डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबई दिशेने जाणाऱ्या एक जलद आणि एक धिमी वातानुकूलित लोकल सकाळी ८.५९ च्या दरम्यान निघून गेल्या की डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांना जलद वातानुकूलित लोकलसाठी सकाळी १०.०७ पर्यंत म्हणजे एक तास रेल्वे स्थानकात रखडावे लागते. या तिन्ही वेळेच्या लोकल कधीही डोंबिवली रेल्वे स्थानकात वेळेवर येत नाहीत. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची सकाळी ८.५९ च्या वातानुकूलित लोकल पकडण्यासाठी दररोज रेटारेटी असते, अशी माहिती या लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची ही रेटारेटी कमी करण्यासाठी सकाळी ८.५९ ते सकाळी १०.०७ च्या दरम्यान सकाळी ९.३० वाजताच्या वेळेत मुंबईला जाणारी जलद लोकल प्रस्तावित करण्याची मागणी रेल्वे प्रवासी गेल्या वर्षांपासून करत आहेत. या मागणीकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही, असे रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी सांगितले.
टिटवाळा, वासिंद, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण भागातून सकाळी साडे सात, आठ ते साडे आठ पर्यंत मुंबईला जाणारी धिमी, जलद सामान्य, वातानुकूलित लोकल पकडली तरी कार्यालयीन वेळेत पोहचता येते. याची जाणीव असल्याने मुंबईला नोकरी करणारा शहापूर, मुरबाड, वाडा, भिवंडी ग्रामीण भागातील बहुतांशी नोकरदार या शहरी भागात स्थिरावला आहे. शहरी गर्दी बरोबर ग्रामीण भागातून आलेल्या नोकरदारांची गर्दीही मागील काही वर्षापासून टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ भागातून धावणाऱ्या लोकलमध्ये दिसते.
टिटवाळा-सीएसएमटी धीमी वातानुकूलित लोकल सकाळच्या वेळेत ८.५९ वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक तीनवर येते. याच वेळेत कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित अतिजलद लोकल सकाळी ८.५९ वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर येते. या लोकल वेळेच्या १० ते १५ मिनिटे मागेपुढे असतात. या लोकल वेळेत येत नसल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकात या वातानुकूलित लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तगमग असते. कल्याण वातानुकूलित लोकलमध्ये डोंबिवली रेल्वे स्थानकात चढायला मिळत नाहीत म्हणून डोंबिवली स्थानकातून अनेक प्रवासी उलट मार्गाने कल्याणला प्रवास करून पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. कल्याणच्या प्रवाशांना या लोकलमध्ये अनेक वेळा बसायलाही जागा मिळत नाही.
कल्याण रेल्वे स्थानकात ही वातानुकूलित लोकल पकडण्यासाठी कल्याणसह टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथमधील काही मोजके प्रवासी सज्ज असतात. वातानुकूलित लोकलचा पास, तिकीट असुनही आपणास या लोकलने गर्दीमुळे प्रवास करता येत नाही अशी प्रवाशांची खंत असते. कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकल सकाळी ८.५९ वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात आल्यानंतर ही लोकल कल्याणहून खचाखच भरून आलेली असते. पाठीमागची सकाळी १०.०७ वाजता येणारी दादर वातानुकूलित लोकल वेळेत येईल याची खात्री नसते आणि या लोकलने कार्यालयात जाण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांची डोंबिवली रेल्वे स्थानकात सकाळी ८.५९ वाजता येणाऱ्या दोन्ही वातानुकूलित लोकलवर भिस्त असते. ८.५९ च्या लोकल सीएसएमटी आहेत. त्यानंतरची लोकल दादर आहे, असे प्रवाशांनी सांगितले.
सकाळी नऊ ते सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ९.३० च्या दरम्यान सीएसएमटीकडे धावणारी एक वातानुकूलित लोकल रेल्वेने सोडली तर डोंबिवली आणि त्यापुढील रेल्वे स्थानकांमध्ये होणारी प्रवाशांची रेटारेटी बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असे प्रवाशांनी सांगितले.