किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : होळी आणि धुलिवंदन निमित्ताने मुंबईत राहणारे कोकणवासिय त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघाले आहेत. रेल्वेगाड्यांमधील गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी अनेकजण राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसगाड्यांमध्ये आसन आरक्षित करत प्रवास करत असतात. महामंडळाने त्यासाठी ॲप आणि ॲानलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून ॲप आणि ऑनलाईन माध्यमातून आसनाचे आरक्षण होत नसल्याने प्रवाशांना बस आगारात जाऊन आरक्षण केंद्रावर रांगा लावाव्या लागत आहेत. काही प्रवाशांनी ॲप किंवा ऑनलाईन माध्यमातून तिकीट काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पैसे कापले गेले. परंतु तिकीट मिळाली नाही. या प्रकारामुळे महामंडळाच्या कारभाराविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात कोकणातील लाखो नागरिक वास्तव्य करतात. होळी आणि धुलिवंदनाच्या कालावधीत कोकणात विविध कार्यक्रमांचे आणि पालखी सोहळ्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे कोकणवासिय त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघत असतात. रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी असल्याने आरक्षण मिळत नसते. त्यामुळे प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसगाड्यांवर अवलंबून राहावे लागते. एसटी महामंडळाकडून देखील या कालावधीत अतिरिक्त बसगाड्यांची वाहतुक होत असते. बसगाडीमध्ये आरक्षित आसन मिळावे यासाठी प्रवाशांकडून राज्य परिवहन सेवेच्या ‘एमएसआरटीसी’ या ॲपमधून किंवा ‘एमएसआरटीसी’च्या संकेतस्थळावर जात तिकीट काढून आसन आरक्षित केले जाते.

आणखी वाचा- बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांच्या टोळीने साडेपाच कोटी रुपये लुटले, १२ जण अटकेत

गेल्या काही दिवसांपासून या ॲप आणि संकेतस्थळावर तिकीट काढताना समस्या निर्माण होत आहे. काहीवेळा ॲपमध्ये नोंदणी होत नाही. अनेकवेळा प्रयत्न करूनही ही समस्या भेडसावत आहे. काही प्रवाशांनी वारंवार प्रयत्न केल्यानंतर त्यांना ॲपमध्ये किंवा संकेतस्थळाच्या आरक्षित तिकीट काढण्याच्या भागात प्रवेश मिळतो. परंतु प्रवाशांचे तिकीटाचे पैसे कापल्यानंतर त्यांना तिकीट मिळाले नाही. महामंडळाच्या या कारभाराविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तिकीटाचे कापलेले पैसे पुन्हा मिळविण्यासाठी आठवड्याचा कालावधी जातो. त्यामुळे आमचे पैसे अडकून राहतात असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

ऑनलाईन आरक्षण होत नसल्याने प्रवाशांना नाइलाजाने बसगाडी आगारामध्ये आरक्षण केंद्रावर जावे लागते. या आरक्षण केंद्रावर प्रवाशांच्या रांगा लागत आहेत. भर उन्हामध्ये प्रवाशांना वेळ काढून या रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात आहे.

आणखी वाचा- डोंबिवलीतील कचोरे येथील गावदेवी मंदिरातील चांदीच्या पादुका चोरीला

चिपळूनला जाण्यासाठी मागील अनेक दिवसांपासून ऑनलाईन आणि ॲपच्या माध्यमातून तिकीट काढण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु ॲपमध्ये नोंदणी होत नव्हती. काही दिवसांनी संकेतस्थळावरून नोंदणीसाठी प्रक्रिया झाली. आरक्षित आसनासाठी तिकीटाचे पैसे कापले गेले. पण तिकीट मिळाले नाही. अखेर आरक्षण केंद्रावर रांग लावून तिकीट काढले. त्यासाठी घोडबंदरहून १०० रुपये खर्च करून रिक्षाने एसटी थांब्यावर आलो. -मनोज भोबस्कर, ठाणे.

यासंदर्भात महामंडळाच्या तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता, असा प्रकार क्वचित होत असतो. तसेच ज्या प्रवाशांचे पैसे कापले गेले. ते पेमेंट गेट-वेच्या माध्यमातून कापले गेले असावे असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.