बदलापूरः एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार का ही चर्चा देशभर सुरू असतानाच त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह माजी पालकमंत्री गणेश नाईक, पाच वेळा आमदार राहिलेले मुरबाडचे किसन कथोरे आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर यांच्या नावांची चर्चा रंगली आहे. भाजपचे अभ्यासू चेहरा असलेले संजय केळकर, प्रताप सरनाईक यांचीही नावे चर्चेत असल्याचे बोलले जाते. त्यातही एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरून बरीचशी समीकरणे बदलतील अशीही चर्चा आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातून कुणाच्या गल्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात ‘नोटा’ला ४७ हजार मतदान, शहापूर आणि ओवळा माजिवडा मतदारसंघात नोटाला अधिक पसंती

ठाणे जिल्ह्यात १८ विधानसभेच्या जागांवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख वगळता सर्व जागांवर महायुतीने विजय मिळवला. यात भाजपने एरोली, बेलापूर, ठाणे, डोंबिवली, भिवंडी पश्चिम, कल्याण पूर्व, उल्हासनगर, मुरबाड, मीरा भाईंदर हे मतदारसंघ जिंकले. तर कोपरी पाचपखाडी, ओवळा माजीवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, अंबरनाथ आणि भिवंडी ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेने जिंकले. शहापूर हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने (अजित पवार) जिंकला. जिल्ह्यात महायुतीच्या मोठ्या विजयानंतर आता मंत्री पदासाठीही ज्येष्ठ आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल का याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांच्यासोबत मंत्रीमंडळात असलेले रविंद्र चव्हाण यांना पुन्हा संधी मिळण्याची चर्चा आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यंदा मंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. तर पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले मुरबाडचे किसन कथोरे यांनी निकालाच्या दिवशीच आपल्याला मंत्रीपद मिळावे ही कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे सांगत दावा केला आहे. तर चौथ्यांदा आमदार झालेले आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकरही मंत्रीपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. ओवळा माजीवडा मतदारसंघाचे प्रताप सरनाईक आणि भाजपचा अभ्यासू चेहरा असलेले संजय केळकर यांचीही नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा : डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंच्या मंत्रीपदावर समीकरणे अवलंबून

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळते की ते एखादे दुसरे खाते सांभाळतील यावरून ठाणे जिल्ह्यातील मंत्रीपदाची समीकरणे अवलंबून असल्याचे बोलले जाते. एका जिल्ह्यात किती मंत्रीपदे मिळतील हाही मोठा प्रश्न आहे. त्यात भाजपचे पारडे यंदा जड मानले जाते. मात्र जिल्ह्यात एकनाथ शिंदे आपला वरचष्मा ठेवतील अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजपतील काहींचा हिरमोड होऊ शकतो असेही बोलले जाते. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निकष पाळल्यास काहींना अनपेक्षित मंत्रीपदाला लाभ होऊ शकतो, अशीही चर्चा आहे.