ठाणे : घोडबंदर घाट रस्त्याचे काम मिरा भाईंदर महापालिकेकडून पुन्हा एकदा सुरु झाले आहे. या कामामुळे तसेच एक अवजड वाहन रस्त्यावर उलटल्याने रविवारी सकाळपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावरील नवघर ते काजुपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक व्यवसायिक, फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक या वाहतुक कोंडीत अडकले आहेत. वाहतुक कोंडीमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांच्या प्रवासाचा कालावधी वाढू शकतो अशी सूचना ठाणे पोलिसांनी केली आहे.
घोडबंदर मार्गावरुन हजारो अवजड वाहने उरण जेएनपीए येथून गुजरात, वसईच्या दिशेने वाहतुक करतात. तसेच गुजरात येथून भिवंडी, उरण जेएनपीए आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचे प्रमाणही घोडबंदर मार्गावर अधिक असते. तसेच मिरा भाईंदर, वसई, ठाणे, बोरीवली भागातील नोकरदार, प्रवाशांसाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावरील घोडबंदर गायमुख घाट परिसराची मोठ्याप्रमाणात दुरावस्था झाली आहे. येथील मीरा-भाईंदर येथून ठाणेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या मार्गिकेवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते निरा केंद्र या रस्त्यावर दुरुस्तीचे कार्य सुरु आहे.
त्यामुळे हा रस्ता हा मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय पोलिसांनी अधिसूचना जारी करून वाहतुकीस दिनांक ११ ऑक्टोबर रात्री १२ ते १४ ऑक्टोबर रात्री १२ पर्यंत वाहतुकीस एक मार्गिका पूर्णत: बंद केली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर ते ठाणे व ठाणे ते मीरा भाईंदर असा प्रवास हा ठाणे ते मीरा-भाईंदर या एकाच वाहिनीवरुन गायमुख घाट ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप दरम्यान सध्या सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूचे वाहने ही टप्प्या-टप्प्याने २० मिनिटे थांबून वाहतूक सोडली जाते.
त्यातच ठाणे घोडबंदर वाहिनीवर गायमुख घाटाच्या अलीकडे हनुमान मंदिर समोर एक ट्रक पलटी झाला. पोलिसांनी वाहन मालकाला संपर्क साधून क्रेन द्वारे वाहन हे सरळ करण्याचा प्रयत्न करत आहे.
या कालावधीत या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. रविवारी सकाळपासून घोडबंदर मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. मुंबई अहमदाबाद मार्गावरील नवघर ते काजुपाडा पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक व्यवसायिक, फिरण्यासाठी बाहेर पडलेले नागरिक या वाहतुक कोंडीत अडकले आहेत. वाहतुक कोंडीमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांच्या प्रवासाचा कालावधी वाढू शकतो अशी सूचना ठाणे पोलिसांनी केली आहे.