प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जन्मशताब्दी नुकतीच साजरी झाली. सरकारी पातळीवर तर त्यांचे जन्मगाव चौंडी इथे मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. छायाचित्रे काढली गेली. पण अहिल्याबाई होळकर यांचे कार्य या सगळ्याच्या पलीकडे जाणारे आहे, ते कसे?

एखादी महान व्यक्ती गेल्यानंतर शेकडो वर्षांनी तिची गरज का जाणवते? याचे कारण म्हणजे त्या त्या व्यक्तीने आपला वर्तमान आपल्या उक्ती आणि कृतीने अजरामर केलेला असतो. माणसाचे माणूस म्हणून जन्माला येणे हे केवळ महत्त्वाचे नसून त्याने माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपले माणूसपण कसे सार्थ करून दाखवले हे मोलाचे असते! खडतर परिस्थितीतच खऱ्या अर्थाने माणसाची बौद्धिक, शारीरिक, वैचारिक, कृतीशील क्षमता सिद्ध होत असते. कठीण काळच खऱ्या अर्थाने माणसाच्या अंकुरण्याचा महत्वपूर्ण क्षण असतो. या सर्वच सद्गुणांचे मूर्तरूप म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता, जनसामान्यांचा उद्धारकर्त्या, लोकमाता अहिल्यादेवी होळकर! महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास मोठा देदीप्यमान आहे. इतिहासामध्ये स्त्रियांचे योगदानही तेवढ्याच तोलामोलाचे आहे. सर्वच लढाऊ बाण्याच्या स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे स्थान दीपस्तंभासारखे अढळ आहे! मराठ्यांच्या इतिहासामधील बाजीराव पेशव्यांचे माळवा प्रांताचे सरदार श्री मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेला सती जाण्यास प्रतिबंध आपल्या मुलीसारखे सांभाळले. अहिल्यादेवींनी १२ वर्षे आपल्या सासऱ्यांना राज्यकारभार करायला मदत केली. दुर्दैवाने १७६६ साली श्री मल्हारराव होळकर यांचे निधन झाले आणि राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी अहिल्याबाईवर येऊन पडली.

 अठराव्या शतकांत सर्वत्र कर्मकांड आणि जीवघेण्या अमानवी परंपरांनी थैमान घातलेलं असतांना अहिल्यादेवींना पेशव्यांनी माळवा प्रांत सांभाळण्याची परवानगी दिली आणि तेथूनच सुरू झाला त्यांचा थक्क करून सोडणारा राजकीय आणि सामाजिक कार्याचा अलौकिक प्रवास! तत्कालीन समाजाने स्त्री केवळ चूल आणि मूल, पडदा पद्धती (घोषा) मध्ये बंदिस्त केली असतांना त्यांनी सर्व बंधने झुगारून रयतेसाठी कार्य केले. काही बुरसटलेल्या परंपरावाद्यांनी त्यांना राज्य करण्यास विरोध केला, मात्र कुणाच्याही विरोधाला त्यांनी भीक घातली नाही.

अहिल्यादेवींच्या मातृहृदयाला तत्कालीन अडचणींची जाण होती. कुठेही स्त्रिया आणि गरिबांवर अन्याय-अत्याचार होणार नाही याची त्यांनी सदोदित काळजी घेतली. सामन्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नियमित जनता दरबार सुरू केला. शेतकरी आणि स्त्रियांच्या समस्या आणि प्रश्नांना विशेष प्राधान्य होते. शेतकरी आणि गृहिणी सुखी असतील तर समाजमन आनंदाने बहरून येईल हे लोकमानस त्यांच्या ठिकाणी असल्याने त्यांनी हे दोन घटक प्राधान्याने सुधारणेसाठी समोर ठेवले होते. शेतकऱ्यांसाठी तिजोरीतून ठिकठिकाणी विहिरी आणि तलाव बांधून सिंचनाची व्यवस्था केली. शेतकऱ्यांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देऊन तिजोरीतून सहकार्य केले. गावोगाव शेतकरी जागृतीसाठी मेळावे घेऊन लोकप्रबोधन केले. याशिवाय विधवा स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार नाकारलेला असतांना स्त्रियांना दत्तक पुत्र घेणे, वडिलोपार्जित किंवा पतीची शेती आणि संपत्ती त्या स्त्रीच्या नावावर लावण्यासाठी त्या आग्रही राहिल्या आणि तशी सरकार दरबारी नोंद घेण्यास महसूल विभागांस आदेशित केले.

 त्यांची लोकप्रियता सर्वदूर पसरली आणि सामान्य लोकांबरोबरच विविध विषयांची जाण असणारे विद्वान, शास्त्री, पंडित, लेखक, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम त्यांना भेटून लोकसेवेचा आग्रह धरू लागले. परिणामी त्यांच्या राज्यातील सामान्य जनतेला हे तज्ञ लोक सहज उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांची महेश्वर नगरी विद्वानांचे माहेरघर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांची राजधानी म्हणजे संगीत, कला आणि संस्कृतीचे आनंदभुवन झाले. याशिवाय चोर, दरोडेखोर, भिल्ल आणि अन्य चोरी-लूटमार करणाऱ्या लोकांचे मन-मत परिवर्तित करून त्यांना गाई-म्हशी-जमिनी देऊन शेती-उद्योग करण्यास प्रवृत्त केले. याचा परिणाम असा झाला की; त्यांच्या राज्यातील चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण कमी झाले, परंतु एवढे करूनही कुणी ऐकत नसेल त्यांना तोफेच्या तोंडी देऊन दुष्ट लोकांमध्ये दहशत पसरवली. राज्यांत सर्वत्र रस्ते आणि किल्ले बांधून आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. आपल्या राज्यात न्यायालयीन सक्रियता अमलात आणली. सामान्य लोकांना तत्काळ न्याय मिळावा म्हणून जिल्हा न्यायालये स्थापन करून न्यायासाठी राजदरबार २४ तास लोकांसाठी खुला ठेवला. सर्वांना मोफत शिक्षण, सरकारी तिजोरीतून सामान्यांना आरोग्य सुविधा आणि बेरोजगार तरुणांना नौकरी देऊन राज्यातील जनता जनार्दनाची सेवा करण्याचे महत्कार्य केले. अशा प्रकारे मातोश्री अहिल्यादेवी एक गुणग्राहक आणि जनकल्याणार्थ राज्यकारभार करणाऱ्या स्त्री राज्यकर्त्या लोकमाता म्हणून भारतभर नावारुपास आल्या!

 लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी लोकोद्धारक वैश्विक विचारांना कृतीची जोड देऊन भारत वर्षासमोर एक आदर्श ठेवला. न्याय विकासाचा पाया असून त्याद्वारे मजबूत आणि समृद्ध राष्ट्र निर्माण होत असते. खरा धर्म केवळ पूजा-अर्चा-अनुष्ठानात नसून मानवसेवा हीच सर्वश्रेष्ठ पूजा आहे. कोणत्याही धर्मातील खरी अध्यात्मिकता, चैतन्य हीच मुल्ये सर्वोच्च सुख देत असते. स्त्री पुरुषांपेक्षा कमजोर नसते, फक्त तिच्या सुप्त शक्तीचा विनियोग योग्य पद्धतीने करता यायला हवा. मानवी जीवनात संपत्तीपेक्षा ज्ञान हीच श्रेष्ठ शक्ती असून ज्ञानाधारे तमाम मानवजातीचा विकास करणे शक्य आहे. त्यासाठी शिक्षणच ही जगातील एकमेव शक्ती आहे ज्याधारे प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकतो. सरकार आणि शासन केवळ सत्तापोभोग नसून सामन्यांची सेवा करून त्यांच्या जीवनात मूलगामी सुधारणा करणे हाच त्याचा खरा अर्थ आहे. समाज तेव्हाच सक्षम होऊ शकतो, जेंव्हा तिथे स्त्री-पुरुषांना समान संधी असते. हे विचार व्यक्त करतांना ते सर्वच विचार कृतीत आणण्याचा त्यांनी आजीवन प्रयत्न केला.

या लोकमातेला आपल्यातून जाऊन तब्बल २५० वर्षे झाली आहेत. देशात आत्तापर्यंत अनेक राजे-महाराजे आले आणि गेले पण एका धुरंधर लेकीच्या, राजमातेच्या कामाची सर कुणालाही आली नाही. आपली लोकशाही शतकाकडे वाटचाल करतांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि न्यायालयीन क्षेत्रातील मंडळी लोकमातेच्या पावलावर चालत आहे का? विविध लोकानुनयी योजना शासन करत असले तरी दिवसेंदिवस प्रश्न, समस्या वाढतच आहेत. राजमातेच्या जयंतीचा एवढा मोठा जल्लोष होत असतांना खरंच स्त्री सुरक्षित आहे का? शिक्षण महाग होत चाललंय. शेतमालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. सर्वच धर्मातील मूळ तत्वे बाजूला जाऊन थोतांड, कर्मकांडाचे स्तोम माजले आहे. जात, धर्म, सांप्रदायिकता, कट्टरता समाजाला पोखरत असून याला खतपाणी कोण घालतेय? याचाही सखोल विचार व्हायला हवा. स्वयंघोषित विचारवंत कुणाच्यातरी वळचणीला जाऊन बसलेत. न्यायदानाला दिरंगाई म्हणजे न्याय नाकारणे. सामान्यांना वेळेवर, न्याय मिळतोय का? लोकरक्षकच लोकभक्षक झालेत. भ्रष्टाचार शिष्टाचार झालाय. बरबटलेले हात महामानवांचे पूजन करताहेत! कुंपणानेच शेत गिळंकृत केले आहे, दाद कुणाकडे मागणार, असे भयंकर चित्र आहे. , अशा परिस्थितीत आपणही भारतमातेचे काहीतरी देणे लागतो या न्यायाने जमेल तसे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, बंधुता, न्याय, स्त्री सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, देशप्रेम इत्यादी मूलगामी तत्वांकडे लक्ष देऊन थोडा का होईना सेवाभाव जपावा!  तुम्ही कोणत्याही पक्ष, धर्म, जातीचे असा, कुणीही असा पण ‘मी माणूस असून माणसासोबत माणसासारखे वागेन’ एवढेच अंगी बाणवा! हेच खऱ्या अर्थाने या लोकमातेला खरे अभिवादन असेल, अन्यथा केवळ फोटोग्राफी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखक व्याख्याता, कवी, कीर्तनकार, समीक्षक, योग-प्राणायाम प्रशिक्षक आहेत.