आपल्या घरामध्ये, संघटनेमध्ये वा पक्षामध्ये कोणास प्रवेश द्यावयाचा आणि कोणास नाकारायचा तो संबंधित व्यक्ती वा संघटना/ पक्ष यांच्या धुरीणांचा निर्णय. त्यात इतरांस पडावयाचे कारण नाही. घरातील वा संघटना/ पक्षातील अन्य कोणास नव्या येणाऱ्याबाबत काही आक्षेप नसेल तर त्यावर इतरांनी भाष्य करण्याची गरज नाही. हे तत्त्व आणि हा युक्तिवाद बिनतोड. तेव्हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे पान कोणा नवनवीन गणंगापासून हलत नसेल आणि एकापेक्षा एक नामचीन मान्यवरांस आपल्या पक्षात घेण्याची गरज त्या पक्षात वाटत असेल तर इतर राजकीय पक्ष वा व्यक्तींस त्याची उठाठेव करण्याची आवश्यकता नाही हेही मान्य. तरीही भाजपत जाणाऱ्या नव्या नामचिनांच्या प्रवेशाची दखल घ्यावी लागते. ती का? तसे पाहू गेल्यास सुधाकर बडगुजर वा बबन घोलप या गणंगोत्तमांची दखल सोडा, पण त्यांचे नामोल्लेखसुद्धा या स्तंभात करावेत असा त्यांचा लौकिक नाही. हे क्षुद्र जीव काय करतात याच्याशी ‘लोकसत्ता’स अजिबात देणेघेणे नाही. तरीही त्यांचा भाजप प्रवेश हा संपादकीय भाष्याचा विषय ठरतो.
त्याचे कारण त्यांच्याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णा हजारे इत्यादींनी याआधी केलेली विधाने वा घेतलेली भूमिका. यातील नाशिक शिरोमणी बडगुजर यांची तर ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हायला हवी असे फडणवीस यांचे मत होते. तशी घोषणाही त्यांनी विधानसभेत केली होती. पाकिस्तानवासी कुख्यात दाऊद इब्राहिम याचा कोणी सलीम कुत्ता नामे साथीदार हा म्हणे या बडगुजराचा परिचित. या स्नेही कुत्तासमवेत (की कुत्त्यासमवेत) बडगुजरांनी मौजमजा केल्याची ध्वनिचित्रफीत भाजपच्या नैतिक शिरोमणींनी प्रेमादराने अनेकांस पाठवली होती. त्यानंतर फडणवीस यांच्यासह त्यांच्या पक्षातील नवहिंदुत्ववादी कु. नितेश राणे आदींनी याविरोधात झोड उठवली होती. ते सर्व आता मागे पडले आणि या बडगुजरास भाजपने पवित्र करून घेतले. राज्याचे गृहमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे. या बडगुजरास घेताना त्याच्याविरोधात नोंदल्या गेलेल्या २९ गुन्ह्यांचे, तडीपारीचे आता काय होणार, यावर फडणवीस यांनी काही भाष्य करावे. खरे तर त्यांच्याबाबत फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी याआधी केलेल्या विधानांचा अपवाद आणि अपमान करण्याचे कारण नाही. कारण ‘अजित पवार यांचे स्थान आर्थर रोड जेलमध्ये आहे’ असे विधान करणाऱ्या, त्यांना आपण कसे ‘चक्की पिसिंग अँड पिसिंग’ करायला लावू त्याचे आश्वासन देणाऱ्या फडणवीस यांनी याच अजितदादांस उदार अंत:करणाने वित्तमंत्रीपद कसे देऊ केले हा इतिहास ताजा आहे. त्याचीच पुनरावृत्ती होऊन या बडगुजरास नाशकात पुढील वर्षी भरणाऱ्या ‘कुंभमेळ्या’च्या नियोजनाची जबाबदारीही फडणवीस यांनी दिल्यास त्यांच्या पाठीराख्यांस धक्का बसू नये. त्या परिसरात भाजपचे कार्य सिद्धीस नेण्यास फडणवीस यांचे हनुमान गिरीश महाजन सक्षम आहेतच. पण त्यांचे हात बळकट करण्यास या बडगुजराची मदत होऊ शकेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. त्याचा रास्त विनियोग करण्याकामी चर्मोद्याोग घोटाळ्यात चांगली तीन वर्षांची सक्तमजुरी ठोठावल्या गेलेल्या बबनराव घोलप यांचे अनुभव भाजपस उपयोगी पडू शकतील. आणि या पुण्यकार्यात कोणी आडवे आलेच तर त्यास आडवे करण्यात बडगुजराची मदत मिळेल. अशा मदतीचा देदीप्यमान इतिहास भाजपच्या नावे महाराष्ट्रात तरी कोरला गेलेला आहेच. जसे की उल्हासनगरातील पुण्यश्लोक पप्पू कलानी! त्यांच्या कथित साहचर्यावरून भाजपने शरद पवार यांस कसे लक्ष्य केले हे महाराष्ट्राने अनुभवले. परंतु राष्ट्रविकासार्थ याच पप्पूची पप्पी घेण्यास भाजप कचरला नाही. तेच भाग्य वसईतील पुण्यपुरुष भाई ठाकूर आणि कुटुंबीयांसही लाभले. भाजपचे अत्यंत सत्त्वगुणी नेते जे की गोपीनाथ मुंडे यांनी या भाई ठाकूर आणि शरद पवार संबंधांबाबत राज्यभर आवाज उठवला. परंतु वसईच्या उद्धारार्थ फडणवीस यांनी या ठाकूर परिवाराशीही ‘भाई’चारा वाढवला. आज उल्हासनगर वा वसईत जो काही विकास दिसतो आहे तो भाजपच्या या औदार्यामुळेच याबद्दल कोणाच्याही मनात तिळमात्र शंका असणार नाही. भ्रष्टाचाराचा आरोप झालेले पोलीस अधिकारी, एन्काउंटर स्पेशालिस्ट, भ्रष्टाचाराचा आरोप झालेले कंत्राटदार, ज्यांच्याविरोधात व्यभिचाराच्या तक्रारी जाहीरपणे केल्या गेल्या असे अनेक पुरुषोत्तम अशा अनेकांस भाजपने आपले म्हटले आणि त्यांचे पाप धुऊन टाकले. ज्ञानेश्वर ‘पसायदाना’त ‘दुरितांचे तिमिर जाओ’ अशी इच्छा व्यक्त करतात. त्यांची ती इच्छा शब्दश: पूर्ण करणारा पक्ष म्हणजे भाजप. तो तिमिरासकट दुरितालाच आपले म्हणतो. आणि असे हे तिमिरकारक दुरित एकदा का ‘आपले’ झाले की ते दुरित राहतच नाहीत आणि पक्षाच्या नैतिक तेजात त्यांचे तिमिरही नाहीसे होते. प्रश्न इतकाच की तिमिर दूर करण्याच्या भाजपच्या या तेजामुळे भारतवासीयांचे डोळे दिपून त्यांस अंधत्व येते की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते. बहुसंख्य भारतीयांस भाजपच्या या तेजाची खरे तर सवय झाली असेल. पण ज्यांस ती झालेली नाही त्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम हा बडगुजर वा घोलप निश्चितपणे करतील. याच्या पुढचा टप्पा काय असेल?
अखंड हिंदुस्थान. ते एकदा झाले की पाकिस्तान, बांगलादेश वा अफगाणिस्तान असे काही राहणारच नाही. सर्व काही या महान भारतवर्षाचा भाग झालेले असेल. हा सगळा परिसर ‘लोकशाहीची जननी’ असल्यामुळे आणि या जननीने हे प्रदेशही सामावून घेतल्यामुळे तेथेही निवडणुका होतील. येथील निवडणुकांसाठी सलीम कुत्ताच्या स्नेह्यास भाजपने आपले म्हटले. सलीम कुत्ता हा पाकिस्तानवासी दाऊदच्या परिवारातील. पण अखंड हिंदुस्थान झाल्यास पाकिस्तानही आपलेच होणार असल्याने सर्व पाकिस्तानीही आपलेच होतील आणि त्यांनाही निवडणुकांच्या निमित्ताने जवळ करता येईल. तसेच तालिबानचेही. अफगाणिस्तानच भारतात आल्यावर तालिबानीही आपल्यात येतील. त्यांनाही लोकशाहीचे महत्त्व कळेल. मग तेथेही निवडणुका होतील. मग तालिबानीही आपलेच. बांगलादेशच्या शेख हसिना यांना असेही आपण आपल्यात घेतलेलेच आहे. अखंड हिंदुस्थान झाले की महंमद युनूसही आपले आणि बेगम खलिदा झिया आणि त्यांचा पक्षही आपलाच. मग तेथे होणाऱ्या निवडणुकांत आणखी कोणी सोयीने जवळ घेता येतील. तसे झाल्यास बिचाऱ्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांस जे सहन करावे लागले, तशी वेळ अन्य कोणावर येणार नाही. तुरुंगवास भोगून आलेल्या या नवाबांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप भाजप आणि अन्य अनेक नवहिंदुत्ववाद्यांकडून होतो. भाजप आणि हिंदुत्ववादी आरोप करतात म्हणजे तो खराच असणार. त्याचमुळे त्यांच्या राष्ट्रवादी सहभागास खऱ्या राष्ट्रवादी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. अर्थात त्याचे पुढे काय झाले, हे माहीत नाही. नावापुरत्या ‘राष्ट्रवादी’तील ही नवाबी उपस्थिती राज्य भाजपने, म्हणजे अर्थातच देवाभाऊंनी, गोड मानून घेतली असावी.
एकदा का अखंड भारत झाला आणि या अखंड भारतावर भाजपची सत्ता स्थापन झाली की हे असले क्षुल्लक मुद्दे उपस्थितच होणार नाहीत. नुसते बडगुजरच काय; पण सलीम कुत्त्यालाही आपले म्हणता येईल. इतके पचवल्यानंतर आणखी काहींची काय मातबरी! तेव्हा अखंड भारत हाच या सगळ्यावर ‘राम’बाण इलाज!!