Manoj Jarange Patil Mumbai Protest ठाणेः मराठा आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठ्याप्रमाणात परिणाम झाला असून याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. यावर उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला असून मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईतील सर्व रस्ते, पदपथ, रेल्वे, बस स्थानके मोकळे आणि स्वच्छ करण्यास सांगितले आहे. त्याअनुषंगाने, ठाणे, नवीमुंबईच्या वेशीवर सकाळपासून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मानखुर्द जकात नाक्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. यामुळे सायन -पनवेल मर्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करीत आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आझाद मैदान आणि परिसर आंदोलकांच्या गर्दीने गजबजलेला आहे. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आझाद मैदानासह आसपासचे परिसर आणि रेल्वे स्थानक परिसर आंदोलकांच्या गर्दीमुळे गजबजलेले आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना तसेच नोकरदार वर्गाला बसत आहे.
मंगळवारी सकाळपासून मानखुर्द जकात नाका येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. मराठा आंदोलक मुंबईकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत यासाठी ही नाकाबंदी करण्यात आली आहे.याठिकाणी प्रत्येक वाहनांची चौकशी केली जात आहे.त्यानंतरच वाहने सोडली जात आहे. परिणामी, सायन-पनवेल महामर्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीचा फटका नवी मुंबईला देखील बसला असून वाशीकडे जाण्याच्या दिशेला वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे. या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच नोकरदार वर्ग हैराण झाले असून त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे.