Thane Heavy Rainfall ठाणे : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या सुचनेनुसार, ठाणे जिल्ह्याला रविवारी, आज रेड अलर्ट जारी केले आहे. परंतू, शनिवारी रात्री पासूनच जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये पावसाने जोर धरल्याचे पाहायला मिळाले. रविवारी देखील पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. तर, येत्या काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यातील काही शहरांमध्ये शनिवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे आत कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी भिती घराबाहेरी देवीदर्शनासाठी गेलेल्या भक्तांना तसेच बाजारात खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांना वाटू लागली होती. त्यामुळे सगळ्यांची पाऊस येण्यापूर्वीच घरी पोहोचावे यासाठी लगबग सुरु होती. परंतू, सायंकाळी ७ वाजून गेले तरी पाऊस काही पडला नाही. त्यामुळे गरबाप्रेमी नटून थटून गरबा – दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडले. गरबा सुरु होताच ८ वाजताच्या सुमारास रिपरिप पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर, काही क्षणातच या पावसाचा जोर वाढला. गरबा आयोजनाच्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे गरबाप्रेमी निराश झाले. परंतू, काही ठिकाणी भरपावसात देखील गरबा रंगल्याचे दिसून आले.

ठाणे शहरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ज्युपिटर रुग्णालयासमोरील द्रुर्तगती महामार्गावर पाणी साचले होते. या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढणे अवघड झाले होते. तर,ठाणे शहरात रविवारी, आज देखील हा पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शनिवारी सकाळी ९.३० ते रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत या चौवीस तासात ११५.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, झाड पडल्याची एक आणि पाणी साचल्याच्या चार तक्रारी या विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्याला रविवारी रेड अलर्ट जारी केले असून अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.

प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना…

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व प्रशासकीय यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. यात सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, उपविभागीय अधिकारी (SDO), तहसिलदार, तसेच तलाठी, ग्रामसेवक, आणि पोलीस पाटील यांच्यापर्यंत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी लष्कर (Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांच्याशी समन्वय साधून बचाव कार्यासाठी तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास,नागरिकांना सुरक्षित निवारा किंवा मदत शिबिरांमध्ये हलविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. विशेषतः, समुद्रकिनाऱ्याजवळील गावांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे आणि भरती-ओहोटीच्या वेळा तपासून मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन…

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी नागरिकांना काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. शासन आणि प्रशासन आपल्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे तयार असून, कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये.नागरिकांनी प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. सुरक्षित ठिकाणी राहावे, जुन्या किंवा धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच, गरज असल्यासच घराबाहेर पडावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जवळच्या प्रशासकीय कार्यालयाशी किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा. या परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहनही ठाणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.