डॉ. मृत्युंजय महापात्रा

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय हवामान विभागात आजघडीला चार हजारांहून अधिक वैज्ञानिक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. जगातील एक अत्याधुनिक हवामान संस्था म्हणून भारतीय हवामान विभागाची (आयएमडी) ओळख आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या विभागाच्या महासंचालकांनीच सांगितलेला हा अभिमानास्पद इतिहास…

preparation for merchant navy
प्रवेशाची पायरी : मर्चंट नेव्हीसाठी सीईटी
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

नवी दिल्ली येथील मौसम भवन येथे मुख्यालय असलेल्या भारतीय हवामान विभागाची (आयएमडी) देशात सहा प्रादेशिक हवामान केंद्रे आहेत. या सहा हवामान केंद्रांच्या वतीने सहा वेगवेगळ्या प्रदेशांना हवामान सेवा पुरवली जाते. तसेच २६ राज्यस्तरावरील हवामान केंद्रांना मदत केली जाते. राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र, संख्यात्मक हवामान अंदाज, उपग्रह हवामान शास्त्र विभाग, अप्पर एअर इन्स्ट्रुमेंट विभाग, जल विज्ञान विभाग आणि हवामान संशोधन आणि सेवा विभाग अशा विविध विभागांतून भारतीय हवामान विभाग कार्यरत आहे. आजघडीला जगातील एक अत्याधुनिक, अचूक आणि विश्वासार्ह सेवा देणारी हवामानविषयक संस्था म्हणून जगभरात भारतीय हवामान विभागाची ओळख निर्माण झाली आहे. पण आयएमडीचा हा आजवरचा प्रवास अत्यंत खडतर आणि अनेक स्थित्यंतरांचा आहे.

हेही वाचा : आजीने दाखवलेला राम गेला कुठे?

मानवी सभ्यतेला हवामान आणि हवामानाचे महत्त्व अगदी सुरुवातीलाच समजले होते. वेद आणि महाकाव्यांमध्ये हवामान आणि हवामानाचे महत्त्व अधोरेखित करणारे वर्णन आणि त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न दिसून येतो. उपनिषदांमध्ये ढगांची निर्मिती, पाऊस आणि ऋतुचक्राची कारणे विचारपूर्वक मांडलेली आढळतात. गेल्या काही शतकांमध्ये हवामानशास्त्र आणि संबंधित विषयांच्या संदर्भात वैज्ञानिक ज्ञानात भारत आघाडीवर आहे. कालिदासाचे मेघदूत आणि चाणक्यांच्या अर्थशास्त्रातही हवामानविषयक सविस्तर चर्चा दिसून येते. मध्ययुगीन काळातही हवामानविषयक संशोधन होत राहिले. पायाभूत सुविधांच्या बाबतीत भारतात जगातील काही सर्वांत जुन्या हवामान वेधशाळा आहेत. तथापि, भारतातील विज्ञान आणि हवामान शास्त्राच्या आधुनिक युगाची सुरुवात १७९३ मध्ये झाली. १७९३ मध्ये मद्रास येथे पहिली हवामान शास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय वेधशाळेची स्थापना झाली होती. तेव्हापासून आजतागायत, वेधशाळांची संख्या हळूहळू वाढत गेली.

प्रारंभीचा काळ…

१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धात एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालमधील वैज्ञानिकांचा एक गटदेखील सहभागी होता. हा गट भारतातील रोग आणि हवामान यांच्यातील संबंध शोधण्यासाठी राष्ट्रीय हवामान समितीची स्थापना करण्याचा पाठपुरावा करत होता. त्यानुसार एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालने १८५७ मध्ये गव्हर्नर जनरलची भेट घेतली होती. त्यानंतर १८६०मध्ये स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आली आणि शेवटी प्रांतीय स्तरावर हवामान समितीची स्थापना करण्यात आली. पण, अखिल भारतीय स्तरावर माहितीची देवाण-घेवाण न झाल्यामुळे प्रांतीय स्तरावरील हवामान समितीचा विशेष उपयोग झाला नाही. त्यामुळे बंगालच्या एशियाटिक सोसायटीने राष्ट्रीय हवामान समितीच्या गरजेचा पुनरुच्चार केला. त्यामुळे गव्हर्नर जनरल कौन्सिलने राष्ट्रीय समिती स्थापन करण्याचे मान्य केले. त्यातून भारतीय हवामान विभागाची स्थापना १८७५ मध्ये करण्यात आली. या काळात एच. एफ. ब्लॅनफोर्ड हे हवामानविषयक रिपोर्टर म्हणून कार्यरत होते.

१८७५ ते १८९० हा भारतीय हवामान विभागाचा प्रारंभिक काळ होता. १८७५ ला भारतीय हवामान विभागाची स्थापना झाल्यानंतर भारतातील सर्व हवामानविषयक कामांना आयएमडीच्या कक्षेत आणण्यात आले. १८७७ मध्ये अलिपूर, कोलकाता येथे पहिल्या वेधशाळेची स्थापना झाली, त्यापासून भारतात भूकंपविषयक अभ्यास आणि नोंदी सुरू झाल्या. हवामानविषयक निरीक्षणांचे एकत्रीकरण, निरीक्षणांचे मानकीकरण आणि निरीक्षणांची देवाण-घेवाण सुरू झाली. देशांतर्गत पातळीसह जागतिक पातळीवर माहितीची देवाण-घेवाण सुरू झाली. याच काळात भारतीय हवामान विभाग जागतिक हवामान संघटनेचे सदस्य झाले.

हेही वाचा : तुमचा पैसा, तुमचे नेते आणि तुमचे जग!

१८७६ मध्ये देशात दैनंदिन आधारावर निरीक्षणे गोळा करण्यासाठी प्रथम पोस्टल सेवा आणि १८७८ मध्ये टेलिग्राफिक हवामान कोड, १८८२ मध्ये टेलिफोन स्विचबोर्ड आणि १८८७ मध्ये एक्स्प्रेस टेलिग्रामची सोय उपलब्ध करून देण्यात आली. १८६५ मध्ये कोलकाता बंदरासाठी सुरू झालेली बंदर इशारा प्रणाली १८८६ मध्ये सर्व भारतीय बंदरांपर्यंत पोहोचविण्यात आली. १८९० पासून देशात पावसाची अधिकृतपणे नोंदणी सुरू झाली.

बलूनपासून रडारपर्यंत…

१८९१ ते १९४६ हा स्वातंत्र्यापूर्वीचा हवामान विभागाच्या विकासाचा दुसरा टप्पा समजला जातो. १८७७ मध्ये देशात हवामान विभागाचा पहिला तक्ता (चार्ट) तयार करण्यात आला. १८७८ मध्ये पहिला दैनिक हवामानविषयक अहवाल तयार करण्यात आला. याच काळात दीर्घकालीन निरीक्षणाच्या माहितीवर हवामान शास्त्राची तयारी सुरू झाली. १९१४ ते १९१९ या काळात झालेले पहिले महायुद्ध आणि १९३९ ते १९४५ या काळात झालेल्या दुसऱ्या महायुद्धात लष्करी आघाड्यांना सैन्य हालचालींसाठी हवामानाच्या अंदाजाची निकड भासू लागली. त्यासाठी १९०५ मध्ये शिमला येथून पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर हवेच्या वरच्या स्तरात बलून सोडून हवेची निरीक्षणे घेण्यास सुरुवात झाली. शिमला येथून पहिला विमान वाहतूक अंदाज १९२१ मध्ये प्रसृत करण्यात आला.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात विमान वाहतूक अंदाज केंद्रांची स्थापना झाल्यापासून जगभरात विमान सेवेचा विस्तार झाला. त्यामुळे भारताजवळ १९३० पर्यंत हवामानाची त्रिमितीय माहिती संकलित झाली होती. १९०८ मध्ये भारताचा पहिला समुद्री नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वादळाच्या वाटचालीचा पहिला नकाशा १९२५ मध्ये तयार करण्यात आला. १९१२ मध्ये समुद्री जहाजांच्या माध्यमातून माहितींचे संकलन करून कराची आणि मुंबईच्या किनाऱ्यावर रेडिओ स्टेशनची स्थापना करण्यात आली. १९२९ मध्ये वायरलेस सेवा सुरू करण्यात आली. १९३६ मध्ये ऑल इंडिया रेडिओने हवामानविषयक बातमीपत्र सुरू केले. १९४३ मध्ये आयएमडीत हवामानविषयक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला. १९३२ मध्ये कृषीविषयक हवामानासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला, १९४५ मध्ये कृषीविषयक बातमीपत्राची सुरुवात झाली.

हेही वाचा : रुजवायला हवी, शासकीय त्यागाची संस्कृती

या दरम्यानच्या काळात भारतीय हवामान विभागाचे मुख्यालय १९०५ मध्ये कोलकात्याहून शिमला येथे, तर १९२८ मध्ये शिमला येथून पुणे आणि १९४४ मध्ये पुण्यातून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात आले. तसेच नवी दिल्ली, मुंबई (बॉम्बे), चेन्नई (मद्रास), नागपूर, कोलकाता, कराची आणि लाहोर येथे सात प्रादेशिक हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आली. याच काळात १९२८ मध्ये देशातील कोडाईकॉनॉल येथून वातावरणातील ओझोनच्या स्तराचे निरीक्षण करण्यात आले.

१९४७ ते १९५९ हा काळ भारतीय हवामान विभागाचे रडार युग म्हणून ओळखले जाते. याच काळात पुराचा पूर्वअंदाज देण्यास सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय हवामान विभागाचा विकास वेगाने झाला, देशाच्या हवामानविषयक गरजांनुसार संस्थात्मक रचनेत बदल करण्यात आले. आयएमडीने १९५४ मध्ये पहिल्यांदा विमान वाहतुकीसाठी रडारद्वारे माहितीचे संकलन सुरू केले. या पहिल्या रडारची स्थापना डमडम (पश्चिम बंगाल) येथे झाली होती. १९५८ मध्ये दिल्लीतील सफदरजंग येथे स्वदेशी रडार स्थापन करण्यात आले. आयएमडीचे तत्कालीन महासंचालक एल. एस. माथुर यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या महायुद्धातील साहित्यांपासून हे रडार विकसित करण्यात आले होते.

‘उपग्रह युग’ अवतरले…

१९६०-१९७० हा काळ आयएमडीतील उपग्रह युगाचा आणि उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेच्या स्थापनेचा काळ होता. अमेरिकेने एप्रिल १९६० मध्ये टीआयआरओएस-१ हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाकडून मिळणारी छायाचित्रे कुलाबा येथील रिसीव्हरमार्फत आयएमडीला मिळत होती. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचा पूर्व अंदाज वर्तविणे शक्य झाले. १९६२ मध्ये पुणे येथे उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली.

१९७१ ते १९८३ मध्ये आयएमडीकडून जागतिक हवामान सेवा सुरू करण्यात आली. चक्रीवादळात झालेल्या मोठ्या जीवितहानीनंतर १९७१मध्ये कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली चक्रीवादळ आपत्ती निवारण समितीची स्थापना करण्यात आली. १९७४ पर्यंत देशाच्या समुद्र किनाऱ्यांवर चक्रीवादळांची पूर्वसूचना देणारी ११ रडार स्थापन करण्यात आली. देशात पहिले स्वदेशी रडार १९७५ मध्ये दिल्लीत स्थापन करण्यात आले. १९८२ मध्ये इस्रोद्वारे इन्सॅट ही उपग्रहाची शृंखला प्रक्षेपित करण्यात आली. १९८० मध्ये देशात १०० माहिती संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली. प्रादेशिक हवामान यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लखनौ, हैदराबाद, तिरुअनंतपुरम्, भुवनेश्वर, बेंगळूरु, पाटणा, अहमदाबाद, भोपाळ, चंडीगढ, श्रीनगर येथे हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आली. १९८२ मध्ये अंटार्क्टिकामधील दक्षिण गंगोत्री येथून पहिल्यांदा ओझोनचे निरीक्षण करण्यात आले. अंटार्क्टिका येथे पहिले भारतीय अभियान १९८१ मध्ये सुरू करण्यात आले, १९८३ मध्ये अंटार्क्टिका येथे पहिल्या हवामान केंद्राची स्थापना केली.

हेही वाचा : नरेंद्र मोदींचे नवे ख्रिश्चनप्रेम 

१९८४ ते १९९० हे युग भारतीय उपग्रहाचे युग म्हणून ओळखले जाते. भारतीय उपग्रहांकडून नियमित प्रतिमा मिळणे १९८४ पासून सुरू झाले होते. १९९१ ते २००५ या काळात आयएमडीची स्वयंचलित निरीक्षणाची सुरुवात झाली. पहिल्यांदा केवळ हवामानासाठी कल्पना हा उपग्रह २००२ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला. २००५ मध्ये १२७ स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना करण्यात आली. २००६ ते २०१३ हा हवामान विभागाच्या आधुनिकीरणाचा काळ मानला जातो. २००७ ते २०१२ या काळात आयएमडीचे आधुनिकरण करण्यात आले. २०१० मध्ये हाय पॉवर कंप्युटिंग सिस्टिम (एचपीसी) कार्यान्वित करण्यात आली. २०१४ ते २०२३ हा काळ निरीक्षण, दळणवळण सुविधा वेगवान देणारा काळ समजला जातो. हवामानविषयक निरीक्षणे, दळणवळण आणि पायाभूत सुविधांसह सर्वच आघाड्यांवर लक्षणीय सुधारणा झाली. हवामानाच्या अचूक अंदाजात ४० ते ४५ टक्क्यांनी सुधारणा झाली.

आज देशभरात ३९ डॉप्लर रडार यंत्रणा कार्यरत आहेत. देशात सुमारे २०० कृषी स्वयंचलित हवामान केंद्रे, ८०६ स्वयंचलित हवामान केंद्रे, १३८२ स्वयंचलित पर्जन्यमापक, ८३ लाइटनिंग सेन्सरसह ६५ पायलट बलून अप्पर एअर ऑब्झर्व्हेशन स्टेशन देशभरात कार्यरत आहेत. भारतीय हवामान विभाग जगातील एक अत्याधुनिक हवामान संस्था म्हणून नावारुपाला आली आहे. आयएमडीचा इतिहास हा अचूकता आणि निरंतर प्रगतीचा इतिहास आहे. देशाच्या विकासात, राष्ट्राच्या उभारणीत भक्कम भूमिका बजावण्यासाठी भारतीय हवामान विभाग सदैव तत्पर आहे.

लेखक भारतीय हवामान विभागाचे महासंचालक आहेत.
((समाप्त))