‘दीदीं’नी मोठय़ा ममतापूर्ण आवेशात कामावर हजर होण्याचे आदेश दिले खरे, पण न्यायालयाने हा आक्रस्ताळेपणा मानलेला नाही. तरीही डॉक्टर मंडळींवर जे प्राणघातक हल्ले होतात, त्यासंबंधी संरक्षण देण्याचा विषय बाजूलाच राहतो.

शासकीय रुग्णालयातील एकूणच परिस्थिती दयनीय असते. काही वेळा इतर सर्व ठिकाणी असते तसेच ‘काम करणाराच मरतो’ हे इथेही असतेच. मात्र कुठल्याही कारणाने रोगी दगावला तरी जनक्षोभाचा निरंकुश उद्रेक यांनाच सोसावा लागतो. डॉक्टराने कशा परिस्थितीत किती आटोकाट प्रयत्न केले याचे समूहाच्या मानसशास्त्राला घेणेदेणे नसते. त्यामुळेच या शिकाऊ डॉक्टरांना अपुरे किंवा मुळीच संरक्षण न देता वेठबिगारासारखे काम करून घेणे अयोग्य आहे.

महाराष्ट्रातही डॉक्टरांवर हल्ला प्रतिबंध करण्यासंबंधी २०१० मध्ये कुठलासा कायदा संमत झाला. प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, या प्रश्नातच उत्तर लपलेले आहे. देशभरातील सर्व डॉक्टर हे आंदोलन तीव्र करणार. त्याचा विरोध करण्यापूर्वी त्यांची बाजू लोकांनी समजून घ्यायला हवी. हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेट घालून त्यांनी हॉस्पिटलमध्ये काम करावे का?

कुठल्याही सरकारचा प्रश्न नसून सगळ्यांच्याच काळात आजपर्यंत सुरक्षेच्या बाबतीत दुर्लक्षित राहिलेल्या या क्षेत्राच्या सुरक्षितेतलाही प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.

– मनोहर निफाडकर, निगडी (पुणे)

 

आंदोलनकाळातही समाजाचे भान कौतुकास्पद 

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात देशपातळीवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील डॉक्टरही सहभागी झाले आहेत. या आंदोलनात सहभागी होताना जागतिक रक्तदान दिनानिमित्त महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे भान राखले गेले.

अन्य देशातील संप/निषेधावेळी कसे जादा काम केले जाते याची उदाहरणे वेळोवेळी दिली जातात. अशा आदर्शवत पायंडय़ाचे खरे तर इतर संघटनांनीही पालन केले पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी आंदोलन करताना संपाऐवजी विद्यार्थ्यांचे जादा तास घ्यावेत. कर्मचाऱ्यांनी विहित वेळेपेक्षा जास्त वेळ काम करून आपला निषेध नोंदवावा. कार्यप्रणालीमध्ये कुठे ना कुठे अन्याय होणारच. त्याला विरोध म्हणून आंदोलने हा नसर्गिक प्रतिसाद असतो; पण ही आंदोलने केवळ स्वार्थापुरती राहू नयेत, ही अपेक्षा नेहमी पूर्ण होतेच असे नाही. आपल्या मागण्या रास्त असल्या तरी ज्या समाजात आपण राहतो आहोत त्यांच्याप्रति उत्तरदायित्वाची भावना सतत मनात असली पाहिजे याचे भान निदान महाराष्ट्रातील डॉक्टरांकडून दाखवले गेले म्हणून अभिनंदन!

– राजेश श्रीराम बुदगे, ठाणे (पश्चिम)

 

अन्यायाविरोधात ‘पक्षसापेक्ष’ लढा?

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांचा संप चिघळला असल्याचे वृत्त (लोकसत्ता, १६ जून) वाचले. या हल्ल्यांच्या निषेधार्थ एआयएमए – ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने देशभरातील डॉक्टरांना १७ जून रोजी संपावर जाण्याचे आवाहन केले आहे. एखाद्या डॉक्टरवर काही कारणांनी हल्ला होणे निषेधार्ह असेच आहे; पण ज्याप्रमाणे आणि ज्या पद्धतीने ‘ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’ यात उतरत आहे, ते मात्र खटकणारे आहे. एक तर पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी हे मुस्लीम समुदायाचे आहेत. म्हणूनच याला काही राजकीय रंग देऊन ध्रुवीकरणाचा करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न असल्याच्या शंकेला वाव आहे. कारण याआधी भाजपचे कर्नाटकातील खासदार आणि भाजपचा जन्मच मुळी घटना बदलण्यासाठी झाला आहे आणि आपण याचसाठी निवडून आलो आहोत, असे वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या अनंत हेगडे यांनी कर्नाटकमधील धारवाड येथील रुग्णालयात एका डॉक्टरला मारहाण केली होती. शिवसेनेच्या एका नेत्याच्या मृत्यूनंतर अख्खे रुग्णालय जाळून उद्ध्वस्त केल्याचा ‘इतिहास’ महाराष्ट्रात मुंबईनजीकच घडलेला आहे. तसेच उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, महाराष्ट्र इत्यादी राज्यांतदेखील भाजप राजवटीत डॉक्टरांवर हल्ल्याच्या भ्याड घटना बहुसंख्याकांकडून घडल्या असता असे काही व्यापक आंदोलन केले गेले होते, असे दिसून येत नाही.

सत्यासाठी तसेच अन्यायाविरोधात लढताना उच्चविद्याविभूषित डॉक्टरांची कृती एखाद्या पक्षसापेक्ष विचारांची तळी उचलणारी दांभिक स्वरूपाची असू शकते का, असे खेदाने प्रश्नांकित करावेसे वाटते.

–  बाळकृष्ण शिंदे, पुणे</strong>

 

नैतिकता, पारदर्शकता हेच खरे संरक्षण!

रिक्षावाले, पोलीस, वकील अशा जनतेची लुबाडणूक करणाऱ्या इतर काही निवडक लोकांच्या यादीत उच्चशिक्षित डॉक्टरी पेशाचाही समावेश झालेल्यालाही अनेक वर्षे झाली आहेत. या यादीतील सर्वाचा एकदा अनुभव घेतल्यावर त्यांच्या नावाने शिव्याशाप देणार नाही असा सामान्य माणूस शोधून सापडणार नाही. या सर्व पेशांमध्ये काही चांगली माणसे आहेतच, नाहीत असे नाही; पण स्वत:च्या चांगुलपणाची किंमत त्यांनी स्वत:च न ठेवल्यामुळे त्यांचीही गणना त्यात होत आहे. ही ‘चांगली’ मंडळी निष्क्रिय न राहती आणि जर त्या ‘चांगल्या’ मंडळींनी आपल्याच व्यवसायातील अनिष्ट बाबींविरुद्ध वेळीच आवाज उठविला असता तर आज वेगळे चित्र दिसले असते. शेवटी निष्कर्षांप्रत पोहोचण्यासाठी एकच निदर्शनास आणावेसे वाटते, की या सर्व बदनाम व्यावसायिकांनी जर आपापल्या व्यवसायात पारदर्शकता आणली तरच लोकांचा रोष कमी होऊ  शकेल. असे असले तरी डॉक्टरांवरील हल्ल्याचे कदापि समर्थन होऊ  शकत नाही; पण शेवटी ज्याने त्याने आपापली पत स्वत:च राखली पाहिजे. पोलिसी-संरक्षणाच्या मागणीपेक्षा व्यावसायिक-नैतिकतेचे संरक्षण परत मिळविणे कधीही चांगले. एक तर ते फुकट मिळते आणि जाता जाता इतरही अनेक फायदे देऊन जाते.

– मोहन ओक, आकुर्डी (पुणे)

 

‘वंचित’मुळे भाजपलाच अप्रत्यक्ष मदत!

‘‘वंचित’चे राजकारण की स्वार्थकारण?’ हा मििलद पखाले यांचा लेख (रविवार विशेष, १६ जून) वाचला. लेखातील विचार व भावना योग्यच आहेत. खरे म्हणजे आंबेडकरी विचारधारा ही उजव्या हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरोधी संघर्षांतूनच उभी राहिली आहे; पण प्रकाश आंबेडकर आतापर्यंतच्या आपल्या राजकारणातून उजव्या हिंदुत्ववादी विचारी राजकारणाला मदतच करत आले आहेत असे दिसते. महाराष्ट्रात  रामदास आठवले २०१४ पासून उजव्या शक्तींना प्रत्यक्ष मदत करत आहेत, तर प्रकाश आंबेडकर अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत. ही आंबेडकरी जनतेची, चळवळीची व विचारधारेची फसवणूक आहे. आशा एवढीच की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित विचारांतून मार्गदर्शन घेणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत.

– विजय लोखंडे, भांडुप (मुंबई) 

 

स्वतंत्र राजकारण ‘वंचित’ने करूच नये?

‘‘वंचित’चे राजकारण की स्वार्थकारण’(१७ जून) या लेखात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत युती करावी असे अप्रत्यक्षरीत्या सांगितले गेले आहे! प्रश्न पडतो की आंबेडकरी समाजाने, बहुजन समाजाने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व राजकारणात निर्माणच करू नये का? की नेहमीच उजव्या शक्तींच्या भीतीमुळे प्रस्थापितांच्या वळचणीला बांधून राहावे? त्या उजव्या, प्रतिगामी शक्तींची भीती काँग्रेसला नाही वाटत का? की, फक्त ‘वंचित’सारख्या प्रादेशिक पक्षांनीच त्याची काळजी वाहावी? काँग्रेसने हा अहंकार दूर सारून जो राष्ट्रीय पक्षाचा बागुलबुवा उभा केलाय तो सध्याची परिस्थिती पाहता सोडला पाहिजे असं वाटत नाही का? आम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस अनेक राज्यांत (दिल्ली, प. बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र) प्रादेशिक पक्षांची हेटाळणी करते, हे थांबणार कधी?‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्यासाठी भाजपने, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलेल्या प्रादेशिक पक्षांना स्वत:पेक्षा जास्त जागा देऊन, त्यांच्या जोरावर अखेर आज देशात सत्ता आणली! तसे काँग्रेस नाही करू शकत, इतकीच प्रतिगामी शक्तींची भीती होती तर?

अजूनही आपण ‘वंचित’सारख्या प्रादेशिक पक्षांनाच दोष देणार आहोत? जेव्हा केव्हा आंबेडकरी राजकारण उदयास येते तेव्हा ते काँगेससाठीच निर्माण झालंय अशा आविर्भावात काँग्रेस राहात होती! आता माझ्या मते तरी तसे घडणार नाही; कारण हे प्रकाश आंबेडकर आहेत! (मी काही त्यांच्या पक्षाचा अधिकृत सदस्य नाही, पण प्रकाश आंबेडकर हे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास प्राधान्य देतात!)

– निहाल कदम, पुणे

 

काँग्रेसने वंचितचा आधार घ्यावाच

‘वंचित बहुजन आघाडीला फार महत्त्व नको’ ही बातमी (१५ जून) वाचली. वास्तविक, लोकसभेचा अनुभव पाहता काँग्रेसला वंचितला सोबत घेण्याची गरज आहे. भाजप सर्वत्र दबावतंत्राचा वापर करीत आहे. विरोधक त्याला बळी पडून त्या पक्षात प्रवेश करीत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता निवडणुकीत प्रचारकार्य करण्यास घाबरत आहे. अशा स्थितीत काँग्रेस आघाडी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्यास त्या पक्षाला पुन्हा अपयश येणार आहे. याउलट वंचित बहुजन आघाडीकडे बहुजन वर्गातील वंचित घटकांची सक्षम कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यांची राजकीय पाटी कोरी असल्याने त्यांच्यावर दबावतंत्राचा काहीच परिणाम होणार नाही. आगामी निवडणुकीत लढती तुल्यबळ ठेवायच्या झाल्यास वंचित कार्यकर्त्यांची शक्ती काँग्रेस आघाडीला घ्यावीच लागेल. कार्यालयात बसून वरवरचे निर्णय घेण्यापेक्षा जमीन स्तरावरील वातावरण समजून घेऊन निर्णय घेणेच उपयुक्त ठरेल. कार्यकर्त्यांच्या खऱ्या सूचनांचा विचार करून हा निर्णय घेता येईल.

असे झाले नाही, तर मात्र वंचित आघाडी सशक्त होण्याआधीच संपून जाईल आणि काँग्रेसच्या हाती काही लागणार नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे सामाजिक न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या तत्त्वांचे न भरून येणारे नुकसान होईल.

– सलीम सय्यद, सोलापूर