कॅलेंडर ही व्यवहार, व्यापार आणि व्यवस्था (राज्यव्यवस्था) या तीन ‘व्य’कारांची गरज होती आणि हे सत्य त्या नावातच दडलेलं आहे. लॅटिन ‘कॅलेंड’पासून इंग्रजी कॅलेंडर! आणि ‘कॅलेंड’ म्हणजे देण्याघेण्याचे सगळे व्यवहार ज्यात लिहून ठेवायचे अशी वही!
‘कालगणना कशी करतात’ यावर पुष्कळ चर्चा केली आपण. सौर कालगणना पाहिली, चांद्र कालगणना पाहिली, चांद्र-सौर कालगणना पाहिली. त्यांचे विविध बारकावे पाहिले. त्यात झालेल्या चुका, गफलती पाहिल्या. त्या दुरुस्त कशा केल्या तेदेखील पाहिले. पण ‘कालगणना का करायची’ याचं काय उत्तर आहे? युगानुयुगं माणसं दिवस मोजत आली. का? नसते मोजले दिवस तर काय बिघडलं असतं? ऋतुचक्र चालूच राहिलं असतं. पडायचा तेव्हा पाऊस पडला असता, थंडी पडली असती, ऊन पडलं असतं. झाडांना नवी पालवी फुटली असती आणि पानगळही झाली असती. चक्रनेमिक्रमाने सगळं यथासांग होत राहिलं असतं. आपण दिवस मोजू लागलो म्हणून या सगळ्यांत काहीही बदल झाला नाही. मग का मोजायचे दिवस? आणि ही कालगणना करण्याचा प्रघात किती जुना आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज पाहू.

सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेला मानव शेती-पशुपालन करू लागला ख्रिास्तपूर्व दहा हजार वर्षांपासून. साधारण त्याकाळापासून स्थिर वसाहतींनी सुरुवात झाली. ख्रिास्तपूर्व सात हजारपर्यंत मानवी वसाहती चांगल्याच रुजल्या होत्या. ख्रिास्तपूर्व चार हजारपर्यंत या वसाहतींची मोठी शहरं होऊ लागली होती. उदरनिर्वाहापुरती शेती आणि पशुपालन करणारा माणूस आता स्वत:च्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन घेऊ शकत होता.

वाढीव उत्पादनाबरोबर त्याची साठवण, त्याची देवाणघेवाण, अर्थात व्यापार, असे अनेक नवेच व्यवहार उदयाला आले आणि गरजेचे झाले. पुढच्या हजार-एक वर्षांत शहरांची राज्यं झाली आणि समाजरचना अधिक जटिल, अधिक किचकट, अधिक क्लिष्ट झाली. याच सुमारास आणखी एक महत्त्वपूर्ण बदल घडला. सुमारे ख्रिास्तपूर्व पाच हजारपासून पाळीव प्राण्यांमध्ये घोड्यांचा समावेश झाला आणि पुढच्या हजारभर वर्षांत दूरदूरपर्यंत प्रवास शक्य आणि सुलभ झाला- रथात बसून किंवा घोड्यावर बसून!

थोडक्यात, ख्रिास्तपूर्व सुमारे चार हजारपर्यंत दूरदूर पसरलेली विविधं राज्यं, त्यांच्यात अनेक शहरं, या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये चालणारा व्यापार, प्रवासाची साधनं असं अगदी आधुनिक काळाशी साधर्म्य सांगणारी व्यवस्था निर्माण झाली होती.

आणि साधारण याच सुमारास कॅलेंडरं वापरात आली. हा निव्वळ योगायोग नव्हता. काळाची गणना ही त्या काळाची गरज होती!आणि त्याला कारण होतं नवी राज्यव्यवस्था आणि वाढता व्यापार. म्हणजे कसं ते खोलात जाऊन पाहू.

राजांना त्यांचा राज्यशकट विनासायास हाकता येण्यासाठी कॅलेंडर्स गरजेची होती. कदाचित म्हणूनच की काय, सगळी कॅलेंडर्स कोणत्या ना कोणत्या राजाने अमलात आणली असं दिसतं. हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी मुळात आधी ‘राजा’ किंवा ‘राज्य’ म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. राजा हा शासक असतो. तो शासन करतो. म्हणजे नेमकं काय करतो तर प्रजेला काही महत्त्वाच्या सेवा पुरवतो. सर्वसामान्यपणे या सेवा म्हणजे कायदा-सुव्यवस्था आणि शत्रूंपासून संरक्षण या असतात. पण या सेवा पुरवायच्या तर त्यासाठी काही खर्च येणार. हा खर्च तो प्रजेकडून कररूपाने वसूल करतो.

पण कर म्हटले की ते कधी गोळा करायचे हे गणित आलं. आणि हे गणित सोडवण्याकरता ‘काळाचे गणित’ आलं. आणि ‘काळाचे गणित’ आलं की कॅलेंडर आलंच. तेव्हा, राजेलोकांनी कॅलेंडरं अमलात आणली ती राज्यव्यवहाराच्या सोयीकरता.

पण कॅलेंडरं, अर्थात विश्वसनीय कालगणना ही व्यापारासाठीदेखील गरजेची होती. त्यामुळे व्यापाराच्या गरजा लक्षात घेऊन राजेलोकांनी या संकल्पनेला पाठबळ दिलं असं असू शकतं किंवा ही संकल्पना उपलब्ध होतीच, ती व्यापारासाठी गरजेचीही होती आणि सोयीचीही. त्यामुळे तिच्या उपलब्धतेनंतर व्यापार-उदीम वाढला असंही असू शकतं.

तेव्हा, /कॅलेंडर ही व्यवहार, व्यापार आणि व्यवस्था (राज्यव्यवस्था) या तीन ‘व्य’कारांची गरज होती/. आणि हे सत्य त्या नावातच दडलेलं आहे. कॅलेंडर! मूळ लॅटिन शब्द ‘कॅलेंड’. आणि कॅलेंड म्हणजे देण्याघेण्याचे सगळे व्यवहार ज्यात लिहून ठेवायचे अशी वही — खातेवही किंवा खतावणी. आणि मग महिन्याच्या पहिल्या दिवशी ही देणीघेणी पूर्ण करायची. म्हणून त्या दिवसाचं नावंही ‘कॅलेंड’!

काय गंमत आहे पाहा. हजारो वर्षांपूर्वी व्यापार-व्यवहाराच्या सोयीसाठी ही कॅलेंडरं अस्तित्वात आली आणि आजही अगदी घराघरांतून त्याच कामासाठी कॅलेंडरचा उपयोग होतो! पुढच्या आठवड्यात दूधवाला, पेपरवाला बिलं घेऊन येतील तेव्हा ती बिलं तपासण्यासाठी आपण आधी कॅलेंडरमधल्या नोंदी पाहू! थोडक्यात काय, तर कॅलेंडरचं पान उलटल्याखेरीज व्यवहाराचं पानंही हलत नाही!

@KalacheGanit

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kalache.ganit@gmail.com