मुंबई: पहिल्याच मोसमी पावसात मुंबई जलमय होऊन सर्वच यंत्रणा कोलमडल्यामुळे राजकीय आरोपांचा महापूर आला आहे. पावसामुळे मुंबई ठप्प झाल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. तर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
मुंबईत सोमवारी ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे शिवसेना सरकारवर टीका केली. गेली तीन वर्षे भाजपचे सरकार मुंबई महापालिका चालवत आहे. या सरकारने मुंबई ठप्प करून दाखवली, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लागावला. हिंदमाता परिसरात पूर्वी पाणी तुंबत होते.
मात्र आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळे हा परिसर पूरमुक्त झाला होता. तिथे आजच्या पावसात पुन्हा एकदा पाणी भरले. पंप लावण्याची यंत्रणा मुंबई महापालिकेने अद्याप सुरू न केल्यामुळे पावसाचे पाणी साचल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.मुंबईत सोमवारी पडलेला पाऊस हा पहिला पाऊस नव्हता, तर तो तिसऱ्यांदा पडलेला पाऊस होता. तरीही मुंबई महापालिकेची यंत्रणा सज्ज नव्हती. पहिल्या पावसात साकीनाका पाण्याखाली गेले होते. दुसऱ्या पावसात अंधरी सब-वे पाण्याखाली गेला होता. तर तिसऱ्या पावसात संपूर्ण मुंबई ठप्प झाल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
भाजपचा मुंबईवर राग आहे का ?
भाजपचा मुंबईवर राग आहे का, असा खोचक सवाल ठाकरे यांनी केला. नगर विकास विभागाच्या ताब्यात मुंबई महापालिका प्रशासन असून नालेसफाई, रस्त्यांची कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. भ्रष्टाचाराचा पैसा माजी नगरसेवक फोडण्यासाठी वापरला जात आहे, असा आरोप ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला आहे.
नालेसफाईच्या पाहणीच्या वेळी कुठे होतात – आशिष शेलार यांचा पलटवार
पालकमंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेवर ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती. पावसाच्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी आणलेला ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्प का पूर्ण होऊ शकला नाही. मिठी नदीच्या विकासासाठी एक हजार कोटी खर्चूनही नदीतला गाळ का काढला नाही असे सवाल शेलार यांनी केला. मे महिन्यात आम्ही नालेसफाई आणि रस्ते कामांची पाहणी केली तेव्हा तुम्ही कुठे होतात, परदेशात मजा करत होतात, असाही टोला शेलार यांनी लाववला.