ठाणे : लोकसभा निवडणूकीत कळवा येथील मतदान केंद्राबाहेर ‘मशाल चिन्हा’चे बूथ लावल्याने पिता-पुत्रांना घरात शिरून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैशाली दरेकर- राणे या निवडणूक लढवित आहेत. २० मे या दिवशी मतदान असल्याने कळवा येथील जयभीमनगरमधील शंकर मंदिराजवळ ठाकरे यांच्या पक्षाचे मशाल चिन्हाचे बूथ लावण्यात आले होते. या बूथवर परिसरात राहणारे दिनेशकुमार तिवारी, त्यांचा मुलगा अमन यांच्यासह काहीजण बसले होते. सकाळी ९ वाजताच्या सुमारास परिसरातील माजी नगरसेवक गणेश कांबळे हे त्याठिकाणी आले. त्यांनी बूथवर बसलेल्या सर्वांना हकलून दिले.

हेही वाचा : शहापूरमध्ये केवळ जलवाहिन्या पाणी मात्र नाही, वाढीव टँकरचे प्रस्ताव कागदोपत्रीच; शहापूरवासियांचा जल आक्रोश सुरूच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान संपल्यानंतर अमन, दिनेशकुमार हे कुटुंबासह रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घरात होते. त्यावेळी सात ते आठ जण त्यांच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांनी दिनेशकुमार यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. अमन तिवारी हा त्यांना प्रतिकार करू लागला असता, त्याला देखील मारहाण करण्यात आली. परिसरात आरडाओरड झाल्यानंतर मारहाण करणारे पळून गेले. त्यानंतर अमन याने पोलिसांना संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मंगळवारी अमन याने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.