विसाव्या शतकाचे पाचवे दशक (१९४१ ते १९५०) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वैचारिक परिवर्तनांचा विचार करता भौतिक विचारधारांच्या प्रभावाचे होते. या काळात त्यांनी एकीकडे हिंदू धर्माची मार्क्सवादी दृष्टीने आलोचना करत ‘हिंदू धर्माची समीक्षा’ (१९४१) ग्रंथ सिद्ध केला, तर दुसरीकडे याच वेळी त्यांनी ‘जडवाद अर्थात् अनीश्वरवाद’ (१९४१) प्रबंध लिहिला. तर्कतीर्थांचे म्हणणे असे होते की, अनीश्वरवाद समजवायचा तर आधी जडवाद समजून घेतला पाहिजे. कारण जडवाद हा भौतिकवादाचा सकारात्मक (पॉझिटिव्ह) पक्ष आहे, तर अनीश्वरवाद अथवा नास्तिकवाद त्याचा अभावात्मक वा नकारात्मक (निगेटिव्ह) पक्ष होय.
जडवादाचे विवेचन करीत या प्रबंधात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, मूर्तवस्तू हेच अनुभव आणि मानवी व्यवहाराचे क्षेत्र आहे. वस्तू, अनुभव व व्यवहार या त्रयींशी जुळणारी विचारसरणीच मानवी समाज व जीवन व्यवहाराचे सशक्त साधन आहे. जड म्हणजे ज्ञान, संवेदना, जाणीव नसलेली वस्तू. तिचे अस्तित्व स्वतंत्र असते. ती चैतन्यरूप नसते. द्रव्याच्या जड, जीव व चेतन अशा तीन श्रेणी आहेत. अगोदर अचेतन, निर्जीव असलेले द्रव्य जीव व चेतन बनते ते कार्यकारण संबंधाने, चमत्कारांनी नाही. जीव स्वयंचलनशील, चयापचय क्रियायुक्त असतो. तेच त्याचे खरे चेतन, सजीव रूप होय. हे रूप विज्ञानाच्या परिणत व उच्च रचनेतून प्राप्त होते. ते वैज्ञानिक असते, दैवी असत नाही. या मूल धारणांवर जडवादाचे तत्त्वज्ञान उभे आहे. विज्ञानाचा उगम मुळातच जिज्ञासा, चिकित्सा वृत्तीतून झालेला आहे. त्यामुळे ज्याला कसोट्या, लक्षणे, प्रमाणे नाहीत, ते सर्व मिथ्या अशी जडवादाची विवेकी धारणा आहे. ती प्रमाण मानत जडवाद साकारला आहे. १) ज्ञाता व ज्ञेय नित्य परिवर्तनशील आहे. २) सद्वस्तू विनाशकारी नाही, ती अभावातून निर्माण होत नाही. ३) प्रत्येक वस्तू स्वभावसिद्ध गतिशक्ती असते. ती परिवर्तनशक्तीही असते. ४) रचना, योजना, नियमबद्धता, सुसंगती हा वस्तूचा मूळ धर्म असतो. या चार सिद्धांतांवर जडवाद हे भौतिक तत्त्वज्ञान आधारलेले आहे.
प्रबंधाच्या उत्तरार्धात तर्कतीर्थ अनीश्वरवाद मांडतात. त्यानुसार विज्ञान व तर्क या कसोट्यांवर ईश्वरतत्त्व कसे उतरत नाही, हे स्पष्ट केले गेले आहे. अनीश्वरवाद ही विचारसरणी विश्वनियंत्रक ईश्वरीय तत्त्व व सत्तेस नाकारणारी असून, ती भौतिक तत्त्वासच सत्य मानते. ईश्वर ही वैज्ञानिक कसोटीवर न उतरणारी संकल्पना आहे. ती कल्पना भ्रम व श्रद्धा मात्र आहे. ती बुद्धी व विवेकाच्या पासंगास उतरत नाही. निष्क्रिय, निराश, निरुपयोगी धारणेची ती फलनिष्पत्ती होय. तर्कतीर्थ या प्रबंधात ईश्वरसंबंधी पुढील धारणा तथ्यहीन असल्याचे सप्रमाण विवेचन करतात- १) ईश्वर विश्वाहून निराळा असून, तो विश्वप्रेरक आहे. २) हे जग ईश्वराने चमत्काराने निर्मिले आहे. ३) हे जग ईश्वराने स्वयंप्रेरणेने निर्माण केले आहे. ४) व्यक्त वा दृश्य जगत अव्यक्त वा अदृश्य तत्त्वाने निर्मिले आहे. ५) ईश्वरसत्ताच पूर्ण सत्य आहे. ६) विश्व म्हणजे परमेश्वर विचार वा प्रतिबिंब होय. ७) ईश्वरीय सत्तेवरच विश्वसत्ता अवलंबून आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी प्रस्तुत प्रबंधाचा समारोप करीत म्हटले आहे की, ‘‘मनुष्याच्या शुद्ध चारित्र्यास व वर्तनास ईश्वराच्या कल्पनेची आवश्यकता नाही, हे त्याच्या पवित्र चारित्र्याने व उदात्त विचारसरणीने आपोआप सिद्ध झालेले आहे. ईश्वर कल्पनेचा उपयोग करून मनुष्यजातीला अधोगतीला नेणाऱ्या स्वार्थी लोकांची जगात व जगाच्या इतिहासात वाण नाही. मनुष्याच्या सामाजिक व वैयक्तिक उन्नतीला पारलौकिक, अलौकिक व गूढ अशा ईश्वरविषयक कल्पनांची यापुढे मदत होणार नाही, खरे तर अडथळाच होणार आहे.’’
तर्कतीर्थांच्या ‘जडवाद अर्थात् अनीश्वरवाद’ या छोट्या प्रबंधाने (७० पृष्ठे) महाराष्ट्रात मात्र मोठे वैचारिक परिवर्तन घडवून आणले. प्रा. नरहर कुरुंदकरांची एक मुलाखत आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘एका पुस्तकाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावित झालो, ते लक्ष्मणशास्त्री जोशींच्या ‘जडवाद’ या पुस्तकामुळे… मी जडवादी झालो आणि नंतर नास्तिक झालो. स्नान शिल्लक राहिले, संध्या संपली.’’
drsklawate@gmail.com