ठाणे: न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेच्या अपहारानंतर या बँकेतील व्यवहारांवर निर्बंध घातले गेले आहे. त्याचा थेट परिणाम बँकेच्या ठेवीदारांना सहन करावा लागत आहे. अनेक ठेवीदार पैसे केव्हा मिळतील या विवंचनेत आहेत. सोमवारी वसंत विहार येथील बँकेच्या शाखेबाहेर मुंबई, ठाण्यातील शेकडो ठेवीदारांनी एकत्र जमून आंदोलन केले.

ठेवीदारांनी बँकेच्या कारभाराविषयी आणि राजकारण्यांविषयी संताप व्यक्त केला. न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ह बँकेत अपहार झाला. या अपहारामुळे सर्वसामान्य ठेवीदारांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. अपहारामुळे ठेवीदारांवर निर्बंध आल्याने आता अनेकांचे हाल सुरु झाले आहेत.

सोमवारी सकाळी वसंत विहार येथे न्यू इंडिया को-ऑपरेटीव्ही बँकेच्या शाखेबाहेर ठेवीदारांच्या एनआयसीबी डिपाॅझिटर्स फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेल्या मुंबईमधील विलेपार्ले येथील पीयुष व्होरा यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचा येत्या २४ मे या दिवशी विवाह आहे. त्यांनी मुलीच्या विवाहासाठी बँकेत रक्कम ठेवली होती. परंतु अचानक लादलेल्या निर्बंधामुळे हैराण झालो असल्याचे ते म्हणाले. विवाह महिन्याभरावर आला आहे. पैसे असूनही ते काढता येत नाही. अक्षरश: नातेवाईकांकडून पैसे मागण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.

तर, ठाण्यात राहणाऱ्या सुलभा सुब्रह्मण्यम या एकट्याच राहतात. त्या भाड्याने एका ठिकाणी वास्तव्य करतात. वय वर्ष ६६ असतानाही त्या नोकरी करत आहेत. बँकेत रक्कम अडकल्याने घर खर्च चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. माझ्या प्रमाणे अनेकांना समस्या भेडसावत आहेत. राजकारण्यांकडून या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकारणी फक्त मत मागण्यासाठी येतात. आमची चौकशी करण्यासही त्यांना वेळ नाही. असे त्यांनी सांगितले. यावेळी आंदोलकांनी २५ हजार रुपये काढण्याची मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत वाढवा, बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी किंवा विलीनीकरणासाठी तातडीने कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली.