ठाणे : आपली शिक्षणपद्धती ही ढकलगाडी प्रमाणे आहे. ज्या पद्धतीने कारखान्यात एखादी वस्तु टप्प्या – टप्प्याने बनवली जाते त्या प्रमाणे आपल्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी घडवला जातो. ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो त्याचे उत्तर त्याला लगेच मिळायला हवे. त्यासाठी पुढील इयत्तेत जाण्याची प्रतिक्षा करावी लागू नये. आपली शिक्षण पद्धती ही चौकटबद्ध असून हा या शिक्षण पद्धतीचा मोठा दोष आहे. यामुळे अशा शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचं आहे. असे मत व्यक्त करत अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनी सध्याच्या शिक्षण पद्धतीवर परखड भाष्य केले.

मराठी विज्ञान परिषदेतर्फे कळवा येथील विद्या प्रसारक मंडळाच्या सहकार विद्यालयात शनिवारी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काकोडकर बोलत होते.
करोनाकाळात सर्व ठप्प असल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र ज्या वेळेस शाळा सुरळीत सुरु झाल्या त्यावेळी बहुतांश विद्यार्थ्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे करोनानंतर विद्यार्थ्यांचा आकलन क्षमेतचा प्रश्न गंभीर होत असून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच शिक्षण पद्धतीत बदल होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांच्या आकलन क्षमतेनुसार त्यांना शिक्षण मिळायला हवे. असे मत काकोकडर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: “सरकारमध्ये असताना ‘बंद’ करता, लाज वाटायला पाहिजे”, ‘ठाणे बंद’वरून राजन विचारे संतापले; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आता…”

तंत्रज्ञानामुळे जशी आपली प्रगती झाली तशीच अधोगती देखील झाली आहे. सध्या विद्यार्थी आकडेमोड करणे गणित सोडविणे यांसारखी कामे मोबाईल तसेच इतर गोष्टींच्या आधारे करतात. यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढीवर त्याचा परिणाम होतो. तसेच सर्वजण आपली कामे पूर्ण करण्यासाठी मोबाईल इतर सॉफ्टवेअर यावर अवलंबून राहतात. यावर देखील विचार करणे गरजेचे आहे. तसेच मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनासारखे उपक्रम सर्वत्र व्हायला हवे. यातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होते. असेही काकोडर यावेळी म्हणाले. मराठी विज्ञान परिषदेतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तीन दिवसीय बालसंमेलनामध्ये राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये विद्यार्थी त्यांचे विविध प्रकल्प सादर करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी विज्ञान सहलीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटनावेळी मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष डाॅ. ज्येष्ठराज जोशी, ठाणे विभागाचे अध्यक्ष दा.कृ.सोमण, संस्थेचे कार्यवाहक ना. द. मांडगे, विद्या प्रसारक मंडळाच्या सहकार विद्यालयाचे डाॅ. अमोल भानुशाली यांसह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

हेही वाचा: सुषमा अंधारे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण: कल्याण-डोंबिवलीमध्ये बंद कडे पाठ फिरवून नियमित व्यवहार सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यात विज्ञान केंद्र व्हायला हवे – दा.कृ. सोमण

ठाण्यात एक उत्तम विज्ञान केंद्र व्हायला हवे. ज्या ठिकाणी एक तारांगण असेल, वाचनालय तसेच त्या केंद्रात विज्ञान मेळावे, विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स प्रशिक्षण यांसारखे उपक्रम राबविणे शक्य होईल. असे मत मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे अध्यक्ष आणि पंचांगकर्ते दा. कृ.सोमण यांनी व्यक्त केले.