ठाणे – कळवा येथील निर्माणधीन इमारतीच्या ठिकाणी एका ४० वर्षीय विवाहितेचा हत्या झाली होती. या हत्येप्रकरणातील तीन आरोपींना ठाणे पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींचा ७२ तासांत शोध घेऊन त्यांना अटक केली.

विश्वजीत राजेंद्रप्रसाद सिंग (३०), देवराज मदन कुमार (१९) यांसह एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली. कळवा येथील कावेरी सेतू रोड परिसरातील एका निर्माणधीन इमारतीच्या ठिकाणी १४ जून २०२५ रोजी शांताबाई सुरेश चव्हाण (४०) ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. याबाबत नागरिकांकडून माहिती मिळताच कळवा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या महिलेच्या गळ्यावर, छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची बाब पोलिसांना आढळून आली. याप्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्याचबरोबर या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे युनीट १ आणि मध्यवर्धी गुन्हे शोध कक्ष यांच्या पथकाने सुरू केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पथकांनी परिसरातील ९० ते १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती आणि त्याआधारे केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी तिन्ही आरोपींचा माग काढला. हे तिन्ही आरोपी बिहार राज्यातील खगडीया जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन त्यांना अटक केली. यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून त्याला बाल न्यायालयाने भिवंडी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर, विश्वजीत आणि देवराज या दोघांना न्यायालयाने १ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.