कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सोमवारी संंध्याकाळी सविता बिराजदार या महिलेचा रुग्णवाहिके अभावी मृत्यू झाला. या मृत्युप्रकरणी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशावरून प्रशासनाने रुक्मिणीबाई रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका चालक आणि प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा वैद्यकीय विभाग प्रमुखांकडून बजावण्यात आल्या आहेत. पालिका रुग्णालयात रुग्णवाहिके अभावी एका महिलेचा मृत्यू होणे हे दुर्देवी आहे.
डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे सादर केल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल. सादर करण्यात आलेले खुलासे न पटणारे, विपर्यास करणारे वाटले तर प्रशासनाकडून ते फेटाळून लावण्यात येतील. याप्रकरणातील दोषींवर कठोर आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त अभिनव गोयल यांनी दिला आहे.
पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयातील वैद्यकीय आरोग्य व्यवस्था सुस्थितीत असेल यावर प्रशासनाचा भर असेल. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्यांना अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय सेवेबाबत सुविधा मिळाली पाहिजे याकडे प्रशासनाचा भर असेल. त्यादृष्टीने प्रशासन पावले टाकत आहे, असे आयुक्त गोयल यांनी सांगितले.सविता बिराजदार यांचा रुक्मिणीबाई रुग्णालयात मृत्यु झाल्याने मंगळवारी दिवसभरात अनेक राजकीय नेत्यांनी पालिका रुग्णालयात, पालिका मुख्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेऊन याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
पालिकेतील सहा ते सात डाॅक्टर रुग्ण सेवा सोडून पालिका मुख्यालयात सोनोग्राफी सेंटरला मंजुरी देणे, खासगी रुग्णालयांचे नुतनीकरण, निविदा प्रक्रिया या प्रशासकीय कामात सक्रिय आहेत. आयुक्तांनी अशा डाॅक्टरांना पालिकेच्या रुग्णालय, आरोग्य केंद्रामध्ये रुग्ण सेवेसाठी बाहेर काढण्याची मागणी राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, पालिकेत शासन सेवेतील कणखर, समर्पित भावाने काम करणारा वैद्यकीय आरोग्य अधिकारी शासनस्तरावरून आणण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे.