ठाणे : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये उद्या, ७ मे रोजी युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील कर्णिक मार्गावरील रामबाग लेन येथील मॅक्सी मैदान परिसरात दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल केले जाणार आहे. यामुळे नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांनी केले आहे.

देशातील २५९ शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार ७ मे रोजी एकाचवेळी हे मॉक ड्रिल्स केले जाणार आहे. संरक्षण विभागाकडून देशातील विविध शहरांची श्रेणीनिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये द्वितीय श्रेणीत ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या ७ मे रोजी कल्याण शहरात हे मॉक ड्रिल घेतले जाणार आहे.

कल्याण येथील कर्णिक मार्गावरील मॅक्सी मैदान परिसरात दुपारी ४ वाजता मॉक ड्रिल केले जाणार आहे. या मॉक ड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक विजय जाधव व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.