आशिष पेंडसे
पुण्यनगरी ही प्राचीन काळापासूनच पांडित्याचे प्रतीक ठरली आहे. संस्कृती, परंपरेबरोबरच ज्ञानाधिष्ठित समाजाच्या बांधणीच्या प्रक्रियेत पुण्यनगरीचे योगदान मोठे राहिले आहे. म्हणूनच, कालांतराने स्वातंत्र्य चळवळीत सशस्त्र क्रांतिबरोबरच वैचारिक मार्गाने समाज परिवर्तनाच्या वाटेवरदेखील पुण्यातील धुरिणांनी विशेष सन्मानाचे स्थान मिळवले.

सामाजिक क्रांती आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करणे, इंग्रजांच्या मॅकोले शिक्षणपद्धतीमधील विचार इतिहासजमा करून नवीन पिढीपर्यंत राष्ट्रभक्तीचा विचार पोहोचविणे, अशा ध्येयाने प्रेरित अशा या संस्था कार्यरत राहिल्या. त्याच्याच जोडीला शिक्षणप्रक्रियेतील मूळ गाभा अबाधित राखत विविध विषयांमधील शिक्षण, संशोधनाच्या अनेक वाटादेखील शोधत राहण्याचे कार्य पुण्यातील शिक्षणसंस्थांनी केले. याच सर्वांचा परिपाक म्हणजे, पुण्याचा शिक्षणलौकिक केवळ देशातच नव्हे, तर सातासमुद्रापलीकडे ख्यातकीर्त झाला. विद्येचे माहेरघर, ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट अशी बिरुदे प्राप्त झाली, ती काही कोणत्या मार्केटिंग आणि मीडिया, पीआर स्ट्रॅटेजी वापरून नाही!

वैश्विक ध्यासाचा आयाम

साहजिकच, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नवभारताच्या उभारणीमध्ये शैक्षणिक नेतृत्वाच्या आघाडीवर पुण्याचे स्थान ठळकपणे राहिले. शिक्षण-संशोधनाला वाहिलेल्या अनेक राष्ट्रीय संस्था पुण्यात स्थापन करण्यामागे पुण्यातील हाच शिक्षणलौकिक कारणीभूत होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्था अशा शिक्षणात पायाभूत कार्य करीत असलेल्या संस्था पुण्याचा लौकिक वाढवित होत्याच. त्याच्या जोडीला राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), आघारकर संशोधन संस्था, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) इथपासून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीए), वैकुंठभाई मेहता को-ऑपरेटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूट, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अशा अनेक संस्थांचे जाळे पुण्यात उभारण्यात आले. मुख्यत्वे, शिक्षण, संशोधन, विज्ञान तंत्रज्ञान, संरक्षण विकास, औषधनिर्मिती, अर्थ-सहकार, कृषी अशा बहुआयामी कार्यक्षेत्रांची रुजवणूक या संस्थांच्या माध्यमातून पुण्यात झाली. परम महासंगणकाची निर्मिती केलेले सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्युटिंग (सी-डॅक), इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका) अशा संस्थांच्या माध्यमातून डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा दिग्गजांनी पुण्यनगरीच्या शैक्षणिक परंपरेला वैश्विक ध्यासाचा आगळा आयाम दिला.

व्यवसाय शिक्षणातही नवतेचा ध्यास

कालांतराने शिक्षणाचे खासगीकरण होऊ लागले. मूलभूत संशोधनाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचे पेव फुटले. करिअर, व्यवसायाच्या बाजारपेठेत व्यवसाय शिक्षणाचा अधिक बोलबाला होऊ लागला. पुण्यनगरीचेदेखील शैक्षणिक प्रोफाइल बदलू लागले! ख्यातनाम पारंपरिक विद्यापीठांबरोबरच अभिमत विद्यापीठांची कॅम्पस फुलू लागली. आता एकविसाव्या शतकात खासगी विद्यापीठांची चलती आहे. अगदी, कॉर्पोरेट धर्तीवर शिक्षणाचे जणू मॉल उभारण्यात आले आहेत. पारंपरिक विद्यापीठांवरील ‘बोजा’ कमी करण्यासाठी अशा स्थित्यंतराला अपवाद नाही. हे कालसुसंगत बदल आहेत. ते स्वीकारण्यातच भविष्यकेंद्रित शैक्षणिक हित आहे, अशा शब्दांत संक्रमणाची अपरिहार्यता अधोरेखित केली जाऊ लागली.

पुणेही त्याला अपवाद ठरले नाही. परंतु, केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणाच्या या स्थित्यंतराच्या प्रक्रियेत पुण्याने नवतेचा ध्यास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास सोडली नाही. या पुढील काळातदेखील सोडणार नाही. म्हणूनच, कालौघात आपली परंपरा, लौकिक अबाधित राखतानाच नवीन शिक्षणाची दारे पुण्यातील शिक्षणविश्वाने खुली केली.

विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, नेटवर्किंग, कम्युनिकेशन, मॅनेजमेंट अशा एक ना अनेक क्षेत्रांमधील अभ्यासक्रमांमध्ये पुण्यातील शिक्षणसंस्थांनी एकविसाव्या शतकाला साजेसे शिक्षण उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे, शिक्षणाच्या प्रचलित साचेबद्धपणामध्ये कालानुरूप बदल घडवित आंतरविद्याशाखीय, इंटिग्रेटेड डिग्री अशा अनेक भविष्यवेधी पद्धतींचा स्वीकार केला. विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्षपद भूषविलेले डॉ. अरुण निगवेकर यांच्यासारख्या अनेक शिक्षणतज्ज्ञांच्या शिक्षण नियोजनातून या नावीन्यपूर्ण पद्धती विकसित झाल्या.

पारंपरिक, प्रचलित शिक्षणाबरोबरच पुणे ही कालसुसंगत अभ्यासक्रमांचीदेखील मांदियाळी ठरते आहे. किंबहुना, अशा अनेक अभ्यासक्रमांचे पथदर्शी प्रयोग हे पुण्यातील शिक्षणसंस्थांमधूनच यशस्वी झाले आणि नंतर ते इतर शिक्षणसंस्थांनी सुलभपणे स्वीकारले. कम्प्युटिंग, नेटवर्किंग अशा सध्याच्या काळातील पासवर्ड ठरत असलेल्या शिक्षणाची मुहूर्तमेढ पुण्यातील शिक्षण-संशोधन संस्था, विभागांमध्ये रोवली गेली. सोलर एनर्जीचा आज बोलबाला आहे. याच सोलर एनर्जीसंदर्भातील पहिलीवहिली संशोधन संस्था आणि प्रकल्प पुण्यात माजी कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे यांच्या पुढाकाराने सुरू झाले. पर्यावरण, वातावरण बदल आदींबाबत आपण सध्या खूपच सजग झालो आहोत. याच वातावरणीय बदलांबाबतचे संशोधन प्रकल्प आणि प्रदूषणाच्या चाचण्या करण्यासंदर्भातील देशामधील पहिला प्रकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू करण्यात आला होता, हे विशेष! आयुर्वेद, औषधनिर्माणशास्त्र, स्थापत्यशास्त्र, समाजशास्त्र, कला, ललितकला अशा किती तरी शाखांमधील नावीन्यपूर्ण प्रकल्प पुण्यात यशस्वी झाले आणि मग ते देशभरातील शिक्षणव्यवस्थेचा आविभाज्य भाग बनले.

स्पर्धा परीक्षांचे मोठे गारुड सध्याच्या युवा पिढीवर आहे. मात्र, अत्यल्प संधी आणि त्याच्या मागे मोठ्या संख्येने धावणारे युवक-युवती असे व्यस्त चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या तरुणाईची मेहनत सार्थकी लागावी, यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतानाच सामान्य प्रशासन अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र देण्याचा अभिनव प्रयोगदेखील पुण्यात सुरू करण्यात आला आहे. परिणामी, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, तरी किमान त्या ज्ञानाच्या आधारे युवक-युवती करिअरचे मार्ग नक्कीच आजमावू शकतात.

शिक्षण-उद्योग डिजिटल सहकार्य…

सध्या सर्वत्र शिक्षण-उद्योग क्षेत्रांमधील सहकार्य, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वगैरेबाबत बोलले जात आहे. पुण्याने या आघाडीवरदेखील १९९० च्या दशकापासूनच आघाडी घेतली आहे. कम्प्युटर क्षेत्राबाबत फारसे कुणाला ठाऊक नसताना, या क्षेत्रातील कार्यकुशल प्रशिक्षण देऊन कॉर्पोरेट संगणक क्रांतीचे क्लिक पुण्यातील संस्थांनी केले, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याला पारंपरिक अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून मिळालेल्या सहकार्याचादेखील इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. ज्ञान, तंत्रज्ञान आणि त्याचे प्रशिक्षण हे सर्वांपर्यंत, विशेषतः समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा ध्यास डॉ. विजय भटकर यांनी ईटीएच प्रयोगशाळेच्या माध्यमातून घेतला आणि अत्यंत सुलभ मराठीमधून संगणक प्रशिक्षणाचे मॉड्युल त्यांनी महाराष्ट्राला दिले.

डॉ. राम ताकवले यांच्यासारखे माजी कुलगुरू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी तंत्रज्ञानाचे सार्वत्रीकरण केले, तेही डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून. एनीवन, एनीव्हेअर, एनीहाऊ आणि एनीटाइम… म्हणजेच, कुणीही, कधीही, कुठेही आणि कोणत्याही प्रकारे डिजिटल माध्यमातून शिक्षण प्रशिक्षण घेऊ शकतो, असे स्वप्न डॉ. ताकवले यांच्यासारख्यांनी पाहिले आणि ते प्रत्यक्षातदेखील उतरवले. आज जगभर ओटीटी आणि ऑनलाइन एज्युकेशनच्या माध्यमातून मनोरंजन, शिक्षण यांची गंगा सर्वदूर अखंडपणे खळाळत असताना डॉ. ताकवले यांच्यासह या शिक्षणऋषींचे आवर्जून स्मरण होते. परंपरेबरोबरच आधुनिकता, नवतेचा ध्यास घेण्याची त्यांची दूरदृष्टी सर्व भेदांपलीकडे जात पुढील कित्येक पिढ्यांचा उत्कर्ष करणारी ठरली!

मागणीनुसार प्रशिक्षण आणि फिनिशिंग स्कूल

राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. मात्र, त्याच्याच जोडीला तंत्रकुशल मनुष्यबळाची मोठी वानवादेखील भासते आहे. आपल्या गाव-खेडे, शहरात नोकरी-व्यवसायाच्या संधी नसल्याने स्थलांतर करणारे आता कोट्यवधींच्या संख्येने आहेत. तसेच, दुसरीकडे असे कितीही स्थलांतर झाले, तरी उद्योग क्षेत्रामधील तंत्रकुशल मनुष्यबळाची चणचण दूर झालेली नाही. अशा परिस्थितीत, स्थानिक उद्योगांच्या गरजा ओळखून स्थानिक शिक्षणसंस्थांमधूनच त्यानुसार छोट्या कालावधीचे अभ्यासक्रम तयार करून उद्योगविश्वाला तंत्रकुशल मनुष्यबळ पुरविण्याचा अभिनव उपक्रम पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनासारख्या संस्थेने यशस्वी करून दाखवला. टेल्को, मर्सिडीज बेंझ यांसारख्या वैश्विक कंपन्यांसाठी त्यांनी विशेष अभ्यासक्रम तयार केले आणि त्यांची मनुष्यबळाची मागणी पूर्ण केली. कालांतराने, फिनिशिंग स्कूलच्या माध्यमातून खासगी संस्थांनी याच प्रारूपाचे अनुकरण केले व पुणे आणि परिसरातील आयटी कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान युगात भरारी घेण्यासाठी मोठा हातभार लावला.

शिक्षण व्यवस्थेतील स्वातंत्र्य

शिक्षण व्यवस्थेमधील शाखा, अभ्यासक्रम अशा भिंती आता लयास जात आहेत. या आघाडीवरदेखील पुण्यातील शिक्षणसंस्थांनी पहिले पाऊल टाकले. शिक्षण बंधनांमधून मुक्त करीत विद्यार्थ्यांना अनेकार्थांनी वैश्विक शिक्षणानुभव दिला जात आहे. केवळ अभ्यासक्रमच नव्हे, तर तज्ज्ञ मार्गदर्शक निवडण्याचीदेखील मुभा या इलेक्टिव्ह शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून पुण्यातील शिक्षणसंस्थांनी उपलब्ध करून दिली आहे.
आता आव्हान पायाभूत सुविधांचे

शिक्षणाच्या या क्रांतिपथावर पुण्यनगरीचा झेंडा डौलाने फडकत आहे. त्यासाठी शहराची एकूणच पोषक शिक्षणसंस्कृती निर्णायक ठरली आहेच. परंतु, त्याला शिक्षणविश्वाशी संबंधित सर्व घटकांकडून मिळालेले सहकार्यदेखील तितकेच मोलाचे आहे. शिक्षक, शिक्षकेतर, संशोधक, संस्थाचालक यांच्यापासून विद्यार्थी आणि पालकांपर्यंतच्या सर्व सहभागी घटकांकडून पुण्याच्या या शिक्षणनवतेच्या प्रयोगावर विश्वास दाखविण्यात आला. सरकारी, निमसरकारी, खासगी अशा सर्वच स्वरूपाच्या शिक्षणसंस्था, त्यांचे नेतृत्व आणि त्यामधील मनुष्यबळ अशा प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील सहभाग पुण्याच्या या शिक्षणवारीत राहिला आहे, हे विशेष!

आता आव्हान आहे ते दर्जाबरोबरच संख्येच्या रेट्याला न्याय देत पायाभूत सुविधा उभारण्याचे. पुण्याच्या केजी टू पीजीपर्यंतच्या शिक्षणव्यवस्थेचा वेध घेऊन शैक्षणिक आराखडा तयार करण्याची घोषणा तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. परंपरा, लौकिक आणि नवतेचा ध्यास अशा त्रिसूत्रीवर नावारुपाला आलेल्या पुण्यनगरीच्या शिक्षणव्यवस्थेसाठी भविष्यकेंद्रित शाश्वत पायाभूत व्यवस्था उभारली जावी, ही मागणी समयोचित आणि रास्तच ठरावी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार असून, शिक्षणविषयक घडामोडींचे अभ्यासक आहेत)