कल्याण : आता गैरकृत्य करणाऱ्या मंत्र्यांचे आणि अशा अनेक ‘आकां’चे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. काहीही करा आपल्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मामा पगारे यांच्या सारख्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला भर रस्त्यात साडी नेसून त्यांची बदनामी करण्यात येते. आम्ही औरंगजेबाची देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर केलेली तुलना किती योग्य होती हे आता दिसते. जशी यापूर्वी मोगलाई होती, तशी आता राज्यात फडणवीसशाही आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी शनिवारी येथे केली.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वहाण फेकण्याचा झालेला प्रयत्न आणि या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च व्यक्ति, संस्था आणि संविधानाचा करण्यात आलेला अवमान, तसेच दलित समाजातील असल्याने मामा पगारे यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांंनी रस्त्यावरून अडवून त्यांना नेसविण्यात आलेली साडी प्रकरणाचा निषेध करण्यासाठी, तसेच पगारे यांच्याशी गैरकृत्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर ॲट्राॅसिटी कायद्याने गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शनिवारी कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे कल्याण येथे पोलीस उपायुक्त कार्यालया बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सकपाळ माध्यमांशी बोलत होते. या निषेध आंदोलनात कल्याण जिल्हा काँँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश नेते ॲड. नवीन सिंग, महिला संघटक कांचन कुलकर्णी, काँग्रेस पदाधिकारी ब्रीज दत्त, मामा पगारे, एकनाथ म्हात्रे उपस्थित होते.आता आपण काहीही करू शकतो, मुख्यमंत्री फडणवीस आपल्या पाठीशी आहेत. अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे अराजकसदृश्य परिस्थिती राज्यात आहे. ‘आकां’चा सर्वदूर संचार वाढला आहे. या आक्कांचे नेते फडणवीस आहेत. जशी यापूर्वी मोगलाई होती, तशी आता फडणवीसशाही आली आहे, अशी टीका सकपाळ यांनी केली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वहाण फेकण्याचा प्रकार आणि मामा पगारे यांचा भर रस्त्यात उपमर्द करण्याचा प्रयत्न हा जातीयतेचा प्रकार आहे. या प्रकरणांचा थेट संविधानाश संबंध आहे. संविधानावर विश्वास नाही. ज्यांना केवळ मारझोड, धाकदपटशावर विश्वास आहे तीच मनुवादी वृत्ती आता डोके वर काढत आहे, असे सकपाळ यांनी सांगितले. कोल्हापुरच्या हत्तीणीच्या माध्यमातून गेलेली अब्रू आता मुंबईत कबुतरांच्या माध्यमातून वाचविण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे. याऊलट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक कबतुर संकुल उभारून मुक्या प्राण्यांना दया दाखवावी. कर्ज माफीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावे. मामा पगारेंप्रकरणी पोलिसांनी ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाहीतर आम्ही न्यायालयात दाद मागू आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी आग्रही राहू, असे सकपाळ यांनी सांगितले.
मामांची संघावर टीका
स्वातंत्र्याच्या काळात दोन प्रकारचे लोक होते. एक पुरूषार्थ गाजविणारे होते ते तुरूंगात गेले आणि जे नामर्द होते ते संघात गेले, अशी विखारी टीका मामा पगारे यांनी व्यासपीठावरून भाजप-संघावर केली. याविषयी भाजप, संघाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिक्रिया मिळू शकली नाही.