लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: ठाणे जिल्हयातील शहरांमध्ये बुधवारी सायंकाळच्या सुमारे जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सायंकाळी कामावरून घरी परतत असलेल्या नोकरदार वर्गासह नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. यामुळे सर्वच शहरांमधील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. पाऊस थांबताच येथील पाणी ओसरले.

ठाणे, भिवंडी, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. दुपारपासूनच काळे ढग दाटून आल्याने सर्वत्र अंधारमय वातावरण होते. सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरांमधील सखल भागात पाणी साचले होते. ठाणे शहरातील माजिवडा चौक, वंदना सिनेमागृह परिसर, नौपाडा या भागात पाणी साचले होते.

हेही वाचा… येऊरमधील बेकायदा बंगल्यांवरील कारवाई थांबली; कारवाईसाठी तक्रारदाराचे येऊरमध्ये उपोषण सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे शहरात बुधवारी सायंकाळी ३.३० ते ४.३० वाजेपर्यंत ८. १३ मिमी पावसाची नोंद झाली. कल्याण शहरातील शिवाजी चौकात पाणी साचले होते आणि कल्याण स्थानक परिसरात पाणी साचले. भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे सर्वच शहरांमधील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. घोडबंदर, माजिवडा, मुंबई-नाशिक महामार्ग तसेच शिळफाटा येथील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले.