राज्य सरकारने ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला खरा, मात्र तसे करताना मूळ गीतातील काही भाग वगळण्यात आला. त्यामागे काय हेतू असावा?
महाराष्ट्र हे केवळ एक भौगोलिक ओळख असलेले राज्य नाही, तर समतेचा, स्वातंत्र्याचा आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा एक तेजस्वी वारसा या राज्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीत अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्य उभारले, जिथे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत लढ्यांची गाथा रुजली आणि जिथे भीमा, गोदावरी, कृष्णा, ताप्ती यासारख्या नद्यांनी भूगोलाशी एकरूप होऊन संस्कृती घडवली, त्या महाराष्ट्राला आज धक्का बसला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या सर्वसमावेशक राज्यगीताच्या मूळ रचनेत बदल करण्यात आले असून, यामुळे भूगोल, इतिहास, संस्कृती आणि एकतेचा गाढा संबंध असलेल्या अनेक मूलभूत घटकांना दुय्यम ठरवण्यात आले आहे.

भूगोलाचे विलोपन

महाराष्ट्रातील नद्यांचा उल्लेख मूळ गीतात अत्यंत भावपूर्ण पद्धतीने करण्यात आला होता. नद्यांचे नामस्मरण केल्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विविध भागांचे अस्तित्व अधोरेखित होत होते. पण, राज्यगीतात नद्यांचा उल्लेखच वगळण्यात आला आहे. हे केवळ शब्दांचे संपादन नाही, तर महाराष्ट्राच्या विविध भागांचा, त्यांच्या परंपरांचा आणि संघर्षाचा अपमान आहे. नद्यांचे विलोपन म्हणजे भूगोलाचा, स्थानिक अस्मितेचा आणि विविधतेचा गळा दाबण्याचा प्रयत्नच! मूळ गीतात महाराष्ट्रातील विविध भागांतून वाहणाऱ्या नद्यांचा उल्लेख आणि सर्व समाजघटक एकत्र आल्याचा स्पष्ट उल्लेख होता. नव्या गीतातून हा एकतेचा धागा गायब केला आहे.

शिवरायांचा गौरव वगळण्यासाठी?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे, स्वराज्याचे आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहेत. छत्रपतींनी शोषित, वंचित समाजाला समान स्थान असलेले राज्य स्थापन केले. मात्र, आज राज्यगीताच्या नव्या रूपात स्वराज्यातील कार्याचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य यमुनेपर्यंत विस्तारले होते. मावळ्यांनी अटकेपार झेंडा रोवला होता. छत्रपतींनी अठरापगड जातींना एकत्र आणून स्वराज्य घडवले. त्या इतिहासाचा संदर्भ न देता महाराष्ट्राला सत्तेच्या राजकीय चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला आहे.

संभाव्य राजकीय हेतू!

भाजपच्या राजवटीने गेल्या काही वर्षांपासून भारतभर ‘एकसंध संस्कृती’चा आग्रह धरलेला दिसतो. त्यामध्ये स्थानिक इतिहास, भूगोल, विविधता यांना दुय्यम ठरवून एकसंध ओळख लादण्याचे प्रयत्न आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी, समतेवर आधारलेल्या राज्याची स्वतंत्र ओळख त्यांना स्वीकारण्यास कठीण जाते. म्हणूनच महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, सामाजिक समन्वय, संघर्ष आणि बंडखोरीचा वारसा पुसण्याचे हे षड्यंत्र असल्याचा संशय येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेत्यांची आणि जनतेचीही जबाबदारी

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची थेट जबाबदारी आहे. राजकीय सोयीसाठी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आधारस्तंभांची गळचेपी करणे योग्य ठरेल का? ही लढाई फक्त एक गाणे बदलण्यासंदर्भातील नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेची, संस्कृतीची, इतिहासाची आणि एकतेची आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कोणीही घाला घालू नये म्हणून एकजुटीने संघर्ष करावा लागेल. ‘महायुती’ सरकारला महाराष्ट्र गीतात सर्व मूळ कडवी समाविष्ट करावीच लागतील. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे केवळ सुरांच्या तालावर नाचणारे नाही, ते या भूमीत रुजलेल्या संघर्षाची, अभिमानाची आणि एकतेची गाथा आहे. त्यात नद्यांचे, सह्याद्रीच्या रांगांचे, शिवरायांच्या संघर्षाचे आणि समाजातील एकतेचे प्रतिबिंब आहे. त्यातील कोणताही भाग वगळणे योग्य नाही.