अंबरनाथः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन महिन्यांपूर्वीच्या बंडावेळी त्यांच्यासोबत अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर होते. त्यामुळे शिंदेंचे वर्चस्व असलेल्या अंबरनाथ शहरातून त्यांना सर्वांचा पाठिंबा मिळेल अशी आशा होती. मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख  आणि माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर यांचा गट शिंदेंना समर्थन देण्यापासून लांब राहिला. आता तीन महिन्यांनंतर नुकतीच अरविंद  वाळेकर यांनी सहकुटूंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे अंबरनाथमध्ये  बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. मात्र शिंदेंच्या पाठिशी उभे राहणाऱ्यांमध्ये आधीचे आणि नंतरचे असे शीतयुद्ध पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

हेही वाचा >>> कल्याण : घरासमोर रांगोळी सांडली म्हणून कुटुंबीयांना बेदम मारहाण; आंबिवली येथील प्रकार

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळाला. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर  हे स्वतः शिंदे यांच्यासोबत सुरत-गुवाहटी-गोवा असा प्रवास करत मुंबईत परतले होते. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातून शिदेंना जोरदार पाठिंबा मिळेल अशी आशा होती. आमदार समर्थक, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. मात्र अंबरनाथच्या शिवसेनेतील एक ताकदवार गट म्हणून ज्या शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांनी मात्र शिंदेंपासून अंतर राखले. या काळात या गटाच्या माजी नगरसेवकांनी डॉ. किणीकर यांच्याविरूद्ध प्रचारही केला.

हेही वाचा >>>राज्यात नव्या युतीची नांदी? श्रीकांत शिंदेंनी मनसे कार्यालयाला भेट दिल्याने चर्चेला उधाण

या स्थापनेनंतर अंबरनाथ नगरपालिकेत विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या आमदार डॉ. किणीकर यांना माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या उपस्थितीत महिला आघाडी आणि काही माजी नगरसेवकांनी घेराव घालून त्यांच्याविरूद्ध घोषणाबाजी केली होती. ज्यावेळी अंबरनाथचे माजी नगरसेवक शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी गेले त्यावेळी वाळेकर गटाच्या नगरसेवकांनी अंतर राखले होते. ज्यावेळी शिवसेना हे पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवून नवे मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दुसऱ्या गटाला दिले गेले. त्यावेळीही काही माजी नगरसेवकांनी समाज माध्यमांवर जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे वाळेकर आणि  त्यांचे समर्थक ठाकरे गटाकडे जातील की काय अशी शक्यता होती. मात्र दोनच दिवसांपूर्वी शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनिषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि माजी नगरसेवक निखील वाळेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे छायाचित्र प्रसारीत झाले. या भेटीनंतर वाळेकर कुटुंबीयही  एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अंबरनाथमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा फटका बसला आहे. मात्र या घटनेनंतर शहरात जुन्याच शीतयुद्धाला नव्याने सुरूवात होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

शीतयुद्ध पुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वी अंबरनाथ शिवसेनेत आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अरविंद वाळेकर हे दोन गट उघडपणे अस्तित्वात होते. दोन्ही गटात अनेकदा कुरघोड्या होत होत्या. या शीतयुद्धामुळे अनेकदा वरिष्ठांची कोंडी होत होती. या बंडानंतर डॉ. किणीकर गटाला अनेकदा टिकेचा सामना करावा लागला. मात्र आता दोन्ही गट पुन्हा एकाच पक्षात आल्याने पुन्हा शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. तर शहराचे नेतृत्व कोणत्या गटाकडे जाईल हा मोठा प्रश्न आता वरिष्ठांना सोडवावा लागणार आहे.