कल्याण– येथील पारनाका भागातील सरकार वाड्या जवळ जलकुंभाच्या जागेत एका संस्थेने अध्यात्मिक केंद्र सुरू केल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जलकुंभ परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र असतो. याठिकाणाहून शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा केला जातो. अशा जागेत नागरिकांचा वावर वाढला तर जलकुंभाला धोका होऊ शकतो, अशी भीती पारनाका भागातील नागरिकांनी व्यक्त केली.

जलकुंभाच्या जागेत अध्यात्मिक केंद्राची उभारणी होत असताना या भागातील काही जुनी झाडे तोडण्यात आली. जलकुंभाला लागून लोखंडी सांगाड्यांचे काम करण्यात येऊन अध्यात्मिक केंद्र उभारण्यात आले आहे. जलकुंभाची जागा ही पालिकेच्या मालकीची जागा असुनही प्रशासनाने या कामाला प्रतिबंध का केला नाही. अशाप्रकारे जलकुंभाच्या मोकळ्या जागांचा वापर परिसरातील संस्था, संघटना राजकीय दबावातून करू लागल्या तर जलकुंभांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी माहिती या भागातील नागरिकांनी दिली.

हेही वाचा >>>Mira Road Murder : “मनोज साने माझा मामा आणि तो खूप…”, सरस्वती काय म्हणाली होती? अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी दिलं उत्तर

वर्दळीच्या भागात पारनाका राजस्थान सभागृहा जवळील जलकुंभाच्या आवारात हे अध्यात्मिक केंद्र उभारण्यात आले आहे. अध्यात्मिक केंद्र असल्याने याविषयी स्थानिक रहिवासी उघडपणे कोणी बोलण्यास तयार नाही. या भागातील काही जागरुक रहिवाशांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते. या केंद्रात संस्कार, उपासन केंद्र चालविले जाते. चांगले उपक्रम या जागेत चालविले जाणार असल्याने याविषयी उघडपणे बोलण्यास कोणी तयार नाही.

हेही वाचा >>>कनिष्ठ अभियंत्यांअभावी डोंबिवलीत पाणीपुरवठा, मलनिस्सारण कामांचा बोजवारा

अधिक माहितीसाठी पाणी पुरवठा विभाग, उद्यान विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी अशाप्रकारचे बांधकाम केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. प्रत्यक्ष पाहणी करुन योग्य कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(कल्याणमध्ये पारनाका भागात जलकुंभाच्या जागेत अध्यात्मिक केंद्र.)