लग्न करायचे ते फक्त मूल जन्माला घालण्यासाठी असे ज्यांना वाटते, त्यांनाच पन्नाशीनंतर केलेल्या लग्नाचा काय उपयोग असा प्रश्न पडू शकतो…

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि बीजेडीचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्या ३ मे रोजी जर्मनीत झालेल्या लग्नाची बातमी आल्यासरशी अनेक समाजमाध्यमी वीर आणि वीरांगना नेहमीप्रमाणे एकदम चेकाळून गेले. आता ते चेकाळले आहेत, असे म्हणणे हे पीतांबर पिवळा आहे, असे म्हणण्यासारखेच. कारण हातात मोबाइल नामक सहज उपलब्ध होणारे यंत्र, स्वस्तात उपलब्ध होणारा डेटा आणि डोक्यात राष्ट्रवादापासून सांस्कृतिक वर्चस्ववादापर्यंतच्या साऱ्याचा भुसा भरलेला असेल तर कुणाबद्दलही, कशाबद्दलही, कुठेही आणि काहीही प्रतिक्रिया द्यायचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो असा या मंडळींचा समज असल्याने त्यांना चेकाळण्यासाठी कोणतेही निमित्त पुरते. त्यात ती व्यक्ती सार्वजनिक पातळीवर प्रसिद्ध असेल तर तिची नैतिकता तपासण्याचा आपल्याला जणू मक्ताच मिळाला आहे असे या समाजमाध्यमी मंडळींना वाटते. त्यामुळे आता पन्नाशीत लग्न कशाला करायचे, त्याचा काय उपयोग, इथपासून तऱ्हेतऱ्हेच्या टिप्पण्या केल्या गेल्या. त्यापैकी बऱ्याच हीन पातळीवरच्या, कुचाळक्या करणाऱ्याच होत्या. सार्वजनिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीला आजकाल ट्रोलिंग वगैरेला सामोरे जावेच लागते, पण एखादी गोष्ट विनोदाने घेणे, गंमत करणे यातली सीमारेषा ओलांडून ट्रोलिंग होते, तेव्हा ते त्या समाजाची यत्ता दाखवणारे असते.

खरे तर महुआ मोइत्रा आणि पिनाकी मिश्रा या आजीमाजी खासदारांनी वैयक्तिक आयुष्यात काय करावे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न. त्यांनीच कशाला, इतर कोणीही कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे याच्याशी इतरांना काही देणेघेणे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणाही प्रसिद्ध व्यक्तीच्या वैयक्तिक पातळीवरील वागण्याचा सामाजिक पातळीवर उपद्रव होत नाही, तोपर्यंत कोणालाही त्याबाबत बोलायचा काहीही अधिकार नाही. तरीही महुआ मोइत्रा यांच्या या लग्नाबाबत समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया उमटल्या, आजच्या भाषेत ट्रोलिंग झाले, ते ‘दगड कुणी मारायचा’ या गोष्टीची आठवण करून देणारे होते. यापलीकडे जाऊन इतरांच्या लग्नामध्ये नाक खुपसताना आपल्या आसपास लग्नसंस्थेचे काय चालले आहे याचा आपण कधी गांभीर्याने विचार करणार?

अगदी ताजे असलेले वैष्णवी हगवणे प्रकरण हे आपल्या लग्नसंस्थेचे काय झाले आहे याचे दुर्दैवी उदाहरण. सासरच्या लोकांच्या पैशांच्या हव्यासापोटी एक तरुण मुलगी जिवानिशी जाते, पण तिच्या लग्नात दिल्या गेलेल्या भेटवस्तू, केला गेलेला खर्च यात काही चुकीचे आहे, असे तिच्या घरच्या लोकांना चुकूनही वाटत नाही. उलट ते प्रेमविवाहावरच खापर फोडत राहतात. आजही अनेक पालकांना त्यांच्या मुलाने किंवा मुलीने स्वत:साठी निवडलेला जोडीदार जात, धर्म, वर्ग या सगळ्या चौकटीत बसणाराच असावा लागतो. तसे नसेल तर त्या जोडप्याला एक तर अनेक दिव्यांमधून जावे लागते, नाही तर त्याचा हात सोडून द्यावा लागतो. लग्न कुणाशी करायचे याचा आजही अनेक तरुण/तरुणींना आपापला निर्णय घेता येत नाही. त्यासाठी ते पालकांवर, वधू-वर संशोधनाच्या पारंपरिक पद्धतीवरच अवलंबून असतात. लग्नानंतरही त्या जोडप्याचे एकमेकांशी कसे काय जमते यापेक्षाही ते लग्न टिकण्यात वा मोडण्यात त्यांच्या पालकांचाच मोठा हात असतो. पण रूढीपरंपरा जिवापाड पाळण्याच्या नादात ही पालकमंडळी कोणत्याही जोडप्याने लग्न कशासाठी करायचे या मूळ हेतूलाच हरताळ फासताना दिसतात. आजघडीच्या पिढीच्या जीवनातील गरजा, ताणेबाणे यांचा फारसा विचार न करता आहे ती व्यवस्था टिकवून ठेवण्याचा अट्टहास लग्नव्यवस्थेला अधिकाधिक कर्मठ बनवतो आहे. अशा कर्मठ व्यवस्थेला धडका मारण्याचे प्रयत्नही तितक्याच जोमाने होतात. राज्यव्यवस्थेने कितीही निर्बंध आणायचे प्रयत्न केले तरी लग्नव्यवस्थेचे साचे मोडू पाहणाऱ्या आणि त्यासाठी ‘लिव्ह इन’मध्ये राहू पाहणाऱ्या जोडप्यांचे वाढत चाललेले प्रमाण हे याचेच उदाहरण. पण जात, धर्म यांच्या पलीकडे जाणारे आणखी किती तरी साचे या व्यवस्थेने घडवलेले आहेत. अमका रंग, वय, गाव, शहर, व्यवसाय अशा कोणत्याही गोष्टी एकमेकांशी जुळणाऱ्या नसतील तर कान आणि डोळे टवकारले जातात. या सगळ्यात एक बाब अनेकदा बाजूला टाकली जाते ती त्या दोन जिवांमधली ‘केमिस्ट्री’.

लग्न करण्यामागे वंशसातत्य राखणे या कोणत्याही जीवाच्या आदिम प्रेरणेबरोबरच स्वत:चे कुटुंब उभारणे, सहजीवनासाठीचा जोडीदार मिळवणे, आयुष्यात स्थिरस्थावर होण्याची सुरुवात करणे अशी अनेक कारणे असतात, हे खरे असले तरी या कारणांपलीकडे जाऊन कोणाही दोन जीवांना एकत्र यावे, आपले दोघांचे सहजीवन असावे असेही असू शकतेच. मुख्य म्हणजे ते वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वाटू शकते. असे वाटणारी जोडपी एकत्र येतातही. पण लग्न करायचे ते फक्त मूल जन्माला घालण्यासाठी असे ज्यांना वाटते, त्यांनाच या लग्नाचा काय उपयोग असा प्रश्न पडू शकतो. त्यांना सहजीवन ही संकल्पनाच समजलेली नसते, असे म्हणावे लागते. दोन जीवांना असोशीने एकत्र आणणारी ‘केमिस्ट्री’ अनाकलनीय अशा जोड्या जमवू शकते. ज्यांना स्त्रीपुरुष या पारंपरिक सहजीवनाकडे खुलेपणाने बघता येत नसेल, तर ते समलिंगी सहजीवनाकडे कसे पाहतील हे वेगळे सांगायला नको.

लग्नसंस्था आणि पुढे तिचीच पोटउपज असलेली कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा कणा आहे, असे सांगितले जाते आणि तिची आताची स्थिती तशीच राहावी असा आग्रह धरला जातो. पण हीच व्यवस्था काळानुरूप कशी बदलत गेलेली आहे, हे किती जणांना माहीत असते? इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक विवाहसंस्थेच्या परिवर्तनशीलतेचा आलेख तर मांडतेच, शिवाय मानवसमूह सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर स्थित्यंतराच्या किती टप्प्यांमधून गेला आहे, याचे त्यातून होणारे दर्शन दिङ्मूढ करणारे आहे. केवळ लग्नासारख्या सामाजिक रूढीबाबतच नाही तर इतरही अनेक प्रथापरंपरांबाबत १००-२०० वर्षांच्या आगेमागे दिसणाऱ्या गोष्टींना कवटाळून त्या अपरिवर्तनीय मानणे हे किती खुळचटपणाचे आहे, हे विवाहसंस्थेचा इतिहास बघितला तर समजते.

आजही थेटपणे डोळ्यांसमोर दिसत नसले तरी आपला समाज विवाहसंस्थेच्या स्थित्यंतरामधून जातोच आहे. एकत्र कुटुंब पद्धती की विभक्त हा प्रश्न तर केव्हाच निकाली निघाला आहे. मुळात पंचविसेक वर्षांपूर्वी होते तसे पारंपरिक पद्धतीचे कुटुंब भविष्यात असेल का असाच प्रश्न आहे. करिअर महत्त्वाचे मानून लग्नच करायचे नाही, असे ठामपणे सांगणाऱ्या मुली थोड्याफार प्रमाणात दिसू लागल्या आहेत. लग्नसंस्थेला, कुटुंबव्यवस्थेला धक्का देणारा हा पहिला मोठा घटक असणार आहे. लग्न करेन, पण मूल नको हे निर्भीडपणे सांगणाऱ्या मुली आणि त्यांचे म्हणणे स्वीकारणारी मुले समाजात वावरत आहेत. जबाबदारीने ‘डिन्क’- अर्थात ‘डबल इन्कम नो किड्स’ धोरण अंगीकारून आनंदाने जगणारी जोडपी आहेत. आपल्या वयापेक्षा १०-१५ वर्षांनी मोठ्या स्त्रीशी लग्न करणारे पुरुष दिसू लागले आहेत. आणखी काही वर्षांनंतर आपला मुलगा किंवा मुलगी सहजीवनाचा जोडीदार म्हणून समलिंगी व्यक्तीला आपल्यासमोर आणून उभे करू शकतात ही शक्यता आजच्या पालकांना सतावू लागली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही घुसळण आपल्या समाजात होते आहे, कुटुंबव्यवस्थेला ती धक्के देते आहे. त्यातून सगळीच मोडतोड होईल. कदाचित आणखी चांगली व्यवस्थाही उभी राहील. पण ते ज्यांना बघायचे नसते, त्यांना एखादी महुआ मोइत्रासारखी व्यक्ती दिसते. आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून या वृत्तीने ते तिला ‘ट्रोल’ करत राहतात, एवढेच.