लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली- शहराच्या पूर्व, पश्चिमेत मुख्य वर्दळीच्या सर्व रस्त्यांवर गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या कमानी विविध राजकीय पक्षांनी रस्त्याच्या दुतर्फा लावल्या आहेत. या कमानींचा रस्ते वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे शहरात दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडी दिसू लागली आहे. या सततच्या कोंडीमुळे प्रवासी विशेषता शाळकरी विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना शालेय बस कोंडीत अडकावे लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या आठवड्यापासून राजकीय मंडळींमध्ये या कमानी लावण्यासाठी स्पर्धा सुरू होती. शेवटी सर्वच राजकीय पक्ष, काही गणेशोत्सव मंडळांनी मोक्याच्या रस्त्यांवर कमानींसाठी जागा मिळविण्यात यश मिळविले. तीन बाय तीन फुटाच्या चौकोनी आकाराच्या या लोखंडी आकाराच्या कमानी वर्दळी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आल्या आहेत. दत्तनगरमध्ये प्रगती महाविद्यालयाकडे जाण्याच्या वर्दळीच्या रस्त्यावर दोन भव्य कमानी वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहेत. या भागात मासळी बाजार, वाहनांची गर्दी, त्यात चार बाय चार आकाराच्या भव्य कमानींचा अडथळा वाहतुकीला येत आहे.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा जवानांकडून फेरीवाल्यांची तपासणी, महिला डब्याजवळ विशेष तपास पथक

अगोदरच डोंबिवली शहरातील रस्ते संध्याकाळी वाढत्या वाहन संख्येने कोंडीत अडकलेले असतात. त्यात आता कमानी लावण्यात आल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. या कमानी आता दिवाळीपर्यंत कायम राहणार असल्याने प्रवाशांसह वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांचीही डोकेदुखी वाढली आहे.

तसेच, अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संध्याकाळी पाच वाजल्यापासून ढोलताशा पथकांसह डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळील जोंधळे हायस्कूल चौकात मंडळाचा गणपती वाजतगाजत नेण्यासाठी जमतात. या मंडळाचा ट्रक, मंडळ कार्यकर्त्यांची वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे दररोज संध्याकाळी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ वाहन कोंडी होते. वाहतूक पोलीस याठिकाणी तैनात असतात. परंतु, चारही बाजूने येणारी वाहने, गणेश मंडळांनी अडविलेला रस्ता यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना कोंडीला सामोरे जावे लागते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मंडळांनी सकाळी, दुपारच्या वेळेत गणपती बाप्पा घेऊन जावा. आणि प्रवाशांना त्रास होणार नाही, असे नियोजन करण्याची मागणी अनेक नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस, वाहतूक पोलिसांनी या सूचना सार्वजनिक गणेश मंडळांना करण्याची मागणी काही नागरिक करत आहेत.