कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडून जाणाऱ्यांचा गेल्या इतक्या दिवसांचा ‘भगवा’ चेहरा खरा मानायचा की त्यांना – भाजपनेते म्हणतात तसे-  ‘सिक्युलर’ मानायचे?

कदाचित कर्नाटकात भाजपची सत्ता आली तर हे सर्व पुन्हा भाजपत येतीलही! त्यांच्या आधीच्या पापांचे काय एवढे घेऊन बसायचे? गोमूत्र शिंपडले की झाले!

अलीकडे नैतिकता या मूल्याची सार्वत्रिकता नष्ट होऊन तेदेखील पक्ष-सापेक्ष झाले आहे हे खरे असले तरी म्हणून एकाचा घ्राणेंद्रियांतील श्लेष्मल त्वचा जाळेल असा दरुगध दुसऱ्यासाठी परिमल कसा काय ठरतो, हा प्रश्न उरतोच. गेली काही वर्षे तो सातत्याने समोर येत असला तरी महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांत त्याची तीव्रता खऱ्या अर्थे जाणवली आणि सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांत तर हाच यक्षप्रश्न बनल्याचे दिसते. काँग्रेस वा राष्ट्रवादी वा अन्य ‘पापी’ पक्षांत असताना भ्रष्टाचारादी उद्योगांसाठी टीकेचे धनी झालेले अनेक गणंग २०१९ साली ‘भाजप’त गेले आणि ते थेट ‘हभप’ असल्यासारखे मानले जाऊ लागले. याच्या बरोबर उलट चित्र सध्या कर्नाटक निवडणुकांत दिसते. त्या राज्यात इतके दिवस जे ‘हभप’सदृश, जाज्वल्य राष्ट्रप्रेमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रउभारणीच्या महान कार्यातील साथीदार होते ते अचानक हा मार्ग सोडून ‘पापी, राष्ट्रद्रोही’ इत्यादी काँग्रेसमधे जाताना दिसतात. त्यामुळे त्यांचा इतके दिवसांचा हिंदूधर्मप्रेमी ‘भगवा’ चेहरा खरा मानायचा की त्यांना भाजपनेते म्हणतात तसे ‘सिक्युलर’ मानायचे? इतके दिवस भाजपमधे होते म्हणून पुरोगाम्यांनी त्या सर्वास दूर ठेवले असणार. ते आता धर्मनिरपेक्ष, सहिष्णू इत्यादी मानले जाणार काय? कर्नाटकातील पक्षांतराबाबत पडणाऱ्या प्रश्नांस भिडण्याआधी तेथील आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या वर्तणुकीतून पडणाऱ्या प्रश्नांबाबत..

उदाहरणार्थ सत्ताधारी भाजपस घराणेशाहीचा कोण तिटकारा! देशाचे जे काही वाटोळे झाले ते घराणेशाहीमुळे आणि जे काही बरे होत आहे ते या घराणेशाहीस उलथून पाडणाऱ्या भाजपमुळे असे आपणांस सांगितले जाते. या सत्याविष्काराने भक्तमंडळी थक्क होतात. तथापि कर्नाटकातील चित्र काय सांगते? माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे सुपुत्र बी. वाय. विजयेंद्र, विजयनगरचे आमदार आनंद सिंह यांचे सुपुत्र, आमदार उमेश कट्टी यांचे तर सुपुत्र आणि बंधूही, खासदार उमेश जाधव यांचे चिरंजीव, दुसरे खासदार अण्णासाहेब जोले यांच्या सौभाग्यवती अशा अनेक घरांतील घरोब्यांस भाजपने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. तेव्हा घराणेशाही हा मुद्दा कर्नाटकापुरता तरी भाजपने ‘सायिडग’ला वा ‘ऑप्शन’ला टाकलेला दिसतो. दुसरे असे की वयाच्या पंचाहत्तरीनंतरच्या ज्येष्ठांस भाजपत निवृत्त व्हावे लागते. त्यानंतर सगळय़ांचेच पुनर्वसन मार्गदर्शन मंडळांत होते असे नाही. पण या वयानंतरच्या नेत्यांस घरी जावे लागते. येडियुरप्पा यांना याच वय या निकषामुळे पदत्याग करावा लागला. सद्य:स्थितीत खराब हवामानामुळे पक्षाचे सुकाणू भाजपने भले त्याच येडियुरप्पा यांच्या वयस्करहाती दिले असेल. पण त्यांना पंचाहत्तरीमुळे मुख्यमंत्रीपदावरून उतरावे लागले, हे सत्य. आता माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनाही भाजपने नारळ दिला त्या वेळी त्यांचे ‘वाढते वय’ हे कारण असल्याची चर्चा झाली. वास्तविक ते ६७ वर्षांचे आहेत. पण समजा वय हा निकष होता हे मान्य केले तर जी. एच. थिप्पारेड्डी यांच्यासारख्यांचे काय, हा प्रश्न भाजपच्या यादीवर नजर टाकली तरी पडतो. कारण हे थिप्पारेड्डी भाजप ज्या वयात निवृत्त व्हायला लावतो त्या ७५ वर्षांचे आहेत. याचबरोबर सत्ताधारी भाजपचा दुसरा महत्त्वाचा सद्गुण असा की तेथे पक्षनिष्ठेचा खूप आदर होतो. त्याचमुळे वर्षांनुवर्षे पक्षात, संघात सतरंज्या घालण्या-काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्यांचेही त्या पक्षात योग्य वेळी भले होते. अर्थात ही योग्य वेळ कोणती या प्रश्नाचे उत्तर त्यांना काही मिळत नाही, हे खरे असेलही. पण म्हणून भाजपच्या स्वपक्षप्रेमावर, स्वपक्षनिष्ठांवर शंका घेता येणार नाही. म्हणून हा पक्ष पक्षांतरितांनाही दूर ठेवतो. पण या ऐतिहासिक सत्यावर विश्वास ठेवावा तर २०१९ साली काँग्रेस आणि/अथवा जनता दल (सिक्युलर) या पक्षांचा त्याग करून भाजपशी पाट लावणाऱ्या जवळपास १७ पैकी १४ नेत्यांस उमेदवारी देण्यात आल्याचे सत्य समोर येते. त्याचे काय करायचे, हा प्रश्न. अर्थात पक्षांतरितांचे भाजपत भले होते हे याआधीही अनेकदा दिसून आलेले आहेच. कर्नाटकात ते पुन्हा दिसते इतकेच.

तेव्हा हुबळी-धारवाडचे गेल्या सहा खेपेचे आमदार, ज्येष्ठ लिंगायत नेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी उपमुख्यमंत्री, बेळगावीचे आमदार लक्ष्मण सावदी, भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली शिक्षा झालेले आणि तरीही भाजपचे नेते असलेले, दोन वेळचे आमदार नेहरू ओलेकर, मुदगेरीचे आमदार एम.पी. कुमारस्वामी, विधान परिषदेचे सदस्य, होसादुर्गचे आमदार गुलिहट्टी शेखर, सनातनी पक्षबदलू भाजपचे आर शंकर आदींनी मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रउभारणी करण्याचे सोडून काँग्रेस वा जनता दलांत प्रवेश केला. यातील शंकर हे तर इतके पक्षबदलू आहेत की त्यांना ‘पेण्डय़ुलम’ शंकर या नावानेच ओळखले जाते. या सर्वास अर्थातच भाजपने उमेदवारी नाकारली. इतकी वर्षे ‘पार्टी विथ ए डिफरन्स’ अशा स्वघोषित विशेषणाने ओळखल्या जाणाऱ्या, सच्च्या देशप्रेमींचा समुच्चय असलेल्या आणि सत्ता हे साध्य नव्हे तर साधन असे मानणाऱ्या भाजपचा त्याग करण्याचे पाप या मंडळींनी केले. त्या सर्वास आता अन्य पक्षांतून उमेदवारी मिळाली असेल वा लवकरच मिळेल. त्याच वेळी अन्य पक्षीय नेत्यांच्या मनांतील राष्ट्रप्रेमास जरा ओहोटी लागलेली दिसते. कदाचित वातावरणातील उष्म्यामुळे त्यांच्या राष्ट्रभक्तीस कोरड पडली असावी. असे वाटायचे कारण म्हणजे इतर पक्षांतून या वेळी राष्ट्रउभारणीच्या ध्येयाने झपाटलेले भाजपकडे येताना दिसत नाहीत. एरवी निवडणुकांचा सुगावा लागला रे लागला की विविध पक्षांतील देशप्रेमी वगैरे मोठय़ा संख्येने भाजप कार्यालयांसमोर रांगा लावून उभे दिसतात. त्यातील बऱ्याच जणांना त्यांच्या त्यांच्या पक्षाने उमेदवारी नाकारलेली असते. त्यानंतर ‘मोदीजींच्या नेतृत्वाखाली(च) देश प्रगतिपथावर घोडदौड करू शकतो’ याचा साक्षात्कार त्या सर्वास होतो आणि मग भाजपही मोठय़ा उदार अंत:करणाने त्या सर्वास देश महान करण्याच्या कामात स्वयंसेवक म्हणून आपल्या खाती जमा करून घेताना दिसतो. कर्नाटकात मात्र या वेळी चित्र वेगळे दिसते. त्या राज्यात देशप्रेमभारित भाजपमधून अनेक जण देशबुडव्या काँग्रेसकडे जथ्याजथ्याने निघालेले दिसतात. कदाचित कर्नाटकात भाजपची सत्ता आली तर हे सर्व भारतमातेचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी पुन्हा भाजपत येणारच नाहीत आणि भाजप त्यांना वा अन्यांना आपले म्हणणारच नाही असे नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शेवटी प्रश्न हा देश उभारण्याचा आहे. त्यात हयगय करून चालणारे नाही. भाजपला तर नाहीच नाही. ७० वर्षांच्या दु:शासनाने देशाची वाट लागली असून तो पुन्हा उभा करावयाचा तर या सर्व महानुभावांचे सहकार्य तर लागणारच. अशा देशनिर्मितीउत्सुक नेत्यांच्या आधीच्या पापांचे काय एवढे घेऊन बसायचे? गोमूत्र शिंपडले की झाले! अशीही वाल्यास वाल्मीकी झाल्यावर गौरवणारी आपली संस्कृती! आता कालौघात वाल्याचे वाल्मीकी होणे, वाल्मीकींचे पुन्हा वाल्या बनणे वगैरे होणारच. गळय़ातील अंगवस्त्र घालण्या-बदलण्याइतके हे सोपे आहे. राजकीय पक्ष, विचारधारा वगैरे मुद्दे कालबाह्य आहेत. महत्त्व आहे ते गळय़ातील अंगवस्त्रास! म्हणून राजकीय पक्ष हेच एक अंगवस्त्र बनले असून हे घालायचे आणि ते काढायचे! हे अंगवस्त्र वा वस्त्रे बदलण्याची सुविधा म्हणजेच सध्याची लोकशाही! आपण तर लोकशाहीची जननीच! तेव्हा लोकशाहीत महत्त्व असलेल्या निवडणुकांच्या तोंडांवर ही अंगवस्त्रे काढली-घातली गेली तर त्यात काय एवढे?