ठाणे – ठाणे जिल्ह्यात गेल्या चार वर्षांमध्ये अनैतिक देह व्यापाराच्या दलदलीत अनेक महिलांना ओढले गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. विविध हॉटेल्स, लॉज, मसाज सेंटर आणि बोगस ब्युटी पार्लरच्या आडून चालणाऱ्या या अवैध धंद्यांवर पोलिसांनी वेळोवेळी कारवाया करून अनेक महिलांची सुटका केली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मिळालेल्या एका अहवालानुसार २०२१ ते २०२४ या कालावधीत ठाणे जिल्ह्यात १२३ अनैतिक देह व्यापाराचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ९८ प्रकरणे ही ठाणे शहरातून आहे.

ठाणे जिल्ह्याचा ज्या गतीने विकास होतो आहे त्याच पद्धतीने जिल्ह्यात अनेक अनधिकृत व्यापाऱ्यांना देखील पेव फुटले आहे. वाढती लोकसंख्या, पोलीस यंत्रणेवरील ताण अशा गोष्टींचा फायदा घेऊन जिल्ह्यात विविध ठिकाणी अनधिकृत पद्धतीने देहविक्रीचा व्यवसाय काही समाजकंटकांकडून चालविला जातो. तर यामध्ये अनेकदा अल्पवयीन मुलींचा देखील समावेश असतो. इतर राज्यातून या महिलांना स्थानिक दलालांच्या माध्यमातून ठाणे, पुणे आणि मुंबई येथे अनैतिक व्यापारासाठी आणले जाते. या प्रकरणांमध्ये महिलांना नोकरीचे आमिष, मॉडेलिंग, सिनेसृष्टीत काम देण्याचे वचन, किंवा गरिबीचा फायदा घेत फसवले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. विशेषतः ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ आणि उल्हासनगर या भागांत अशा कारवायांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जिल्ह्यातील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी तंत्रज्ञान, पथकांची संख्या वाढवणे आणि सामाजिक जनजागृती मोहीम राबवण्यावर भर दिला जात आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केवळ पोलिसांवर नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकाने सजग भूमिका घेत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत अनैतिक देह व्यापारातून महिलांना बाहेर काढण्यासाठी गेले अनेक वर्ष काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्वाती सिंग यांनी व्यक्त केले आहे. तर ठाणे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरून होणाऱ्या सौद्यांवरही पोलिसांची नजर आहे.

दलालांना जरब बसविणे महत्वाचे

गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून अनधिकृत पद्धतीने देह व्यापार सुरु असलेल्या ठिकाणी छापे मारण्याची धडक मोहीम सुरु आहे. मात्र या ठिकाणाहून महिलांची सुटका केली जाते तर याचे दलाल फरार होतात. यामुळे या दलालांना वेळीच जरब बसविणे महत्वाचे आहे. या व्यापारात विविध राज्यातील आणि प्रामुख्याने बांगलादेशातील महिलांना दलालांच्या माध्यमातून भारतात प्रवेश दिला जातो. त्यानंतर स्थानिक दलाल आणि मध्यस्थांच्या माध्यमातून अधिकृतता दिली जाते. त्यांची बनावट ओळखपत्रे तयार केली जातात, त्यांना राहण्यासाठी जागा भाड्याने दिल्या जातात, त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारीही याच दलालांकडे असते. या भागात स्थानिक पोलिसांकडून ज्या ज्या वेळी कारवाई केली जाते, त्यात फक्त येथील महिलाच भरडल्या जातात. कारवाईपासून दलालांना झळ पोहोचत नाही. जिल्ह्यातील मुख्य शहरांपासून उपनगरांपर्यंत या जाळ्याचा विस्तार असून यामध्ये स्थानिक गुन्हेगारांसह बाहेरील राज्यांतील टोळ्यांचा सहभागही दिसून आला आहे.

वर्ष – २०२३ – २४

अनैतिक देह व्यापार प्रकरणे – ५२

ठाणे – ४२ सर्वाधिक

….

वर्ष – २०२२ – २३

अनैतिक देह व्यापार प्रकरणे – ३७

ठाणे – ३२ सर्वाधिक

वर्ष – २०२१ – २२

अनैतिक देह व्यापार प्रकरणे – ३४

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे – २४