हरियाली संस्थेमार्फत वृक्षारोपण; एकही वृक्ष नसलेल्या डोंगरावर ४५०हून अधिक झाडांची लागवड पूर्वा साडविलकर, लोकसत्ता ठाणे : घोडबंदर मार्गास लागून मीरा-भाईदर, वसईच्या दिशेने जात असताना गायमुख परिसरात एकही झाड नसलेला एक डोंगर वर्षांनुवर्षे येथून ये-जा करणाऱ्यांच्या नजरेस पडायचा. एकही झाड नसल्याने या डोंगराला नाव पडले ते मुंडा डोंगर. एका अर्थाने टक्कल पडलेल्या या डोंगरावर वनराई निर्माण करण्याचा निश्चय पर्यावरणप्रेमींनी केला आणि अथक प्रयत्नानंतर मुंडा डोंगर हिरवाईने आता बहरला आहे. हरियाली संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमी सदस्यांनी या डोंगरावर करंज, मोह, बेहडा, बाहवा, अर्जुन, आवळा, जांभूळ, आपटा असे विविध प्रकारचे वृक्षांचे जतन केले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात ६०० फूट उंच असलेल्या या डोंगरावर २००३मध्ये ठाण्यातील हरियाली संस्थांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्याचे ठरविले. या ठिकाणी झाड नसल्यामुळे पावसाळ्यात माती वाहून जात. माती नाही म्हणून झाड नाही हे चक्र मोडण्याचे संस्थेसमोर मोठे आव्हान होते. हा डोंगर खडतर असल्याने या ठिकाणी झाडे लावण्यासाठी मोठा खड्डा करण्याचे काम जिकिरीचे होते. त्यामुळे रोपांची लागवड करण्याचा पर्याय सोडून बीजरोपणामार्फत वृक्ष लागवड करण्याचे संस्थेने ठरविले. गेले अठरा वर्षे या संस्थेतील सदस्य आणि इतर नागरिक दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बीजारोपणाला सुरुवात करतात. या डोंगरावर आता ४५०हून अधिक झाडे लावण्यात आली असून यामध्ये लोकप्रजातींच्या झाडांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. मुंडा डोंगराचा इतिहास घोडबंदर भागात ६०० फूट उंच असलेला या डोंगरावर एकही झाड नसल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी मुंडा असे या डोंगराचे नाव ठेवले. या डोंगरावर वृक्ष नसल्यामुळे पावसाळ्यात माती वाहून जात होती. त्यामुळे या डोंगरावर वृक्ष लागवड करणे अशक्यच होते.