Thane municipal corporation election 2025 : ठाणे : येत्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचना आराखड्यावर २ सप्टेंबरपर्यंत केवळ १६ हरकती व सुचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत. गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याचे बोलले जात असून आता गौरी-गणपती विसर्जन झाल्याने शेवटच्या दोन दिवसात म्हणजेच ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नागरिकांकडून तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे तक्रारीच्या संख्येत वाढण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे. प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली होती. यात विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीने प्रभाग रचना तयार करून ती प्रसिद्ध केली आहे.

गेल्या म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना होती. त्यात ३२ प्रभाग चार सदस्यांचे तर, एक प्रभाग तीन सदस्यांचा होता. अशी एकूण ३३ प्रभागातून १३१ नगरसेवक निवडुण आले होते. यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम ठेवण्यात आल्याने प्रभाग आणि नगरसेवक संख्येत वाढ झालेले नाही. यात चार सदस्यांच्या प्रभाग रचनेत ५० ते ६२ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. तर, तीन सदस्यांचा प्रभाग ३८ हजार लोकसंख्येचा करण्यात आला आहे. या प्रारुप आराखड्यावर महानगरपालिकेने नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. हरकती व सूचना सादर करण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

केवळ १६ तक्रारीच

प्रारुप प्रभाग आराखडा जाहीर होताच, त्याविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटचे दोन प्रभागात विभाजन केल्यामुळे या रचनेविरोधात भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी आक्षेप घेतला होता. तसेच प्रभाग क्रमांक २९ हा तीन सदस्यांचा प्रभाग असून त्यातून राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडुण येत होते. परंतु या प्रभागात दिवा साबेचा काही भाग, सागर्ली, सोनखार, डोमखार हे भाग जोडण्यात आल्याने हा प्रभाग शिवसेनेसाठी पोषक ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील शिवसेनेत प्रवेश केला. तसेच इतर प्रभागातही सीमावादाबाबत काही तक्रारी होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु प्रत्यक्षात आराखड्यावर २ सप्टेंबरपर्यंत केवळ १६ हरकती व सुचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत. या तक्रारी कोणत्या प्रभागांसाठी आहेत आणि तक्रारींचे स्वरुप काय हे मात्र समजू शकलेले नाही.

गणेशोत्सवामुळे तक्रारींचा ओघ कमी

गणेशोत्सवात अनेकजण व्यस्त असल्यामुळे तक्रारींचा ओघ कमी असल्याने ते तक्रारी करू शकलेले नाहीत. आता गौरी-गणपती विसर्जन झाल्याने अनेक जण आता वेळ काढून तक्रारी दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात म्हणजेच ३ आणि ४ सप्टेंबर रोजी नागरिकांकडून तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे तक्रारीच्या संख्येत वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.