ठाणे : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे पडत असल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून मध्य रेल्वे प्रशासनाकडे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सातत्याने अतिरिक्त कॅमेरांची मागणी करण्यात येत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याला अतिशय संथ प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ठाणे लोहमार्ग पोलीस विभाग देखील हतबल झाले असून सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात कोणताही दुर्घटना, अपघात वा गैरप्रकार झाल्यास याचे चित्रीकरण मिळवण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत.
ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेवरील एक प्रमुख स्थानक असून, दररोज सुमारे हजारो प्रवासी येथे ये-जा करतात. अशा गर्दीच्या पार्श्वभूमीवर स्थानकाची सुरक्षा व्यवस्था अत्यंत सक्षम असणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी आहे. ठाणे स्थानकात सध्या कार्यरत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे आहेत आणि काही भाग तर अजूनही ‘ब्लाइंड स्पॉट’ म्हणून ओळखले जातात. या भागात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्याचे चित्रीकरण उपलब्ध नसल्यामुळे तपासाच्या दृष्टीने मोठी अडचण निर्माण होते.
लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, ठाणे स्थानकात सध्या साधारण १७० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. मात्र स्थानकाचा विस्तृत परिसर, पादचारी पूल, अधिक गर्दीने गजबजलेले फलाट महिला प्रवाशांसाठी राखीव कोपरे या ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे असणं गरजेचे आहे. मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या अपघातात लोकल मधून खाली पडून काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर सर्वत्र प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध उपायोजना राबविण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या अतिरिक्त सीसीटीव्हींच्या मागणीकडे मध्य रेल्वे प्रशासन संथ प्रतिसाद देत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकातील अनेक भाग आजही सीसीटीव्हीच्या अखत्यारीत नाहीत. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.
ठाणे लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे मागील दीड ते दोन वर्षांपासून वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार करून ही समस्या मांडली आहे. त्यात किमान ८० ते १०० नवीन कॅमेरे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यावर अजून ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. पोलिसांच्या मते, फलाटावरील चोरटे, महिलांशी गैरवर्तन करणारे प्रवासी, अपघाती घटना किंवा संशयास्पद व्यक्ती यांचा मागोवा घेण्यासाठी सीसीटीव्ही हे एक प्रभावी शस्त्र ठरते. मात्र, जेव्हा घटनास्थळी कॅमेरा नसेल किंवा तो बंद असेल, तेव्हा गुन्ह्याचा तपास अधिक कठीण होतो.