लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : अटक वॉरंट बजावण्यात आल्याचे सांगून ठाण्यातील ६१ वर्षीय महिलेची तीन कोटी चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फसवणूक झालेली वृद्धा कोर्टनाका परिसरात वास्तव्यास आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी त्यांना कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगत काही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेला त्यांचे एक लॅपटॉप, चार किलो कपडे तसेच इतर काही साहित्य सीमाशुल्क विभागाने जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु असे कोणतेही साहित्य मागविले नसल्याने महिलेने त्यांना टाळले असता, त्या भामट्याने मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेसोबत संपर्क करून देतो अशी भिती महिलेला घातली. त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करण्यात आला. त्यामध्ये एका व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगून त्यांची वैयक्तीक माहिती मागितली.

आणखी वाचा-गणेश मुर्ती मोडतोडीनंतर भिवंडीत तणाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काहीवेळाने त्या व्यक्तीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीबीआय) अधिकारी संपर्क साधतील असे सांगितले. त्यानंतर महिलेला आणखी एका व्यक्तीने संपर्क साधत तिच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार, मानव तस्करी आणि अमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची बतावणी केली. तसेच तिच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे असेही त्या भामट्याने सांगितले. त्यानंतर त्या भामट्याने महिलेला बँक खात्यातील रक्कमचे परिक्षण करण्यासाठी त्यांच्या बँकेतील रक्कम वळती करण्यास सांगितली. त्यामुळे महिलेने घाबरून टप्प्याटप्प्याने तीन कोटी चार लाख रुपये वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.