लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागात नियुक्तीचे आदेश नसताना सुनील पाटील नावाचा एक उपअभियंता मागील चार वर्षापासून नगररचना विभागात ठाण मांडून आहे. या अधिकाऱ्याकडे विशेष प्रकल्पाचा पदभार असताना त्याकडे दुर्लक्ष करुन हा अभियंता नगररचना विभागात इमारत बांधकामाच्या नस्ती मंजुरीत महत्वाची भूमिका बजावत आहे. पालिका प्रशासन या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणाची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डाॅ. के. एच. गोविंद राज यांच्याकडे तक्रार केली आहे.
हेही वाचा >>> ठाणे: राज्यात महाविकास आघाडीच्या दोनशे जागा येतील; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा दावा
पालिका नगररचना विभागात नियुक्तीचे आदेश नसताना नगररचना विभागात उप अभियंता सुनील पाटील यांनी चार वर्षात इमारत बांधकामाचे जेवढे आराखडे मंजूर केले त्या सर्व प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पुसाळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे. नगररचना विभागातील विविध प्रकारच्या कहाण्या दररोज बाहेर येत असल्याने या विभागावर आयुक्त, साहाय्यक संचालकांचा अंकुश आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियुक्ती आदेश नसताना एक अभियंता नगररचना विभागात काम करतोच कसा. सामान्य प्रशासन, नियंत्रक अधिकारी याविषयी जागरुक आहेत की नाहीत, असे प्रश्न प्रधान सचिव डाॅ. के. एच. गोविंद राज यांनी उपस्थित करुन याप्रकरणी कठोर कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन तक्रारदार पुसाळकर यांना दिले. गेल्या तीन वर्षापूर्वी माजी आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी उप अभियंता सुनील पाटील यांचा नगररचना विभागातील साहाय्यक नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार रद्द करुन त्यांना विशेष प्रकल्प विभागात हजर होण्याचे आदेश दिले.
हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेकडून वाहनतळाची उभारणी
दरम्यानच्या काळात करोना महासाथ सुरू झाली. पाटील यांचा विशेष प्रकल्प विभागात हजर होण्याचा विषय मागे पडला. त्याचा पुरेपूर गैरफायदा घेत उप अभियंता पाटील यांनी नगररचना विभागातच आपले बस्तान कायम ठेवले. आयुक्तांच्या आदेशानंतर सुनील पाटील यांनी तात्काळ विशेष प्रकल्प विभागात हजर होणे आवश्यक होते. बदली करणाऱ्या आयुक्तांची नंतर बदली झाली. पाटील यांचा विषय गुलदस्त्यात राहिला. त्यांनी हा विषय बाहेर येणार नाही याची काळजी घेतली, असे तक्रारदार पुसाळकर यांनी प्रधान सचिव राज यांच्या निदर्शनास आणले.
रस्ते, जल-मलनिस्सारण, विशेष प्रकल्प, स्मार्ट सिटी, भूसंपादन विभागात काम करण्यासाठी अभियंते उपलब्ध नाहीत. १४ अभियंते नगररचना विभागात राजकीय, मंत्रालयातून दबाव आणून कार्यरत आहेत. या विभागात अभियंत्यांना बसण्यासाठी जागा नाही. मात्र पालिकेतील एक मलईदार खाते म्हणून नगररचना विभाग ओळखला जात असल्याने या विभागात वर्णी लागण्यासाठी ठराविक अभियंते वर्षानुवर्ष धडपडत आहेत. सरळमार्गी काम करणाऱ्या अभियंत्यांना वाली नसल्याने त्यांची या विभागात कधीच वर्णी लागत नाही, असे सरळमार्गी काम करणाऱ्या अभियंत्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे : जिल्ह्यात शेतकरी आठवडी बाजाराला घरघर, बाजाराची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत
माजी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या खास मर्जीतले अभियंता म्हणून सुनील पाटील ओळखले जात होते. या कालावधीत त्यांनी सोयीच्या ठिकाणी पदस्थापना करुन घेण्यात बाजी मारली होती. कल्याण पश्चिमेतील चिकणघर मधील एक पुनर्विकास प्रकल्पात पाटील यांनी आपल्या नातेवाईकाच्या नावाने विकसित एका गृहप्रकल्पात एका मंदिराचा ‘टीडीआर’ वापरला असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. अशाप्रकारे नगररचना विभागात नियमाबाह्य ठाण मांडून बसलेल्या उप अभियंता सुनील पाटील यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. त्यांची तातडीने या विभागातून बदली करावी. त्यांनी मंजूर केलेल्या बांधकाम नस्तींची ‘एसीबी’तर्फे चौकशी करण्याची मागणी तक्रारदार पुसाळकर यांनी प्रधान सचिव, ‘एसीबी’च्या महासंचालकांकडे केली आहे.
साहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत यांना संपर्क केला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
“आयुक्तांना असलेल्या अधिकारात आपली बदली झाली आहे. शासनाचा यात हस्तक्षेप नसतो. आपली बदली नियमानुसार आहे.” सुनील पाटील, उपअभियंता, नगररचना विभाग.