डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील काही भागात गुरुवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून ते पहाटे पाच वाजल्यापर्यंत रासायनिक दुर्गंधी सुटल्याने नागरिक हैराण होते. अगोदरच उकाड्याच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री रासायनिक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला.
यापूर्वी अशाप्रकारची दुर्गंधी १५ दिवसातून एकदा रात्रीच्या वेळेस अनुभवयास यायची, असे रहिवाशांनी सांगितले. गेल्या वर्षी रात्रीच्या वेळेत कंपनीतून रासायनिक दुर्गंधीयुक्त घटक बाहेर सोडणाऱ्या, नाल्यात रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई केली. ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी आणि सहकारी सदस्य यांच्या नियंत्रणाखाली डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात दिवसा, रात्रीच्या वेळेत दर आठवड्याने अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने प्रदूषण पातळी, रासायनिक दुर्गंधी कोठून येते का, नाल्यात कुठे दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले जाते का याची तपासणी केली जाते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातून अशाप्रकारचा रासायनिक दुर्गंधीयुक्त घटक हवेत सोडला जात नसल्याचे डोंबिवली पू्र्व, औद्योगिक क्षेत्रातील रहिवाशांकडून सांगितले.
हेही वाचा >>> वाढत्या तापमानात आता भारनियमनाचा झटका; बदलापूर, अंबरनाथमध्ये सुरू होणार भार नियमन
डोंबिवली पश्चिमेत गुरुवारी मध्यरात्री नंतर सुटलेली रासायनिक दुर्गंधी ही भिवंडी कोन परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधून सोडलेल्या दुर्गंधीयुक्त घटकाची असावी, असा अंदाज औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. डोंबिवली पश्चिम खाडी भागाच्या पलिकडे भिवंडी भागात कोन, सरवली औद्योगिक क्षेत्र आहे. वाऱ्याचा वेग दक्षिणेकडून उत्तरेकडे असल्याने कोन परिसरातील एखाद्या कंपनीने दुर्गंधीयुक्त रासायनिक घटक उत्पादन करते वेळी रात्री हवेत सोडला असावा, असे जाणकारांकडून सांगितले जात आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात असा प्रकार घडला तर ती दुर्गंधी पूर्व भागात पसरते. दूरवरील पश्चिमेत पोहण्याची शक्यता कमी आहे, असे जाणकारांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
रात्री एक नंतर रासायनिक दुर्गंधीयुक्त दर्प येऊन लागल्याने डोंबिवली पश्चिमेतील अनेक रहिवाशांनी आपल्या घर परिसरात मलटाकीचे झाकण उघडे आहे का. परिसरातील मलवाहिनी फुटून दुर्गंधी सुटली आहे का याची चाचपणी केली. परिसरातून ही दुर्गंधी येत नसून ती एखाद्या कंपनीने उत्पादन करताना सोडलेल्या घटकाची असल्याची खात्री नागरिकांची झाली. अनेकांची या दुर्गंधीने झोप उडवली. अशाप्रकारचा गैरप्रकार करणाऱ्या कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये भाजप जिल्हा उपाध्यक्षांच्या कार्यालयावर दगडफेक ; मोटारीचे नुकसान
“डोंबिवलीत परिसरात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्सतर्फे (कामा) नियमित घेतली जाते. रात्रीच्या वेळेत औद्योगिक, परिसरातील रस्त्यांवर अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने प्रदूषण पातळी, रासायनिक दुर्गंधी यांची तपासणी नियमित केली जाते. गुरुवारी मध्यरात्री घडलेला प्रकार डोंबिवलीतील कंपन्यांमधील नाही.”
देवेन सोनी अध्यक्ष, ‘कामा’