पन्नालाल पटेल यांनी उत्तर गुजरातचा सारा परिसर आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अक्षरबद्ध केला आहे. या प्रदेशातले सणवार, उत्सव, लोकगीतं आणि असंख्य अशा ताणांसह आकाराला आलेले तिथले लोकजीवन त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसून येतं.
राजस्थान, उत्तर गुजरात या प्रदेशातल्या ग्रामीण भागात ५६ हा आकडा आजही अशुभ मानला जातो. वहीखात्यातसुद्धा त्याची नोंद केली जात नसे असे काही तपशील सापडतात. विक्रम संवत १९५६ म्हणजेच १८९९ ते १९०० यावर्षी त्या भागात प्रचंड दुष्काळ पडला होता. मोठ्या झाडांच्या साली खाऊन जगण्याची पाळी त्यावेळी लोकांवर आली होती. धान्याची कोठारं संपली, नद्या आटल्या, अन्नावाचून भुकेने लोक तडफडून मरायला लागले. त्यावर्षी पावसाचा थेंबही न पडल्याने पेरण्या झाल्याच नाहीत. कोणताही झाडपाला खाऊन लोक दिवस काढायला लागले पण पोटातल्या आगीचा डोंब काही केल्या शांत होत नव्हता. भुकेने इतके भीषण रूप धारण केले की माणूसपणाचे काही मोलच राहिले नाही. हा दुष्काळ ‘छप्पनीया अकाल’ म्हणून ओळखला जातो. राजस्थानी लोकगीतातही त्याचे काही संदर्भ आढळतात.
लोकप्रिय गुजराती कथा- कादंबरीकार पन्नालाल पटेल हे उत्तर गुजरात, राजस्थान या सीमा भागातील मांडली या गावचे. त्यांच्या ‘मळेला जीव’, ‘वळामणा’ अशा काही कादंबऱ्या आहेत पण ‘मानवीनी भवाई’ ही त्यांची कादंबरी भारतभर प्रसिद्ध आहे. १९८५ साली या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आलं. या कादंबरीत ‘छप्पनीया’ दुष्काळाचा संदर्भ विस्ताराने येतो. काळू हा कादंबरीचा नायक आणि राजू ही नायिका. परस्परांविषयी दोघांच्याही मनात आकर्षण आहे. आयुष्याचे जोडीदार होण्याची दोघांचीही मनीषा असते पण तसे घडत नाही. दोघांचे लग्न जुळत नाही. या लग्नाला विरोध करणारे नात्यातलेच काही लोक असतात. काळूच्या आयुष्यात लग्नानंतर दुसरीच स्त्री येते आणि राजूच्याही आयुष्यात दुसरा पुरुष. आयुष्यातला बराचसा काळ गेल्यानंतर उतारवयात दोघे असताना ‘छप्पनीया’ अकाल त्यांच्या नशिबी येतो.
दुष्काळग्रस्तांना जगविण्यासाठी तत्कालीन शासनाने ज्या छावण्या उघडल्या त्यात अन्न वाटलं जातं. ग्रामीण भागातून आलेल्या झुंडीच्या झुंडी या ठिकाणी असतात. गाव सोडून अशा एका छोट्या शहरात या दोघांचीही भेट होते. दोघेही कृश दिसत आहेत. ज्या राजूच्या सौंदर्याची चमक काळूला कायम भुरळ पाडत असे ती राजू आता अशक्त आणि दुर्बल झाली आहे. काळूच्या अंगातही त्राण नाही तरीही त्याचा स्वाभिमानी पीळ दुष्काळात त्याला भीक मागू देत नाही. मानवी क्रौर्याची अनेक रूपे या काळात दिसू लागतात. एकेकाळी जोडीदार होण्याची स्वप्ने बाळगणाऱ्या या दोघांना भुकेने एका पातळीवर आणलं आहे.
‘‘माणूस क्रूर नाही… क्रूर आहे ती त्याची भूक.’’
‘‘मीही भुकेलाच क्रूर मानतो पण तिच्यापेक्षाही क्रूर आहे ती भीक.’’
‘‘भुकेने शरीरावरचं मांस झडतं पण भिकेने माणसातला स्वाभिमान, त्याचा आत्मसन्मान सगळं काही चेपून जातं. पार लोळागोळा होतो माणूस.’’
असा या दोघांमधला संवाद. मृत्यू आता आजूबाजूला घिरट्या घालतोय. जगण्याचे सगळेच दोर कापून टाकले आहेत. काही क्षणांचंच आयुष्य उरलंय अशी या दोघांच्याही संवादातली प्राणांतिक तगमग.
काळू तिथल्या अन्नछत्रातल्या रांगेत उभा राहत नाही. तिथले शिपाई त्याला हटकतात. ‘‘सगळे इथले अन्न घेत आहेत आणि तुला न घ्यायला काय झालं? तू कुठला लाटसाब लागून गेलास?’’
काळू म्हणतो, ‘‘लाटसाब असतो तर भीक मागून खाल्लंही असतं पण शेतकरी आहे. त्यामुळे इथं भीक मागून नाही खाणार.’’ रांगेतली माणसं काळूकडे पाहायला लागतात. भुकेने त्याला इथवर आणलं हे खरंय पण गावाला ओरबाडणाऱ्या तत्कालीन शासकांच्या टोळ्यांनी मांडलेला उच्छाद, बंदुकीच्या धाकावर गावागावातून लुटून नेलेलं धान्य या गोष्टींनी तो अस्वस्थ झालेला आहे. इथं जे अन्न शिजवलं जातं त्यात माझ्या गावातल्या धान्याचेही काही दाणे नक्कीच असतील असं त्याला मनोमन वाटतं. तो भुकेने व्याकुळ आहे पण भीक मागून खाणं त्याला रुचत नाही हे त्या यंत्रणेतल्या काहींनी ओळखलं. ‘‘तू वाटल्यास तसं खाऊ नको. इथं झाडझूड कर. इथली कामं कर. हवं तर त्या बदल्यात हे अन्न आहे असं समज आणि खा.’’ अशी त्याची समजूत एका जणाने काढल्यानंतर तो तिथलं अन्न घ्यायला तयार होतो.
दिवस आषाढातले असतात. पाऊस अजूनही हरवलेलाच आहे. लोकांच्या डोळ्यातलं तेज नष्ट झालंय. शरीरांचे जणू सापळे उरले आहेत. अशावेळी काळू आणि राजू जवळ आले आहेत. राजू तिच्या दोन लेकरांसह इथे आलेली असते. आता जगण्याची आशा मावळली आहे. आपण आयुष्यभराचे जोडीदार तर होऊ शकलो नाही पण आता मरतानाचा क्षण तरी सोबत घालवू. शरीरातून प्राण आता कधीही उडून जाईल. असा विचार दोघेही करतात. लोकांपासून जरा दूर एकांतात येतात. तो तिच्या खोल गेलेल्या डोळ्यांमध्ये पाहतो. तीही त्याच्या फासळ्या झालेल्या देहाकडे टक लावून पाहत असते. या डोळ्यातलं धारदारपण आता उरलेलं नाही तरी त्यात एक लोभस असा गोडवा आहे असं त्याला वाटू लागतं. ती त्याला बिलगते. आता याच क्षणी मरण यावं असं दोघांनाही वाटू लागतं. त्याचवेळी एक वेगळी सळसळ दोघेही अनुभवतात.
…ईशान्येच्या दिशेने आभाळ भरून आलेलं आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट त्याचवेळी आसमंत थरारून टाकतोय. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर आभाळाचा रंग बदललेला आहे. पाहता पाहता पावसाच्या धारा दोघांनाही भिजवतात. आतापर्यंत जणू मृत्यूच्या सावल्या अंगाला स्पर्श करत होत्या असं वाटू लागतं आणि आता कोणतीच ताकद आपल्याला जगण्यापासून रोखू शकत नाही याचं समाधान दोघांच्याही चेहऱ्यावर आता दिसू लागतं. फणसाच्या काटेरी त्वचेसारखी दुष्काळाची जीभ हिंस्रा रूप धारण करून भवतालावर फिरत असते. जगणं इतकं पणाला लागलेलं असतं की कथित नीती – नियमांचे, आचार विचारांचे पापुद्रे गळून पडतात. पण एवढ्या उलथापालथीनंतरही जगण्याची दुर्दम्य अशी जिजीविषा टिकून राहते.
पन्नालाल पटेल यांच्या सगळ्याच कादंबऱ्या असं मानवी जीवनातील नाट्य पकडतात. त्यांच्या ‘मळेला जीव’ या कादंबरीतही एक प्रेमकथाच आहे पण सामाजिक उतरंडीला आणि उच्चनीचतेच्या जातीय संरचनेला तडाखा देणारं हे प्रेम आहे.
पन्नालाल पटेल यांनी उत्तर गुजरातचा सारा परिसर आपल्या कथा कादंबऱ्यांमधून अक्षरबद्ध केला आहे. या प्रदेशातले सणवार, उत्सव, लोकगीतं आणि असंख्य अशा ताणांसह आकाराला आलेले तिथले लोकजीवन त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसून येतं. जेमतेम शालेय शिक्षण असलेल्या या लेखकाची जीवनातल्या नाट्याला हेरण्याची दृष्टी मात्र विलक्षण आहे. अखेरच्या काळात त्यांनी पौराणिक कथांवर आधारित काही कादंबऱ्या लिहिल्या पण ‘मानवीनी भवाई’, ‘मळेला जीव’ या त्यांच्या कादंबऱ्या अस्सल प्रतीचं समाजदर्शन घडवतात. ‘मळेला जीव’ कादंबरीचा नायक कानजी आणि कणखर वृत्तीची नायिका जीवी या जोडप्याच्या सुखदु:खाची ही कथाही तितकीच वाचनीय आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये त्या भागातली लोकगीतं मोठ्या प्रमाणावर आलेली आहेत. पटेल यांच्या कादंबऱ्यांची कथनशैली लिखित माध्यमांपेक्षाही मौखिकतेशी नातं सांगणारी आहे. भूक, हिंसा, प्रेम, वैर, करुणा असे सारे घटक भारतीय समाजाच्या पटलावर एखाद्या विशाल नाट्याच्या रूपाने मांडण्याची त्यांची शैली अजोड आहे. माणसाचं आयुष्य हे खरंतर विलक्षण अशा नाट्याने भरलेलं आहे. ‘मानवीनी भवाई’ म्हणजे माणसाच्या जगण्यातील नाट्यच. भवाई हा प्रहसनाच्या अंगाने जाणारा सशक्त असा गुजराती लोकनाट्याचा प्रकार. पन्नालाल पटेल यांचे सारे लेखन हे जणू मानवी जगण्याची रंगशाळा चितारणारे आहे.
लेखक साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आहेत.
aasaramlomte@gmail.com