बदलापूर: पडघा केंद्रातून अंबरनाथ आणि बदलापूर शहरात येणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने अंबरनाथ, बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजपुरवठा रविवार सकाळपासून खंडित झाला आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना वीज गायब झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांत रोष आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ दिसून आली आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली असून पंखे, वातानुकूलित यंत्रणा अधिक प्रमाण वापरली जाते आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून पडघा येथील केंद्रातून मोरीवली उच्चदाब विद्युत वाहिनीत सातत्याने बिघाड होत असल्याने अंबरनाथ, बदलापूर या शहरांना आणि ग्रामीण भागाला खंडित वीज पुरवठ्याच्या फटका बसतो आहे. रविवारी सकाळी सात वाजल्यापासून पडघा ते मोरिवली या उच्चदाब विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाला. परिणामी अंबरनाथ शहराचा मोठा भाग, बदलापूर शहर आणि अंबरनाथ तालुक्याच्या बारवी धरणापर्यंत भागात वीज गायब होती. परिणामी विजेशिवाय सकाळ झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

हेही वाचा : ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकाविरोधात आणखी दोन गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत महावितरणचे कल्याण विभागीय मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांना विचारले असता, मोरिवलि फिडर मध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून तांत्रिक बिघाड शोधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत नागरिकांना दिलासा देण्यासाठी चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा केला जात असल्याचेही औंढेकर यांनी सांगितले आहे. मात्र ऐन सुटीच्या दिवशी खंडित झालेली वीज पुरवठ्यामुळे नागरिकांत संताप आहे. यापूर्वी होळीच्या दिवशी सुमारे चार तास आणि गुरुवारी रात्री सुमारे सहा तास वीज पुरवठा खंडित झाला होता.