ठाणे : कॅसलमील येथे दोघांवर चाॅपरने हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार येथे गोळीबार झाल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, राबोडी पोलिसांनी गोळीबाराचा कोणताही प्रकार अद्याप तरी निष्पन्न झाले नसल्याचे सांगितले. परंतु तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
तक्रारदार हे कॅसलमील भागातील आझादनगर येथे राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास ते कॅसलमील परिसरातून पायी जात असताना त्यांना गोळीबार झाल्याचा आवाज झाला. त्यांनी त्या दिशेने पाहिले असता, काहीजण त्याच भागात राहणाऱ्या दोन तरुणांवर चाॅपर आणि तलवारीने हल्ला करत होते. त्या टोळीपैकी एक तरुण हातामध्ये पिस्तुल घेऊन जोर-जोरात ओरडत होता.
परिसरातील नागरिकांनी घाबरून त्यांच्या घराचे आणि दुकानांचे दरवाजे बंद केले. तक्रारदार हे वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्या तरुणाने हातातील पिस्तुल तक्रारदाराच्या दिशेने रोखली. त्यावेळी खट्-खट् असा आवाज झाला. घाबरून तक्रारदार हे खाली बसले. या घटनेनंतर जमाव वाढल्याने हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी शस्त्र अधिनियम, १९५९ च्या प्रमाणे कलम २५, ३, ४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत १३५, ३७ (१) आणि भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३च्या कलमांतर्गत १०९, १९०, १९१, १९१ (२), १९१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, घटनास्थळी गोळीची पुंगळी किंवा गोळीबार झाल्याच्या खुणा आढळून आल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीने तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती राबोडी पोलिसांनी दिली.