ठाणे : भिवंडी येथील मुंबई-नाशिक महामार्गावरील भुमीवर्ल्ड परिसरातील नाल्यात बुधवारी रात्री एक रिक्षा पडून तीन जण ठार तर चारजण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. मृतांमध्ये दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबईतील जहु चौपाटी येथे फिरायला गेले होते आणि तेथून घरी परतत असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत.

मुनीदेवी टोनी चौहान (२८) राधादेवी चौहान (३०) आणि अंशिका टोनी चौहान (२) अशी मृतांची नावे आहेत. तर, टोनी पंचूलाल चौहान (३१), रवी चौहान (१०), अंजली आणि अंकिता अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. टोनी चौहान हे टिटवाळा परिसरात राहत असून ते रिक्षा चालविण्याचे काम करतात. त्यांची पत्नी मुनीदेवी, मुलगी अंशिका, अंजली, अंकिता, मुलगा रवी आणि मेहुणी राधादेवी या सर्वांना रिक्षाने घेऊन ते बुधवारी रात्री मुंबईत फिरायला गेले होते. मुंबईतील जहु चौपाटी येथे फिरून झाल्यानंतर ते घरी परतण्यासाठी निघाले. मुंबई-नाशिक महामार्गावरून वेगाने जात असताना भिवंडी येथील भुमी वर्ल्ड परिसरात त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा रस्त्यालगत असलेल्या नाल्यात पडली. १५ ते २० फुट खोल असलेल्या नाल्यात चार ते पाच फुटापर्यंत पाणी होते. त्यात बुडून मुनीदेवी, राधादेवी आणि अंशिका यांचा मृत्यु झाला. तर, टोनी, रवी, अंजली आणि अंकिता हे किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावले आणि त्यांनी पोलिसांनाही पाचरण केले.

हेही वाचा >>>ठाण्यात जलशक्ती अभियानाच्या कामांची केंद्रातील अधिकाऱ्यांकडून पाहणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाल्यातून तीघांचे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. तिघांचे मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. निष्काळजीपणे रिक्षा चालवून अपघात केल्याप्रकरणी टोनी चौहान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली.