईत ८४६, नाशिकमध्ये ६५० प्रकरणे प्रलंबित आहेत,’ अशी माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.
‘मालमत्ता खरेदी करणे तसेच त्याची विक्री करण्यासारख्या विविध प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क योग्य न भरणे किंवा कमी प्रमाणात भरण्याचे प्रकार घडतात. त्या संदर्भात मार्चपर्यंत १५ हजार ६१२ इतकी प्रकरणे प्रलंबित असून सप्टेंबरपर्यंत त्यापैकी ४ हजार ४२१ इतकी प्रकरणे निकाली काढली आहेत. प्रलंबित प्रकरणांमधून ५२ कोटींची रक्कम वसूल होणार असून, त्यापैकी आतापर्यंत ३० कोटींची रक्कम वसूल करण्यात आली आहे,’ अशी माहिती नोंदणी मुद्रांक विभागातील सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी दिली.
राज्य सरकारने नोंदणी मुद्रांक विभागाला यंदा ६३ हजार ५०० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत ४८ टक्के वसुलीनुसार ३० हजार ५५७ कोटी रुपयांचा मुद्रांक वसूल झाला आहे. त्यात सर्वाधिक मुद्रांक वसुली ही मुंबई शहर उपनगरांमधून ११ हजार २४६ कोटींची करण्यात आली आहे. तसेच पुणे शहर जिल्ह्यातून ६ हजार ८४० कोटींची तर ठाण्यातून ६ हजार २११ कोटी रुपयांची रक्कमेची वसुली करण्यात आली आहे.
अभिनिर्णयासाठी मुंबईत सर्वाधिक प्रकरणे
दरम्यान, अभिनिर्णयासाठी प्रलंबित असलेल्या १ हजार १०२ प्रकरणांमध्ये मुंबईतील सर्वाधिक ३९५ प्रकरणे, त्या पाठोपाठ पुण्यातील ३२५ प्रकरणे प्रलंबित आहेत. ठाण्यातील २३४ प्रकरणे प्रलंबित असून वाशिम, भंडारा, वर्धा, बीड, नंदूरबार, सिंधुदुर्ग या ठिकाणी झिरो पेन्डसी करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.