ठाणे – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ला १६ जून पासून सुरुवात होत आहे. यासाठी ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांचे आनंददायी आणि उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील १ हजार ३२८ जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे ७१ हजार ३२४ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना ३ हजार २७९ शिक्षक मार्गदर्शन करतात. नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मंत्री,लोकप्रतिनिधी, जिल्हा आणि तालुका स्तरावरील अधिकारी/कर्मचारी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. १४ आणि १५ जून रोजी सर्व शाळांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वच्छता व सजावट करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात येत आहे.

शिक्षणाची गोड सुरुवात घडवून आणणे, बालकांमध्ये शाळेप्रती आकर्षण निर्माण करणे आणि पालकांमध्ये जागरूकता वाढवणे हा शाळा प्रवेशोत्सवाचा मुळ उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी
बाळासाहेब राक्षे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळा प्रवेशोत्सवाची वैशिष्ट्ये

  • प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाईल
  • पहिले पाऊल उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन पालकांना देणार
  • सर्व नवख्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट आणि मोजे यांचे वितरण
  • मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देऊन पहिला दिवस गोड करण्याचे नियोजन
  • प्रभातफेरी, ढोल, बॅनर व फलकांद्वारे गावात जनजागृती
  • करोनाच्या अनुषंगाने आरोग्यविषयक प्रबोधन आणि मार्गदर्शन
  • १००% उपस्थिती आणि प्रवेशासाठी विशेष उपक्रम

पहिल्या दिवशी १००% विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दंवडी, प्रभातफेरी आणि पत्रक वाटपाद्वारे जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. तालुक्यातील सर्व प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना १००% शाळेत प्रवेश देणे हे ध्येय असणार आहे. शाळाबाह्य आणि स्थलांतरित बालकांना शोधून प्रवेश देण्यासाठी विशेष सर्वेक्षण व अहवाल तयार करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आली.