लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : अनेक आमदार अजित पवार यांनी निवडून आणले आहेत. पण जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मतदार संघाबाहेर कोणी ओळखत नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही, अशी टिका राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासासाठी ३५ वर्षे समर्पित असलेल्या अजित पवार यांच्यावर टीका करुन अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायीभाव असल्याचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिला, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा, अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या मृत्यूबाबत विधान करुन, ध चा मा करत, खोटे बोल पण रेटून बोल अशापद्धतीने अजितदादांवर टीका केली. शरद पवार यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत असतो. त्यांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच. त्याचबरोबर गेली ३५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजित पवार यांच्याविषयी २८८ मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे. अनेक आमदार अजित पवार यांनी निवडून आणले आहेत. जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मतदार संघाबाहेर कोणी ओळखत नाही आणि येत्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून येण्याचीही शक्यता नाही, अशी टिका परांजपे यांनी केली आहे.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन महायुतीतील संघर्ष थांबावा – आनंद परांजपे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन टीका करणाऱ्या आव्हाड यांच्यावर रिदा रशीद या महिलेवरील विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा उद्वेगाने राजीनामा देताना जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता, हे आव्हाड सोईस्कर विसरलेले दिसतात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.