कार्यालयाला टाळे ठोकून कर्मचारी पसार
कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील एका हाॅटेल समोर असलेल्या वाहतूक आणि पर्यटन कंपनीतील तीन कर्मचारी आणि इतर साथीदारांनी उल्हासनगर मधील कारागीरांना परदेशात मोठ्या वेतनाच्या नोकरीचे आमिष दाखवून एकूण ३० लाख ४६ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.
सुमारे दीडशे कारागिरांचे पैसे जमा झाल्यानंतर त्यांना परदेशात नोकरीसाठी पाठवले नसून पर्यटन कंपनीतील कर्मचारी कार्यालयाला टाळे ठोकून पसार झाले आहेत.
या फसवणूक प्रकरणी सुतार कारागीराने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या दोन महिन्याच्या काळात पर्यटन कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे उल्हासनगर दोन रमाबाई आंबेडकर नगर परिसरात राहतात. भानुप्रताप शिवशंकर विश्वकर्मा (३३) असे तक्रारदाराचे नाव आहे. याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.
फसवणूक झालेले भानुप्रताप विश्वकर्मा यांनी पोलीस ठाण्यात आणि प्रतिनिधीला दिलेली माहिती अशी, की गुरूदेव, जय मल्हार हाॅटेलसमोरील लक्ष्मी सोसायटीत दुसऱ्या माळ्यावर स्काय सीकर्स ट्रॅव्हल्स ॲन्ड टुरिझम कंपनी होती. या कंपनीत मोहम्मद आसिफ, जहीर आणि रमाकांत आणि त्यांचे अन्य साथीदार कर्मचारी म्हणून काम करत होते. सुतार, गवंडी, फर्निचर, बांधकाम आणि इतर तांत्रिक काम करणाऱ्या कारागिरांना विदेशात मागणी असते. विदेशात कोठे आपणास काम मिळते का म्हणून तक्रारदार भानुप्रताप विश्वकर्मा यांनी फेसबुकच्या माध्यमातून चौकशी केली. त्यांना एक मोबाईल क्रमांक दिसला. त्या मोबाईल क्रमांकाची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपणास स्काय सीकर्स ट्रॅव्हल्स कंपनीतून संपर्क करण्यात आला. आपण तुम्हाला विदेशात मोठ्या वेतनावर काम मिळवून देऊ शकतो असे आश्वासन देण्यात आले.
आपणास त्यांच्या पर्यटन कार्यालयात बोलविण्यात आले. तेथे आपल्याशी सुसंवाद साधून नोकरीची हमी देण्यात आली. विदेशात जाण्यासाठी आपली कुर्ला येथील एका रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर पर्यटन कर्मचाऱ्यांनी आपल्याकडून ४० हजार रूपये भरणा करून घेतले. त्यानंतर प्रवासाठी ४० हजार रूपये भरणा करून घेतले.
आम्हाला या व्यवहाराचे लेखी करारनामे करून देण्यात आले. त्यामुळे आपणास विदेशात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे माझ्यासह इतर कारागिर, तरूणांना वाटले. आपल्याप्रमाणे सुमारे दीडशे कारागिर, बेरोजगारांकडून या कंपनी कर्मचाऱ्यांनी ३५ हजार ते ८० रूपयांपर्यंतच्या रकमा उकळल्या, असे विश्वकर्मा यांनी सांगितले. पर्यटन कंपनीने परदेश प्रवासाची तारीख निश्चित केली होती. ती तारीख निघून गेली. आम्ही स्काय सीकर्स कार्यालयात गेलो तर तेथे कार्यालयाला टाळे होते. कर्मचारी संपर्काला प्रतिसाद देत नव्हते. या कर्मचाऱ्यांनी माझ्यासह इतरांची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, असे विश्वकर्मा यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक लक्ष्मण साबळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.