बदलापूर: बदलापूर गावातील अमृत टॉवर या गृहसंकुलात असलेल्या उद्यानात उघड्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या उद्यानात असलेल्या एका पथदिव्याच्या तळाला वाहिन्या उघड्या होत्या. त्याच्याशी संपर्क झाल्याने या मुलाला जोरदार धक्का बसला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गेल्या काही दिवसात विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अंबरनाथ शहरात पावसात लघूशंकेसाठी गेलेल्या एका तरुणाला विजेच्या धक्क्याने आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी महावितरणचा सबंधित कर्मचारी आणि ज्यांच्या जागेत वाहिन्या उघड्या होत्या अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यापूर्वी अवकाळी पावसात विजेच्या कोसळलेल्या तारांच्या संपर्कात आल्याने जांभूळ गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यावेळी तीन म्हशींचा मृत्यू झाला. या घटनांना महिना उलटत नाही तोच अशीच एक घटना बदलापुरात समोर आली आहे.
बदलापूर पश्चिमेत बदलापूर गावात बोराडपाडा रस्त्यावर अमृत टॉवर हे भव्य गृहसंकुल आहे. या गृहसंकुलात एक लहानसे खासगी उद्यान आहे. गृहसंकुलाच्या वतीने याचे व्यवस्थापन पहिले जाते अशी प्राथमिक माहिती आहे. या उद्यानात खेळण्यासाठी आपल्या मित्रांसोबत गेलेल्या या १४ वर्षाच्या मुलाला उद्यानात असलेल्या पथदिव्याच्या येथे विजेचा जोरदार धक्का बसला. या ठिकाणी विद्युत वाहिनी उघडी करून ठेवण्यात आली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. या वहिनीच्या संपर्कात आल्याने त्याला जोरदार धक्का बसला. यानंतर त्याला तातडीने सुरुवातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस जागेचा पंचनामा करत असून लवकरच याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेनंतर उघड्या विद्युत वाहिन्या बंद करण्याची मागणी होते आहे. त्याचवेळी ही घटना रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली. त्यामुळे पावसाच्या काळात घराबाहेर मुलांच्या सोबत पालकांनीही रहावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.