१९४६ मध्ये सत्यशोधक समाज, वाई या संस्थेच्या स्थापनेचा रौप्य महोत्सव बाह्म समाज, वाई या संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची तीन व्याख्याने योजण्यात आली होती. १८, १९ आणि २० जून, १९४६ रोजी संपन्न या व्याख्यानांचे विषय पुढीलप्रमाणे होते- १) सत्यशोधक समाज व महात्मा फुले, २) सत्यशोधक समाज व ब्राह्म समाज, ३) शेतकरी व कामकरी जनतेचे स्वराज्य, पैकी पहिले व्याख्यान प्रभावी झाल्याने ते बहुप्रसारित करण्याच्या उद्देशाने पुस्तिकेच्या रूपात १९४७ मध्ये प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाईमार्फत प्रकाशित करण्यात आले. त्याचे शीर्षक होते, ‘ज्योति-निबंध’. हे भाषण सत्यशोधक कार्यकर्ते रा. ना. चव्हाण यांच्या धडपडी व पाठपुराव्यामुळेच पुस्तकरूपात आले असून, त्याला रा. ना. चव्हाण यांची छोटी प्रस्तावनाही आहे.
‘ज्योति-निबंध’मध्ये तर्कतीर्थांनी महात्मा जोतिराव फुले यांना ‘हिंदुस्थानातील सामाजिक गुलामगिरीविरुद्ध बंड करणारा पहिला पुरुष’ म्हटले आहे. हा निबंध तर्कतीर्थांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांना अर्पण करून त्यांनी सत्यशोधक समाज, बाह्म समाज व प्रार्थना समाज असे जे त्रिविध स्वरूपाचे सामाजिक कार्य केले, त्याप्रति एकप्रकारे कृतज्ञताच व्यक्त केली आहे.
प्रस्तुत निबंधात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, भारतात ब्रिटिश सत्तेचा उदय होण्यापूर्वी ३०० वर्षे अगोदर पोर्तुगीज भारतीय किनाऱ्याला धडकले होते; पण ते व्यापारासाठी. ब्रिटिशांनी राज्यसत्ता स्थापन केली. राज्यसत्तेने जे बदल घडतात, ते व्यापाराने शक्य नसते. ब्रिटिश सत्तेने शिक्षण प्रसारातून धर्म नि समाज सुधारणांचे बीजारोपण केले. परिणामी, एतद्देशीय सुजाण नागरिक जागे झाले. त्यांनी बाह्म समाज, प्रार्थना समाज चळवळीतून धर्माचे जनमानसावरील गारुड शिथिल करीत धर्माला मानवसेवा व परिवर्तनाची जोड दिली. जडवादी विचार प्रचार, प्रसारातून ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकरांनी वैचारिक जागृतीद्वारे समाजमन प्रबुद्ध केले. दुसरीकडे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळ रुजून प्रबोधनाचे नेतृत्व महात्मा फुले यांच्याकडे आले. या ब्राह्मणेतर सुधारकांचे प्रश्न मागासलेल्या बहुसंख्य जनतेच्या जीवनाशी निगडित होते. शेतकरी, स्त्रियांचे प्रश्न महात्मा फुले यांच्या काळात ऐरणीवर आले होते. विवेक व बुद्धिप्रामाण्यवादाच्या कसोटीवर सामाजिक प्रश्नांची सोडवणूक अनिवार्य होऊन गेली होती. महात्मा फुले ज्या पद्धतीने प्रस्थापित वर्गाच्या एकाधिकारास आव्हान देत होते, त्यातून जी जागृती घडून येत होती, ती स्वत:च्या परिस्थितीची जाणीव होणाऱ्या समाजासाठी एकप्रकारे आत्मप्रत्ययशील होती. या परिस्थितीतूनही आपण आत्मोन्नती करू शकतो, असा विश्वास बहुजन समाजात निर्माण करण्यात महात्मा फुले यशस्वी ठरले. हेच त्यांचे समाजपरिवर्तन आणि सुधारणा कार्यातील खरे योगदान होते.
त्याकाळात सत्ताधारी ब्राह्मण वर्ग हा बहुजन व दलित वर्गास पशूप्रमाणे वागवत होता. रमणा, दान, दक्षिणा इ.तून अज्ञानी, गरीब जनतेचे नित्य शोषण व्हायचे, मुळातच संपन्न ब्राह्मणवर्ग अधिक श्रीमंत होत, कठोर नि क्रूर बनत निघाला होता. पेशवाईच्या काळातील या स्थितीस ब्रिटिश समन्यायी दृष्टीने दिलासा देत. त्यामुळे ब्राह्मण, पुरोहित वर्गाच्या वर्ण वर्चस्व, पक्षपातीपणास चाप बसला. महात्मा फुले यांनी याचे मूळ सर्वप्रकारच्या गुलामगिरीत असल्याचे सामान्यजनांना लक्षात आणून दिले. त्यासाठी त्यांनी ‘इशारा’, ‘शेतकऱ्याचा आसूड,’, ‘गुलामगिरी’सारख्या ग्रंथांची निर्मिती केली. यातून भोळेपणा व अंधश्रद्धा निर्मूलनास मदत झाली. शेतीक्रांतीचे प्रयत्न सुरू झाले. १८५७ चे बंड अपयशी ठरणे महात्मा फुले यांना पथ्यावर पडल्यासारखे वाटत होते. त्यांचे असे आकलन होते की, बंड यशस्वी ठरले असते तर परत पेशवाईचा मार्ग मोकळा झाला असता. या आकलनात तथ्य होते. वेद. आर्य, हिंदू इ. कल्पनांचा पुनरोदय म्हणजे परत गुलामशाहीचे आगमन ठरले असते, म्हणून महात्मा फुले प्रस्थापित वर्गाचा सर्वतोपरी विरोध करत. सत्यशोधक समाज प्रसाराद्वारे बहुजन वर्गाच्या सत्ता स्थापनेचाच तो द्रष्टा प्रयत्न होता. त्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले हे हिंदुस्थानातील सामाजिक गुलामगिरीच्या विरुद्ध बंड पुकारणारे पहिले पुरुष होते.